Thursday, November 24, 2016

पता नही

मेरे हर किस्से में तुम आते हो
पता नही मेरे हिस्से में कब आओगे !

वरील शेर वाचून सुचलेली कविता


मेरे हर ख्वाब में तुम आते हो
पता नही हकीकत में कब आओगे !

मेरी हर एहसास में तुम आते हो
पता नही साँस में कब बस जाओगे  !

मेरी हर दुवा में तुम आते हो
पता नही कुबूल कब हो जाओगे !

मेरे हर किस्से में तुम आते हो
पता नही मेरे हिस्से में कब आओगे !

मनिष मोहिले

रात्र

रात्र ही धुंदावलेली, तारकांनी उजळलेली
जागते शेजेवरी, मीलना आतुरलेली

शेज ही गंधाळलेली, पाकळ्यांनी उमललेली
गंध सुमनांचा लेपिते, मलमली कायेवरी

अधीर आतूर ही तनू, अनंगरंगी रंगली
चांदण्याचे वस्त्र त्यागूनी, मुक्त झाली रात्र ही

भान गेले हरपूनी, जादू मनी तनी जाहली
निजलेली अबोध रजनी, उषा सलज्ज जागली

मनिष मोहिले



Monday, November 7, 2016

व्हेंटीलेटर

मराठी सिनेमा वेगवेगळे विषय प्रगल्भ व प्रभावीपणे हाताळू शकतो आणि वास्तववादी रहातानाच मनोरंजन देखील घडवू शकतो ह्याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे नुकताच लागलेला व्हेंटीलेटर.

प्रियांका चोप्राच्या Purple Pebbles Pictures ची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेला हा चित्रपट जरूर जरूर बघावा असा.

मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर अशा विविध जागी पसरलेल्या कामेरकर कुटुंबाची -  सख्खे, चुलत , आते, मामे, मावस नातेवाईक - ह्या सगळ्यांची ही गोष्ट.

चित्रपटाची सुरूवात होते तीच मुळी कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ गजानन कामेरकराना मेंदूची शीर अचानक तुटल्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून व्हेंटीलेटर वर ठेवावं लागतं हे एकेकाला फोनवर बातमी मिळण्यानी.

नंतरचा संपूर्ण चित्रपट म्हणजे गजूभाऊ ना भेटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळे हेतू मनात बाळगून आलेल्या नातेवाईकांचे परस्पर संवाद वा वादविवाद, प्रत्येकाची आपली खासियत, अंतस्थ हेतू, गणपती सुखरूप पार पडतील की सुतक लागेल ही सामायिक चिंता आणि तरीही आत खोलवर कुठेतरी परस्पर सौख्याचा जिव्हाळा, आपुलकी आणि ह्या पार्श्वभूमीवर वडिल आणि मुलगा यांच्या नात्यातील अबोल आणि म्हणूनच बोलके ताणतणाव.  आदर, प्रेम यांच्याबरोबरचे पण त्यापेक्षा अधिक जाणवणारे ताणतणाव.

गजूकाका आणि त्यांचा मुलगा प्रसन्ना (जितेंद्र जोशी) यांच्या नातेसंबंधातला तणाव, मोठा चुलतभाऊ म्हणून जाणून घेताना आणि एका मोठ्या कुटुंबातला कर्ता म्हणून सद्यस्थिती हाताळताना राजा ( आशुतोष गोवारीकर ) च्या मनात तो स्वत: व त्याचे वडिल ( सुरेश आळेकर) यांच्यातील ताण देखील समांतर विचार म्हणून येत राहतात आणि त्याला या नात्याची एक वेगळीच ओळख होते. चित्रपटाच्या शेवटी शेवटी प्रसन्नाला तो हेच समजवायचा प्रयत्न करतो की तुझ्या वडिलांबरोबरच्या नात्याची ती ओळख तू करून घे.
शेवटी काय होतं ? त्यासाठी चित्रपट पहायला हवा.

राजेश म्हापुसकरचं लेखन व दिग्दर्शन सुरेख. छायांकन ( cinematography ) झकास. पहिल्या सीन मधली गणपती तोंडावर आले असतानाची सकाळी जागी होणारी मुंबई अप्रतिम.

राजानी समजावल्यावर गजूकाकाना बाबा म्हणून भेटायला गेलेल्या प्रसन्नाचा monologue,  गजूकाकांचे भाऊ आणि आता कुटुंबात सर्वात ज्येष्ठ असलेले राजाचे बाबा,  प्रसन्ना जेव्हा व्हेंटीलेटर काढायचा असा निर्णय घेतो तेव्हा त्याची कान उघाडणी करतात तो प्रसंग, या सगळ्या प्रकारात राजाला तो स्वत: आणि त्याचे वडिल यांचं नातं उलगडत आणि आकळत जातं हे दाखवणारे प्रसंग असे काही प्रसंग लक्षात राहून जातात.

चित्रपटाच्या पूर्वार्धात वेगवेगळ्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया व संवाद वादविवाद विनोदी पद्धतीने सादर करून स्वाभाविक हास्यनिर्मीती साधली आहे. चित्रपटाच्या एकंदरीत गंभीर विषयाला हा विनोद बाधा आणतो अगर तो चित्रपटाचा तोल बिघडवतो असा आक्षेप काही जण घेऊ शकतील. पण माझ्यामते मनुष्य स्वभावाचं दर्शन घडवताना ते गंभीर प्रसंगातून घडवायचं की विनोदी प्रसंगातून ह्याबद्दलचं ते दिग्दर्शकीय व पटकथेचं स्वातंत्र्य असावं.

आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सुकन्या कुळकर्णी, स्वाती चिटणीस, उषा नाडकर्णी, सुरेश आळेकर आणि बाकी विजू खोटे, दीपक शिर्के, राहुल सोलापूरकर - सगळ्यांचीच कामं मस्त. सहज आणि नैसर्गिक. वैयक्तिकपणे मला अश्विनच्या भूमिकेतला तपन भट्ट सर्वात जास्त आवडला. आशुतोष गोवारीकर व जितेंद्र जोशीदेखील उत्तमच.

पण या सगळ्यात सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे casting. विविध भूमिकांसाठी केलेली कलाकारांची इतकी अचूक निवड आणि त्यांच्यातील प्रसंगातून मनुष्यस्वभावाचं दर्शन ही या चित्रपटाची खासियत.

आणि सगळ्यात महत्वाचा संदेश - व्हेंटीलेटर वर असलेल्या व्यक्तीला आयुष्य मिळण्याची अगदी नगण्य १% शक्यता असते पण आशा त्या १% वरच असते. आजमितीला बरीचशी नाती ही अशीच व्हेंटीलेटर वर असतात - विशेषकरून कर्त्याच्या भूमिकेत अदलाबदल झालेले मुलगा आणि वडिल हे नातं. त्या नात्याचा व्हेंटीलेटर काढू नका. तिथे शेवटपर्यंत तो १% चा chance देत रहा आणि घेत रहा. कारण व्हेंटीलेटर वरचा माणूस, व्हेंटीलेटर काढल्यावर वाचण्याची शक्यता नगण्य असली तरी नाती जगण्याची शक्यता निश्चितपणे जास्त असते आणि व्यक्ती जिवंत असो वा मृत, नातं चिरकाळ जिवंत राहू शकतं आणि राहतं - व्हेंटीलेटर शिवाय सुद्धा.

---- मनिष मोहिले.

मैत्री आणि परिचय

प्रत्येक नात्याला रुजण्यासाठी खत पाणी आवश्यक असतं. यामध्ये मैत्री पण आली. किंवा विशेषकरून मैत्री आली.

हे खत पाणी असतं संवादाचं. एकमेकांना अधून मधून आठवण्याचं. प्रत्यक्ष भेटण्यासारखं अंतर असेल तर प्रत्यक्ष भेटण्याचं. ते शक्य नसेल तर एखादा फोन, एखादा मेसेज, एखाद्या मेसेजवर दाद, आपल्या मनातल्या गोष्टी समोरच्या व्यक्तीबरोबर वाटून घेण्याचं (sharing your happiness, enthusiasm, good songs, good books, good poems, good jokes, hard feelings everything).

परिचय काय आणि मैत्री काय; दोन्हीचं बीज एकच - ओळख. पण जिथे हे संवादाचं खतपाणी मिळतं तिथे त्या ओळखीच्या बीजाचा मैत्रीचा वटवृक्ष होतो - मैत्रीच्या आपुलकीची हक्काची सावली देणारा, मनमोकळ्या हसण्याच्या पारंब्या मिळतात - गप्पांच्या सूरपारंब्या खेळायला, आणि मी आहे ह्या विश्वासाचा आश्वस्त करणारा भरदार बुंधा पण मिळतो निवांत टेकून थकवा घालवायला. At such maturerd stage, you can even share your grief, anger, frustration. It comes naturally out of the trust that has been built so far.

पण जर हे खतपाणी नाही मिळालं तर ती ओळख परिचयावरच थांबते. तिचं कुंडीतलं रोप होतं - एखादं फुलझाड जे आपल्या फुलानी काही काळ आनंद देतं पण फुलं असतील तरच त्या कडे लक्ष जातं. किंवा नुसतंच शोभेचं बोन्साय. आणि तिथे ईच्छा असो वा नसो, खतपाणी घालावच लागतं नाहीतर रोप मरून जातं.

पण एकदा का विशाल वृक्ष झाला की ह्या दररोजच्या खतपाण्याची गरज रहात नाही. आणि पाऊस पडायला हवा असेल तर झाडंच लागतात. फुलझाडं किंवा बोन्साय पाऊस पाडू शकत नाहीत. सावली झाडच देतं कुंडीतलं रोप नाही.

पण आपल्यासाठी ज्यांची मैत्री वृक्ष  आहे त्यांच्यासाठी आपला परिचय हे कुंडीतलं झाड असेल तर ? तरी काही हरकत नाही. आपण वृक्ष नाही म्हणजे समोरच्याला मैत्रीची किंमत नाही असा होत नाही. त्यांचे वृक्ष वेगळे असतात एवढाच त्याचा अर्थ.

आणि मग हा ही विचार करावा की ज्यांच्यासाठी आपली मैत्री वृक्ष आहे त्यांना आपण कुंडीतल्या झाडासारखं वागवतोय का ?  मग तिथे आपण आपली वर्तणूक, आपले प्रतिसाद बदलायची गरज आहे का ? हे सगळं दोन अधिक दोन चार इतकं सोपं नसतं कारण बीज लावताना माहीत नसतं ह्याचा पुढे वृक्ष होइल की कुंडीतलं रोप.

पण प्रयत्न वृक्ष व्हावेत असा करावा कारण; आपुलकी, मैत्री, हास्य, विश्वास ह्याचा चिंब करून टाकणारा पाऊस असेल तर जास्तीत जास्त वृक्ष असायला हवेत.

--- मनिष मोहिले

Sunday, September 25, 2016

कला पासष्टावी

मध्यंतरी, यू ट्यूब वर एक व्हिडीओ बघितला. त्यात "The art of seduction" या विषयावर डॉं सीमा आनंद यांच्या भाषणातील साधारण पंधरा एक मिनीटांचा भाग ऐकला.

त्यात त्यांनी कामक्रीडा या विषयावर अतिशय सखोल अभ्यासपूर्ण विचार मांडले होते. म्हणजे हिंदू पुराणातील ब्रम्हा व शिवाचं कामक्रीडेच्या उद्गम संदर्भातील स्थान, कामक्रीडेचं शास्त्र, वेगवेगळ्या अवयवांसाठी वेगवेगळे सुगंध, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या अवयवांचं अधिक संवेदनशील असणं, कामक्रीडेत माहीर होण्यासाठी चौसष्ट कलात माहीर होणं इतक्या विविध अंगांविषयी फार अभ्यासपूर्ण विचार त्यांनी मांडले आहेत.

पण या सगळ्या चर्चेच्या मुळाशी मुख्य धागा आहे शरीर, मन  व आत्मा यांचा संयोग ज्यातून या नवनिर्माणाची अतिशय प्रभावी ताकद असलेल्या शारिरीक उर्जेवर मनाचं प्रभुत्व असेल आणि अशाच परिस्थितीत ही क्रिया एक आदिम शारीर क्रिया न रहाता एक कला बनेल - पासष्टावी कला.  या चित्रफितीचा आंतरजाल दुवा खाली देत आहे.

https://youtu.be/jnS66SszwEs

ही चित्रफीत पाहिल्यावर व त्यातील भाषणातील मुद्दे ऐकल्यावर, ते कवितेच्या रुपात शब्दबद्ध करण्याचा माझा हा प्रयत्न.

पासष्टावी कला

ब्रह्माजीच्या कल्पनेतूनी, 'मोहिनी' जगती अवतरली
सुप्त सुखाची सृजनामधल्या; जाणीव मनुजाला झाली

जाणीवेस या मूर्त बनवण्या, कामक्रीडा जन्मा आली
एका साध्या शरीरक्रियेची, एक कला सुखदा बनली

उरात वाढे धडधड आणिक, लालिमा चढतो गाली
अनुरागातून कामुकतेची, नकळत जागृती झाली

केस मोकळे, तृषार्त डोळे; अधीर कानांची पाळी
अधररसाचे प्राशन करता, शोष अनोखा पडे गळी

टंच स्तनाग्रे मृदुलकठीण स्तन, रोमांचित नाभी उदरी
देहाची जणू सतार अवघ्या, रती मदनाच्या दरबारी

अंकांचे पट जरा पसरता, स्वर्गसुखाची अनुभूती
मैफिलीची ह्या भैरवीच ही, क्लांत सुखद भासे तृप्ती

कुंतल, डोळे, अधर, उदर अन् गात्रे देहाची सारी
भिन्न प्रकारे सजती अवघी; रंग, सुगंध, अलंकारी

कामक्रीडेचे शास्त्र असे जे, सहजी ना अवगत होइ
चौसष्ट कलांना जाणून घेता, पूर्वतयारी मग होइ

या साऱ्याहून अधिक जरूरी, एकरुपता हृदयाची
काया मन अन् आत्म्यासंगे मीलन जीवाचे शिवाशी

------ मनिष मोहिले


Friday, September 23, 2016

कळले ना कधी


तुझ्या स्वप्ननजरेशी नजरभेट झाली
कळले ना कधी ही नजरबंदी झाली

तुझ्या गाली फुलली ही लज्जा गुलाबी
कळले ना कधी, ही हवा धुंद झाली

तुझ्या गोड ओठांशी, भेट ओठांची झाली
कळले ना कधी, बात झाली शराबी

तुझ्या गात्री विसवून, मखमली गात्रे झाली
कळले ना कधी सुखे, रात्र बरसून गेली

तुझ्या दाट काळ्या केसात निजली
कळले ना कधी, रेशमी झोप झाली

---- मनिष मोहिले

Monday, September 19, 2016

Pink - पिंक

तू खुद की खोज में निकल; तू किसलिए हताश हैं ?
तू चल; तेरे वजूद की, समय को भी तलाश हैं !!धृ!!

जो तुझसे लिपटी बेडीयाँ; समझ ना इनको वस्त्र तू !
ये बेडीयाँ पिघालकर; बना ले इनको शस्त्र तू !!१!!

चरित्र जब पवित्र हैं; तो क्यूं हैं यह दशा तेरी ?
के पापियोंको हक नहीं; के ले यह परीक्षा तेरी !!२!!

चुनर उडाके ध्वज बना; गगन भी कपकपाएगा !
जो तेरी चुनर गिरी; तो भूकंप आ जायेगा !!३!!

तू खुद की खोज में निकल; तू किसलिए हताश हैं ?
तू चल; तेरे वजूद की, समय को भी तलाश हैं !!धृ!!

---- तन्वीर कौसी / गाझी


"पिंक" संपताना अमिताभच्या आवाजातली ही कविता स्त्री शक्तीला आवाहन करतानाच २१ व्या शतकातल्या तथाकथित सुधारक भारतीय समाजापुढे एक जबरदस्त प्रश्न उभा करते आणि आपल्याला आरशासमोर उभे करत एक चित्रपट संपतो.

वर वर पहाता आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक दृष्ट्या स्वतंत्र व स्वावलंबी असलेल्या आजच्या स्त्री च्या पुढे, आजही परंपरागत मानसिकतेच्या जाळ्यात अडकलेल्या समाजातील विविध घटकांकडून कसे वेगवेगळे प्रश्न उभे केले जातात, तथाकथित मानदंडाच्या समोर त्यांच्या चारित्र्याचं, वागणूकीचं कसं ठराविक साच्यातलं मूल्यमापन केलं जातं आणि एक सामाजिक व्यवस्था म्हणून पुरूष आणि स्त्री यांच्या बाबतीत आपण कसे दुहेरी मापदंड वापरतो हे in our face पद्धतीने दाखवणारा पिंक.

मीनल, फलक आणि अँड्रीया - तीन सामान्य मध्यमवर्गीय, कमावत्या स्वतंत्र विचारसरणीच्या मुली. आधुनिक भारतातील आधुनिक मुली असल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्यामुळे  घरापासून दूर मैत्रिणीबरोबर एकत्र रहाणे, मुलांसोबत मैत्री करणे, आपल्याच एका मित्राच्या मित्रांबरोबर डिनर ला जाणे, ड्रिंक्स घेणे,  ह्या त्यांच्या दृष्टीने सहज व्यवहारातल्या गोष्टी आहेत. आजच्या पुढारलेल्या भारतीय समाजाच्या स्त्री पुरषाना समान लेखणाऱ्या मानसिकतेचं द्योतक ही आहेत. पण हे खरंच असं आहे ?

एका rock concert नंतर, विश्वा नावाच्या आपल्या मित्राच्या मित्रांबरोबर - राजवीर व डंपी - एका रिसॉर्ट वर जाऊन डिनर व ड्रिंक्स घेताना घटनाना विकृत व विचित्र वळण लागतं आणि स्वत:च्या अब्रूचं रक्षण करताना मीनलच्या हातून राजवीर ला गंभीर जखम होते आणि वरवर स्त्रीपुरुष समानता मानणाऱ्या आधुनिक समाजातील विसंगती आणि विकृत चेहरा समोर येतो.

सत्ता व पैसा दोन्हीचं पाठबळ असलेले राजवीर व त्याचे मित्र, स्वत:च्या पौरूषाचा अवमान करणाऱ्या मीनलला धडा शिकवायचं ठरवतात. त्यासाठी त्यांच्या घरमालकाला त्यांच्या तथाकथित वाईट चारित्र्याबद्दल सांगून त्याना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न, मीनल पोलिसात गेली हे कळल्यावर तिचं अपहरण करून विनयभंग करणं अशा प्रकारे ते या मुलीना दहशत घालण्याचा प्रयत्न करतात आणि तरी ही जेव्हा या मुली स्वाभिमाना साठी लढायचं ठरवतात तेव्हा आपल्या हातातील सत्ता आणि पैशांचा वापर करून त्यांच्यावरच त्या वेश्याव्यवसाय करत असल्याचा व पैशासाठी राजवीर वर खुनी हल्ला केल्याचा आरोप करून मीनलला तुरूंगात पाठवतात.

या सगळ्या दरम्यान, शेजारी, ओळखीचे, नोकरीतील सहकारी या सर्वांची मानसिकता त्यांना या समाजाची खरी ओळख घडवते.

आणि अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीला येतो त्यांच्याच कॉलनीत रहाणारा, bipolar disorder मुळे वकिली बंद केलेला पण अतिशय बुद्धिमान व आपल्या उमेदीच्या काळात प्रथितयश म्हणून गाजलेला ॲड. दीपक सेहगल.

आणि मग सुरू होतात कोर्टरूम मधले वाद प्रतिवाद.  घरापासून दूर मैत्रिणीबरोबर एकत्र रहाणे, मुलांसोबत मैत्री करणे, आपल्याच एका मित्राच्या मित्रांबरोबर डिनर ला जाणे, ड्रिंक्स घेणे, स्कर्ट्स घालणे शॉर्ट्स घालणे  हे सगळं वाईट चारित्र्याचेच दाखले आहेत व असे वागणाऱ्या मुली या सेक्स साठी easily available असतातच ; या मानसिकतेतून सुरू झालेला खटला - एका बाजूला स्वत:च्या स्वत्वासाठी लढणाऱ्या तीन मुली आणि दुसऱ्या बाजूला एक सामाजिक मानसिकता यांच्या मधला लढा.

मीनल, फलक व ॲंड्रीया यांचं पद्धतशीरपणे चारित्र्यहनन करून त्यांना धंदेवाईक ठरवण्याचे वकिली डावपेच आणि या सगळ्यात मानसिकदृष्ट्या होरपळून निघणाऱ्या तीन मुली. त्याना एकच आधार आहे - दीपक सेहगल आणि त्याचं वकिली कौशल्य.

राजवीर व कंपू नी नोंदवलेली तक्रार कशी back dated आणि सूडाच्या भावनेतून केलेली आहे आणि हे करण्यात पोलीस यंत्रणेचा असलेला हात दीपक सेहगल अचूकपणे दाखवून मूळ आरोपातील हवा काढून घेतो तो प्रसंग, ज्या दबावतंत्राचा वापर करून राजवीरचा वकील फलक कडून पैसे घेतले नसतानाही पैसे घेतल्याचं वदवून घेतो त्याच दबाव तंत्राचा वापर करत आणि राजवीर च्या शीघ्रकोपी स्वभावाचा व परंपरागत पुरषी मानसिकतेचा फायदा घेत दीपक सेहगल त्याच्या तोंडून त्याची मानसिकता कोर्टापुढे आणतो तो सीन आणि आधुनिक काळात मुलीच्या नैतिक वागणूकीचे नियम बनवून सर्व समाजाच्या पदरात त्याचं दुटप्पीपणा घालणारा दीपक सेहगल - हे काही प्रसंग विशेष लक्षात रहातात.

या सगळ्या प्रकारात क्वचित एकमेकींशी मतभेद झाले तरी आपण न्याय्य गोष्टी साठी व स्वत्वा साठी लढायला हवं ही जाणीव ठेऊन एकमेकीना सांभाळणाऱ्या तिघी मुली.

या त्यांच्या लढ्याचं शेवटी काय होतं ?  त्यासाठी चित्रपट पहायला हवा.

दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरीने अतिशय समतोलपणे व तितक्याच थेट पद्धतीने संपूर्ण चित्रपट हाताळलाय.

मीनलच्या भूमिकेत तापसी पन्नू, फलक च्या भूमिकेत किर्ती कुलहारी व ॲंड्रीया च्या भूमिकेत ॲंड्रीया या तिघींचीही कामं सुरेख. त्यांची भिती, गोंधळ, अगतिकता आणि शेवटी लढायचा निश्चय आणि या प्रवासातले भावनिक चढ उतार अतिशय प्रभावी.

आणि दीपक सेहगलच्या भूमिकेत the one & only अमिताभ बच्चन. या अभिनेत्याच्या बाबतीत आता कोणतेही कौतुकाचे शब्द थिटे वाटतात. One needs to watch him portray Ad. Deepak Sehgal. भूमिकेचा बाज, देहबोली, आवाज, चेहऱ्यावरील भाव - he is just awesome.

पण चित्रपटाच्या या सगळ्या यशस्वी बाबींशिवाय एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या समाजाच्या एकाच परिस्थितीत पुरूष व स्त्री यांच्यासाठी वेगळे मापदंड लावण्याच्या दुटप्पीपणावर रोखलेलं बोट आणि केलेला प्रश्न.

स्त्री च्या वैयक्तिक निवड व निर्णय स्वातंत्र्याला आपण एक समाज म्हणून खरोखर समान पातळीवर स्विकारणार आहोत की नाही आणि जर ते तसं स्विकारायचं असेल  तर तसा समाज निर्माण करण्यासाठी आपल्या मुलाना वाचवणं ( save boys) गरजेचं आहे. त्याना वाचवायचय परंपरागत पुरूषप्रधान अशा मानसिकतेपासून जी जन्मापासून सामाजिक व्यवस्थेतून त्यांच्यावर बिंबवली जाते आणि त्यासाठी बदलायला हवं आपण.

शेवटी दीपक सेहगल म्हणतो त्याप्रमाणे " No " हा एक शब्द नसून ते एक नि:संदिग्ध वाक्य आहे ज्याला कुठल्याही इतर शब्दाची वा स्पष्टीकरणाची गरज नाही हे कळणारा आणि ते कळून त्या निर्णयाचा आदर करणारा - मैत्रिणीच्या बाबतीत, ओळखीच्या मुलीच्या बाबतीत, एखाद्या वेश्येच्या बाबतीत किंवा स्वत:च्या पत्नीच्या बाबतीत देखील - No म्हणजे नाही हे स्विकारून त्या निर्णयाचा मान राखणारा समाज निर्माण करणं ही गरज आहे.

आणि हे असं करून होणार नाही की पुरषानी मोठेपणा दाखवून स्त्रियांच्या मताचा आदर केला तर हे तेव्हा होइल की व्यक्ती म्हणून हे मतस्वातंत्र्य व निर्णयस्वातंत्र्य दोघानाही सारखंच आहे ही जाणीव संपूर्ण समाजात रुजलेली असेल तेव्हा.

आणि तरच आणि तेव्हाच  चित्रपटाच्या पोस्टरमधले ते बंदिवान करणारे गज नाहीसे होतील.

---- मनिष मोहिले 

Wednesday, September 7, 2016

मैत्र

असे प्रफुल्लीत मैत्र असावे
आठवता स्मितहास्य फुलावे

असे लाघवी मैत्र असावे
बोलके मौनानेही व्हावे

असे बोलके मैत्र असावे
शब्दांविना भाव उमगावे

असे आश्वासक मैत्र असावे
ओझे मनीचे हलके व्हावे

असे परिपक्व मैत्र असावे
बंधन त्या विषयांचे नसावे

असे निरागस मैत्र असावे
असण्याने ते सुंदर व्हावे

---------- मनिष मोहिले 

Monday, August 29, 2016

वेणू

वेळूच्या या बनात फिरुनी, वारा घुमवी शीळ
वेळूची बनते वेणू, लावता मुखे घननीळ

इवलीशी कुडी वेणूची, परि किमया तिची अपार
ऐकून वेणू कान्हाची, परतसे घरी खिल्लार

आर्त हाक कधी प्रेमाची; कधी मीलन हळूवार
मोहवे वेणू श्रीरंगाची, राधा लाजून चूर

वेणू अधरांचे नाते; जसे सखी प्रियकर
बोल अधरीचे गीत बनवती, वेणूमधले सूर

रूप वेणूचे साधेसे, परि अंतरंग सुंदर
छेद सप्त तिज उरातले, सप्तसुरां माहेर

------------  मनिष मोहिले

Wednesday, August 17, 2016

सुगंधी श्रावण

मेघ सावळे जादू करती
आकाशातून शिंपीत मोती
हवेत ओल्या गंधित प्रीती
पालवी कोवळ रेशीम नाती

अफुट कोवळ्या कळ्या मोगरी
वर्षास्नाने फुलून येती
कृतज्ञ होऊनी जलबिंदूंसह
धुंद सुगंधी श्रावण करती

तुझ्या मखमली अधरांवरती
हळूच माझी बोटे फिरती
तव देहाची वेणू बनता
ओली गीते हळवी बनती

शांतवणाऱ्या संध्याकाळी
रंग अनोखे नभी पसरती
तुझ्या नी माझ्या नात्यामधले
रेशीम धागे रंगीत बनती

-- मनिष मोहिले

Wednesday, August 3, 2016

आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावण, शेला हिरवा लेवून
सोन पिवळ्या उन्हाची, दिसे किनार सजून

आला श्रावण श्रावण, रिमझिमता पाऊस
नवनवेल्या चुड्याला, लागे माहेराची आस

आला श्रावण श्रावण, देह चिंब चिंब मन
सय सजणाची येता, प्रीत गाली ये फुलून

आला श्रावण श्रावण, सणावारांचा हा मास
दिसे सृष्टीचीही तृप्ती, असा फुलांचा सुवास

आला श्रावण श्रावण,  आसमंत ओला ताजा
शिरपेच सप्तरंगी, मिरवतो ॠतूराजा

---- मनिष मोहिले

Sunday, July 31, 2016

मी अश्वत्थामा चिरंजीव - पुस्तक परीक्षण

महाभारत - महर्षी व्यासांनी लिहीलेला अभूतपूर्व ग्रंथ. एक अलौकिक ग्रंथ ज्यात मानव जीवनाचं मर्म सामावलेलं आहे. धर्म, अधर्म, वीरश्री, भ्याडपणा, देवत्व, पशुत्व, नैतिकता, अनैतिकता, सत्कृत्य, दुष्कृत्य, निरागसता, कपटीपणा - मानवी जीवनाचे परस्पर विरोधी कंगोरे एका अतीभव्य सर्व संहारक युद्धाच्या पार्श्वभूमीवर उलगडून दाखवणारा आणि त्यात मनुष्याला गुंगवून आणि गुंतवून टाकणारा ग्रंथ. साक्षात श्रीकृष्णाच्या मुखातून कर्मयोग ऐकवणारा ग्रंथ.

अशा या महाभारताची आणि त्यातील सर्व व्यक्तीरेखांची आपल्या संस्कृतीवर, समाजमानसावर एक मोहिनी पडलेली आहे जी अनादि काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहील - जो पर्यंत वर उल्लेखलेले परस्पर विरोधी भाव भावना आहेत तो पर्यंत महाभारत आपल्याला आकर्षित करत राहील.

त्यामुळेच आजपर्यंत आपल्या वाड़मयात अनेक पुस्तकं महाभारतावर लिहीली गेली. काही विवेचनात्मक होती.  उदा. दाजी पणशीकरांचं महाभारत एक सूडाचा प्रवास, आनंद साधल्यांचं हा जय नावाचा इतिहास आहे. तर काही लेखकाना त्यातील व्यक्तीरेखांनी आकर्षित केलं. उदा विं सं खांडेकरांचं ययाति, रणजित देसायांचं 
राधेय किंवा शिवाजी सावंतांचं मृत्यूंजय.

महाभारतातील अशीच एक अत्यंत महत्वाची व्यक्तीरेखा अश्वत्थामा.  भारतीय युद्धाचा रक्तलांचछित शेवट करणारा आणि सात भाग्यवान चिरंजीवामधील एकमेव अभागी चिरंजीव. अशा या अश्वत्थाम्याच्या दृष्टीकोनातून संपूर्ण महाभारत सांगण्याचा आणि कलीयुगातही जिवंत राहिलेल्या द्वापारातील त्या चिरंजीवाचा सद्य जीवन प्रवास कल्पिण्याचा प्रयत्न श्री अशोक समेळ यांनी केला आहे त्यांच्या - मी अश्वत्थामा चिरंजीव या कादंबरीतून.

अस्तंबा (सातपुडा पर्वतराजीतील पहिला पर्वत) पर्वतावर राहणारा,  विस्मृतीच्या गर्तेत बुडालेला, त्यातच स्वत:च्याही नकळत  तिथल्या आदीवासांच्या मनात देव बनलेला कलीयुगातील अश्वत्थामा आपल्या संभ्रमावस्थेतून बाहेर पडण्यासाठी स्वत:च्या शोधात अस्तंब्यावरून खाली उतरून फिरतीवर निघतो आणि त्याच्याबरोबर वाचकही या रोमहर्षक प्रवासाला सुरूवात करतो.

कलीयुगातील वर्तमान आणि द्वापारातील भूतकाळ यांच्यामध्ये आंदोळत अश्वत्थाम्याची स्मृती पूर्ण जागृत होते आणि आपण कोण हे कळल्यानंतर त्याच्या आपण असे का ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भटकंती सुरू होते. या भटकंतीचा शेवट काय आहे ? अस्तंब्यापासून सुरू झालेली ह्या भटकंतीची अश्वत्थाम्याच्या आत्मसंवादातून आपल्यापर्यंत पोचणारी कहाणी म्हणजेच मी अश्वत्थामा चिरंजीव.

कलीयुगात अश्वत्थाम्याला प्रत्यक्षात भेटलेल्या, बघितलेल्या अनेकांना आलेले आणि अश्वत्थाम्याच्या चिरंजीवित्वाचं गूढ उकलता उकलता वाढवणारे अनुभव, महाभारताच्या अठरा खंडांचं वाचन व आकलन, अनेक संदर्भग्रंथ यातून श्री अशोक समेळ अश्वत्थाम्याची ही कहाणी अतिशय परिणामकारकरित्या आपल्याला सांगतात.

आता श्री समेळ हे मुळात नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक.  त्यामुळे नाटककार म्हणून ते प्रस्थापित लेखक असले तरी कादंबरी ची लेखनशैली आणि भाषेचा फुलोरा वेगळा असतो ह्याचं भान ही कादंबरी लिहीताना समेळानी ठेवलंय.

दृपद आणि द्रोण यांच्यातील भांडणापासून सुरू होणारी सूडकथा अश्वत्थाम्यानी केलेल्या अमानुष भ्याड कत्तलीवर संपते. या संपूर्ण कथाकथनात अद्भुतरसाचा वापर करत समेळ आपल्याला महाभारत काळात फिरवून आणतात. पण ही सलग महाभारताची कथा नाही तर मधे मधे वर्तमानातील संभ्रमित अश्वत्थामा आणि त्याच्याशी संबंधित अनुभव व त्याचबरोबर अश्वत्थाम्याची एक नवी परोपकारी धार्मिक मानसिकता व वैचारीक बैठक यांचा विकास हे ही आपण वाचत असतो.

हे वर्तमानातून भूतकाळात आणि भूतकाळातून परत वर्तमानात असं जे कथाकथनाचं कालसंक्रमण आहे ते समेळांनी अतिशय सुरेख व सुलभपणे हाताळलय. कुठेही त्या कालसंक्रमणाचा धक्का न बसता कहाणी पुढे सरकते - भूतकाळातही आणि वर्तमानातही.

आपल्या सर्वाना माहीत असलेलं महाभारत - अश्वत्थाम्याच्या दृष्टीकोनातून. त्यामुळे मी त्यातील घटनांबद्दल बोलणार नाही. मात्र त्यातील व्यक्तिरेखांचं जे चित्रण लेखकाने केलेलं आहे त्याबद्दल थोडसं सांगणं आवश्यक आहे. दुष्ट कौरव आणि सुष्ट पांडव व त्याना सहाय्य करणारा भगवान श्री कृष्ण अशी सरळ सरळ चांगल्या वाईटाची मांडणी आहे आणि हे करताना कौरवांचा दुष्टपणा अधिकाधिक उठून दिसेल आणि पांडवांचं धर्मानुसार केलेलं वर्तन ही उठून दिसेल ही काळजी स्वाभाविकपणे घेतलेली आहेे . मात्र कर्णाचं मद्यपी, कपटी, पळपुटा असं रंगवलेलं व्यक्तिमत्व कुठेतरी पटत  नाही. आपल्या मनावरील मृत्यूंजय मधल्या कथानायक कर्णाचा पगडा मान्य केला (तरीही मृत्यूंजय मधे कर्णाच्या द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेच्या अयोग्य वर्तनाचं समर्थन केलेलं नाही) आणि समेळांनी ही कादंबरी लिहीताना निश्चीतपणे कर्णाचं चित्र साधार अशा पद्धतीचं रंगवलं असं गृहीत धरलं तरी कमीत कमी कर्णाच्या शौर्याबद्दल दुमत नसावं. ते जर असतं तर कुंतीनी कर्णाकडून फक्त अर्जुन सोडून इतर पांडवाना अभय द्यायचं वचन घेतलच नसतं. भीष्मानी त्याला अर्धरथी व सूतपुत्र संबोधून त्याचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न करण्याची आणि त्याला युद्धापासून दूर ठेवण्याचीही गरज नव्हती. असो. हा एक विवाद्य ( माझ्या दृष्टीने) मुद्दा सोडला तर बाकी व्यक्तिरेखांचं चित्रण सुरेख. अश्वत्थाम्याची दुर्योधनाप्रती राजनिष्ठा आणि पांडवाबद्दल चं प्रेम आणि त्यांची बाजू योग्यअसल्यामुळे होणारी मानसिक ओढाताण हे देखील परिणामकारक रित्या दाखवलय.

घटनांची नाट्यमयता छान सांभाळली आहे आणि भारतीय युद्धाच्या अठरा दिवसांचं वर्णन अद्भुत आणि रोमहर्षक.

पण या सगळ्यापेक्षा महत्वाचा एक भाग ज्यावर संपूर्ण कादंबरीचा तोल आहे तो म्हणजे अश्वत्थाम्याला शाप म्हणून मिळालेलं चिरंजीवपद आणि त्याची भळभळणारी दुर्गंधीयुक्त जखम हेच कलीयुगातील मानवी जीवन आणि दस्तुरखुद्द अश्वत्थामा हा स्वत: कलीयुगाचं जिवंत प्रतीक आणि या स्वत:च्या ओळखीला बदलण्यासाठीची त्याची धडपड हा तो भाग.

कपटानी आणि भ्याडपणे अश्वत्थाम्यानी जी अमानुष कत्तल करून भारतीय युद्ध संपवलं आणि पांडवांचा विजयाचा आनंद हिरावून घेतला त्या घटनेचा परिपाक म्हणून द्वापारयुगाचा अंत होऊन सुरू झालेलं कलीयुग आणि अशा दुर्गुण व दुष्कृत्य आणि अधर्मानी बोकाळलेल्या कलीयुगात अश्वत्थाम्याचं बदललेलं उत्तरदायीत्व हे केंद्रस्थानी ठेऊन ही कादंबरी फुलत जाते.

आज अश्वत्थामा,  व्यासांचं  " ज्या धर्माचं पालन केलं असता अर्थ आणि काम मिळतो अशा धर्माचं पालन करा हे माझं सांगणं कोणी का ऐकत नाही " हे गाऱ्हाणे व्यर्थ जाऊ नये म्हणून, चिरंजीव जखमेसाठी तेल मागत वणवणत धर्माची - मनुष्यधर्माची शिकवण देत फिरतोय. या अवस्थेसाठी त्याचा शीघ्रकोपी अविचारच जरी जबाबदार असला तरी तो त्या पापाचं क्षालन करण्याचा प्रयत्न करतोय - प्रत्यक्ष भगवान कृष्णाच्या आशीर्वादाने, ज्यानी त्याला शाप दिला होता.

जो पर्यंत अश्वत्थाम्याची जखम भळभळतेय तो पर्यंत कलीयुग जिवंत आहे. ज्या दिवशी अश्वत्थाम्याची भळभळणारी जखम तेलाअभावी कोरडी पडेल त्या दिवशी प्रलय होइल हे सांगून लेखक आवाहन करतो की म्हणून अश्वत्थाम्याला तेल देत रहा आणि कलीयुग बुडण्यापासून वाचवा.

वैयक्तिकरित्या माझ्या मते एका व्यक्तीच्या वैयक्तिक दु:खावर ( I know it is symbolic आणि आपण मनुष्यधर्माचं आचरण करावं हेच आवाहन लेखक करतोय ) विसंबून राहून कलीयुग  जिवंत ठेवण्यापेक्षा, कलीयुगाचं अस्तित्व वा नष्ट होणं नियतीवर सोडून द्यावं पण मनुष्यधर्माचं पालन करून परत एकदा कृतयुगाला अवतरण्याचं आवाहन करावं हेच अधिक योग्य ठरेल आणि तरच अश्वत्थाम्याची भळभळणारी चिरंजीव जखम आणि वणवण यांचं सार्थक होऊन त्याला मुक्ती मिळेल.

-- मनिष मोहिले

Sunday, July 17, 2016

जेव्हा

तू लाजतेस जेव्हा, जादू क्षणात होते
एका क्षणी उन्हाचे, शरदाचे चांदणे होते

बोलतो तुझ्याशी जेव्हा, जादू क्षणात होते
शब्दांचे मनीच्या माझ्या, गाणे बनून जाते

तू हासतेस जेव्हा, जादू क्षणात होते
एका क्षणी चाफ्याचे, बहरून झाड येते

तव आठव येतो जेव्हा, जादू क्षणात होते
सुगंधानी बकुळफुलांच्या, मन गंधित होऊन जाते

----- मनिष मोहिले

Thursday, July 14, 2016

अनोखी प्रीत




           आकाशाच्या अंगणामध्ये, प्रेमकहाणी एक अनोखी 
      रूप लेवूनी मेघांचे दो, वरुण क्षमेची रंगते प्रीती 

     रुपेरी कड प्रेमाची ती; कोंदण सजते जरतारी 
   आषाढाचे ऊन्ह कोवळे ; सौम्य सावळे रुपेरी

   आतुरता ही दिसते नयनी; भेट होतसे वर्षानी 
वर्षावाची प्रीतीच्या, उभी प्रतीक्षा मनोमनी

   ओठ चुंबिता ओठांना; चमके मोदे सौदामिनी
         वाजत गाजत वरात साजे; मेघसावळ्या मित्रांनी 

     मीलन होइ वरुण क्षमेचे; सृजनाने बहरे सृष्टी 
           सतरंगी हो मोद मनीचा; जलबिंदूतून प्रकटे तृप्ती 

------ मनिष मोहिले 


Wednesday, July 13, 2016

एकदा केव्हातरी

श्री सुरेश भटांच्या "आकाशगंगा" या दीर्घकाव्यातील एक कडवे - एकदा केव्हातरी मी चांदण्यामाजी बुडालो; एकदा केव्हातरी मी अमृताचा शब्द झालो" या वरून प्रेरित होऊन स्फुरलेल्या काही ओळी --


एकदा केव्हातरी मी
उमलणारे फूल झालो
एकदा केव्हातरी मी
कस्तुरीचा गंध झालो

एकदा केव्हातरी मी
सांजतारा शुक्र झालो
एकदा केव्हातरी मी
पौर्णिमेचा चंद्र झालो

एकदा केव्हातरी मी
मैफिलीची नांदी झालो
एकदा केव्हातरी मी
भैरवीचा सूर झालो

एकदा केव्हातरी मी
वसंताचा बहर झालो
एकदा केव्हातरी मी
नाचणारा मोर झालो

एकदा केव्हातरी मी
वाल्याचा वाल्मिकी झालो
एकदा केव्हातरी मी
सिद्धार्थाचा बुद्ध झालो

एकदा केव्हातरी मी
मी स्वत:ला गवसलो
माझेच मग कळले मला;  मी
तुझेच मी प्रतिबिंब झालो

------ मनिष मोहिले






बोलावा विठ्ठल

काल ११ जुलै २०१६ ला पंचम निषाद प्रस्तुत "बोलावा विठ्ठल" कार्यक्रम पाहिला; किंवा ऐकला म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल.

देवकी पंडीत, आनंद भाटे आणि रघुनंदन पणशीकर अशा दिग्गज कलाकारांनी सादर केलेले दहा अभंग असा हा कार्यक्रम आषाढ महिन्याच्या निमीत्ताने अहमदाबादला काल संपन्न झाला आणि त्यातील सुरवर्षावाबरोबरच इतके दिवस अहमदाबादला हुलकावण्या देणाऱ्या वरुणराजाने देखील जणू ह्या संगीतसोह्ळ्यासाठी आपली हजेरी लावली.

शशी व्यास ह्यांच्या उत्कृष्ट समयोचित संकलनातून सादर होणाऱ्या या भक्तीरसपूर्ण अभंगसंगीत कार्यक्रमाची सुरुवात झाली रघुनंदन पणशीकर व आनंद भाटे या दोघांनी मिळून गायलेल्या जय जय रामकृष्ण हरी या अभंगानी. अतिशय रसाळपणे हा अभंग सादर करताना एक सुरेख आणि सुरेल जुगलबंदी देखील या गायकद्वयीनी पेश केली.

त्यानंतर रघुनंदन पणशीकरांनी राजस सुकुमार मदनाचा पुतळा, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आणि  श्री अनंता कमलाकांता पद्मनाभा नारायणा हे तीन अभंग सादर करून अक्षरशः मोहून टाकलं; तर देवकी पंडीत यांनी अबीर गुलाल, ताटी उघडा   ज्ञानेश्वरा आणि संत फार पंढरीत हे तीन अभंग आपल्या सुरेल आवाजात सादर केले आणि;  सगळ्यात शेवटी आनंद भाट्यांनी अवघाची संसार सुखाचा करीन, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आणि जो नित हरी को भजे हे पंडीत भीमसेन जोशींनी अजरामर केलेले अभंग, पंडीतजींचा शिष्य म्हणून परंतु स्वत:ची प्रतिभा दाखवत सादर केले आणि शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भक्तीरसात बुडवून काढणारा कार्यक्रम संपला.

ह्या तिनही अतिशय ताकदीच्या गायक कलाकारांना साथे देणारा वाद्यवृंदही तेव्हढ्याच तयारीचा होता. तबल्यावर साई बॅंकर, पखवाज वर प्रकाश शेजवळ, साईड ऱ्हिदम ला सूर्यकांत सुर्वे, पेटीवर (पेटीला संवादिनी हा अतिशय चपखल प्रतिशब्द आहे हे शशी व्यासांकडून कळलं) आदित्य ओक आणि बासरीवर पारसनाथ नावाचा युवा वादक कलाकार - या सगळ्यांनी या संगीतसोहळ्यात अधिकच मजा आणली. विशेष करून पारसनाथनी तर जवळपास प्रत्येक अभंगात आपल्या बासरीतून मंत्रमुग्ध करणारी सुरांची जादू पसरवली. अवघाची संसार मध्ये आदित्य ओक नी संवादिनीमधून गात्या गळ्यातील सुरांशी अत्यंत सुरेख संवाद साधणारे सूर निर्माण केले. साईजी आणि प्रकाशजी यांनी देखील तबल्यावर आणि पखवाजवर सफाईदारपणे पडणाऱ्या हातातून भजनी तालातील सुंदर जागा व वैविध्य दाखवून मजा आणली. बोलावा विठ्ठल या पणशीकरांनी गायलेल्या अभंगात सूर्यकांत सुर्वेंनी शेवटी जी झांज वाजवली ती लाजवाब होती.

दहा वेगवेगळे अभंग - रचणारे संत वेगळे, संगीत देणारे संगीत दिग्दर्शक वेगळे आणि गाणारे तीन कलाकारही वेगवेगळ्या शैलीत गाणारे - पण एक समानधागा - विठ्ठलाला आळवणाऱ्या, त्याला प्रेमानी आवाहन करणाऱ्या प्रेमाचा आणि भक्तीचा.

जुन्या काळातील कर्मठ जातीयवादामुळे, उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन; तुझे रुप कैसे पाहू त्यात आम्ही दीन अशी परिस्थिती असून सुद्धा चंद्रभागेच्या पाण्यात अंग अंग न्हाऊन कानड्यावर इतकं प्रेम आणि त्याच्या पायाशी भक्ती की सर्व संतांच्या अभंगातून एकच संदेश - त्या राजस सुकुमार मदनाच्या पुतळ्याला अनंत, कमलकांत, पद्मनाभ, नारायण, कानडा, विठ्ठल कोणत्याही नावानी हाक मारा पण मनी भाव असाच असू द्या आणि जीवन असच जगा की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावे. आणि मग मोक्षासाठी मुक्तीसाठी परमानंदासाठी वेगळ्या पूजेची तीर्थयात्रेची गरजच राहणार नाही कारण तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल.

किती उदात्त संदेश. किती त्या विठूवर आणि स्वत:च्या भक्तीरसपूर्ण प्रेमावर विश्वास - अतूट, अभंग आणि अशा या अभंग विश्वासातून निर्माण झालेली ती - "अभंगवाणी"

आजही हे सगळे अभंग हे तप: सिद्ध कलाकार जेव्हा अभिजात शास्त्रीय हिंदुस्तानी संगीताच्या मनोरम माध्यमातून सादर करतात  तेव्हा ते ऐकताना संगीत या कलेच्या आस्वादाबरोबरच, तो संदेश सुद्धा मनात हलकेच रुजतो. कार्यक्रम चालू असताना आणि नंतरही मनात कळत नकळत "ठ्ठल विठ्ठल विठ्ठल" चा गजर अखंड निनादत रहातो. अतिशय व्यवहारी पातळीवर जगल्या जाणाऱ्या आजच्या आपल्या जीवनशैलीत देखील निव्वळ काही तासात हे भावतरंग उमटण्यात ती अभंगवाणी, त्यातील भक्तीरस आणि ज्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोचते ते अभिजात शास्त्रीय संगीत या तिन्हींचा सहयोग आहे.

संगीताला "नादब्रम्ह" का म्हणतात ह्याची ओळख करून देत मनाला गाण्यातून परब्रह्म भेटवणारा - बोलावा विठ्ठल - एकदा जरूर ऐकावाच.

-------- मनिष मोहिले 

Monday, June 13, 2016

Being a part of a World Record

Last Sunday ie on 5th June, when over lunch gathering at our place, my friend Abhijit's  daughter Madhura told us about World's Largest Potluck Party to be held at Ahmedabad on 12th June 2016, as an official attempt to get into Guinnes Books of World Records, we were amused to hear that.

Ok. We have got our own potluck group of 6 couples and turn by turn every month,
we get together at one's place. The menu of salad, steamed, fried, baked, nonveg & dessert is distibuted among 6 couples & the hosts alongwith one item that comes their way, have to arrange for drinks & light meal.

Its a lot of fun & with variety of tasty recipes on the unfold every month alongwith an array of interesting chats on various topics, we eagerly look forward to our pot dinner on weekend evenings.

But, World's Largest potluck was something we had never thought of, let aside heard of. The idea itself was electrifying & got us all pumped up.

Madhura, threw some more light on it. The current Guinnes World Record (till 12th June) for World's Largest Potluck was for a gathering in Florida, USA with 1275 participants.

This information caught fancy of one Rohan Bhatt who is at the helm of affairs of a facebook group called  Foodaholics in Ahmedabad.  He along with his team of buddies sprung into action and arranged a potluck in Dec 2015 wherein they got 520 entries which enabled them to get into Limca Book of Records.

Looking at the response and  knowing that Ahmedabadies are basically foodies, he and his team sensed & smelt the possibility of achieving the feat by breaking the US record and on 12th June 2016, the dream that they saw and inspired many Ahmedabadis to share it, got manifasted into reality.

The rules were simple. Every one who wanted to be a part of this world record attempt was supposed to have himself / herself registered till 7th June. On the D day, one should come with any food item - home cooked or readymade, soft drinks enough for 6 persons ie 6 portions of the item.

So we were all prepared - Chaitali - my wife,  made mutton (सुकं मटण) & Sharvaree - my daughter made mashed potato cheeze sandwiches. I latched onto one of the four dishes made by Madhura ( she is a professional baker operating from home)  and we reached the venue at 6:30 pm. Having started at 6 pm, latest by 7 pm, the entry was supposed to be closed.

At the venue, a larged board saying "You are entering  a Record Breaking Zone" was there to welcome all. The atmosphere was electrifying with so many foodies having come together with one dream. There were people in all age groups but obviously, the youth brigade outnumbered others.

There were systematic arrangements with everyone who had preregistered as per rules, was being allowed inside the venue with a badge having barcode which was being scanned to record the no of participants.  The thumping of the music beats & songs was adding to the enthusiasm & it was a heady cocktail of music & food aroma filling the atmosphere. The event was being well compered by RJ Ekata of Radio Mirchi Ahmedabad and her bursting enthusiasm was engulfing one n all.

Inside, tables were laid down neatly arranged to place one's food item and there was a tag placed wherein one was supposed to write down the name of the person, name of food item & item category ie vegan, veg, contains eggs, non veg, low fat, sugar free, lactose free, organic, jain etc.

So the entry got closed and everyone was ready with the empty plate, spoon & glass provided by the organizers, to move around & sample various food items.

The annoucement was made & people started moving around.
It was crazy fun - so much variety of food - sandwiches, cakes, cookies, chat items like panipuri, bhel, basket chat, thepalas, khakharas, chicken, mutton, rice preps, sherbats, cold drinks, some delicious speciality savoury dishes & desserts. I wish I had at least two stomachs. The food was all delicious.

But, more than the food, the warmth with which unknown faces were meeting n greeting each other, offering food to each other & praising the food, was a sight to behold & cherish.
No agendas, no expectations - a mere warmth towards another person. Probably this secret ingredient made all the food items extremely tasty.

The eating or should I say gorging on tasty food got over & then the announcement was made about the final no of participants attending the record breaking event & whoa - the number was 1855. So the previous record of 1275 was taken over by a landslide margin and a new world record was created for the World's Largest Potluck Party with 1855 participants. The crowd went wild on hearing this. On a hot & humid June eve, even the cold breeze was waiting to hear that news cause as soon as the announcement was done, a pleasant cool breeze started all over - as if congratulating us all.
The official certificate would be issued by Guinnes Book within 45 days but thats just a formality. The new World Record was made & we were very happy n proud to be the participants making our own little contribution to the achievement.

The event was organized very nicely taking care that there won't be any litter left at the venue. There was no wastage of any food. Every one left the venue feeling very happy & feeling proud to be a part of a world record.

Someone may come up with the need & purpose of such an event raising the social utility aspect of the same.

However, having seen the event & being a part of it, I would say that some things should be done without any such context just to feel the love & warmth that human beings naturally feel towards each other.

A great record breaking evening it was - which will always be remembered by us.

-- Manish Mohile

Sunday, June 12, 2016

पाऊसधारा

रिमझिमणाऱ्या पाऊसधारा
भिरभिर ओला हिरवा वारा
मोर नाचतो मनात आणि
अंगावरती उठे शहारा

थेंबनाचरी नक्षी भुईवर
अन् पानांची ओली थरथर
स्नान करतसे धरती आणि
प्रीत मनातील हळवी नवथर

रिक्त करतसे गगन स्वत:ला
सजवे अपुल्या सखी धरेला
प्रीत मिसळते हवेत आणि
मृद् गंध करतसे धुंद मनाला

------ मनिष मोहिले

माझे मला न कळले

अस्फुट स्मित हे तुझिया
मुखड्यावरी गं फुलले
माझे मला न कळले
फूल वेलीवरी उमलले

डोळ्यात पाहता तुझिया
प्रीत पापणीतूनी लाजे
माझे मला न कळले
स्वप्नांना रंग मिळाले

श्वासांस ऐकता तुझिया
मम श्वास बोलके झाले
माझे मला न कळले
मौनाला शब्द मिळाले

---- मनिष मोहिले 

Tuesday, May 31, 2016

मृद् गंध

परवा रविवारी  संध्याकाळी अहमदाबादला ग्रीष्मानंतरचा पहिला पाऊस पडला. गेले जवळपास दीड दोन महिने अती कडक उन्हाळ्यात भाजून निघालेल्या कोणालाही गार वाऱ्यासहित आलेला तो पाऊस वरदान वाटावं यात नवल ते काय !

आणि त्या ओल्या गारव्या बरोबर आला पहिल्या पावशाशी  युगानुयुगं निगडित असलेला - मृद् गंध - मातीचा सुगंध.

ग्रीष्माच्या प्रखर तापात पोळून निघालेल्या पृथ्वीला आणि समस्त जीवितमात्राना आश्वासक भासणारा जीवनदान देणारा  तो सुगंध .

इंग्रजीत त्यासाठी Petrichor असा शब्द आहे असं मला माझ्या भाचीकडून कळलं. मी आंतरजालावर शोध घेतला तेव्हा कळलं की पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध का येतो ह्यावर संशोधन करणाऱ्या एका शास्रज्ञद्वयीने हा शब्द शोधला आहे.

हा शब्द बनलाय petra (stone) आणि ichor (the fluid that flows in the veins of the Gods in Greek mythology) या दोन ग्रीक शब्दांपासून.
मातीच्या सुगंधाचं शास्त्रीय कारण शोधणाऱ्या त्या शास्रज्ञद्वयीने शब्द शोधलाय मात्र एकदम काव्यात्म. जमीन आणि देवांच्या नसान्मधील दैवी द्रव्य यांच्या संयोगातून हा जीवनाचं आणि जीवंतपणाचं आश्वासन देणारा मोहवून टाकणारा बेभान करणारा सुगंध उत्पन्न व्हावा ही कल्पनाच किती सुरेख आणि उदात्त सौंदर्यानी भरलेली आहे !

दरवेळी मृद् गंध अनुभवताना प्रत्ययी येणारा अनिर्वचनीय आनंद आणि petrichor या शब्दाची व्युत्पत्ती या दोन्हीतून काही ओळी स्फुरल्या --

" मृद् गंध "

तप्त हो आकाश आणि; तप्त होई ही धरा
भाजतो वैशाख वणवा, दाह अंगी हा पहा

कुठूनशी मग झुळूक येइ, थंडगारशी हवा
तनूसवे सुखवी मनाला सुखदसा तो गारवा

अमृतासम वर्षते मग, जल नभातूनी पहा
मोहरूनी गंधाळते, सुगंधी होतसे धरा

शिंपती भूमीवरी नभ, अमर संजीवन सडा
टवटवीत होई धरा अन् पालवी फुटते मना

मीलन होइ मातीचे अन् दैवी ओजाचे अहा
सुगंध सृजनाचा फुले, मृद् गंध मोहवे मना


------ मनिष मोहिले
३१ मे २०१६

सोचो तो

यूँ तेरा नजरे मिलाना
और मिलते ही चुराना
सोचो तो बहोत कुछ हैं
सोचो तो कहा कुछ हैं

यूँ तेरा नजरोंसे कहना
बात को फिर पलट देना
सोचो तो बहोत कुछ हैं
सोचो तो कहा कुछ हैं

दामन का तेरे यूँ लहरना
छूके मुझको और फिसलना
सोचो तो बहोत कुछ हैं
सोचो तो कहा कुछ हैं

यूँ महसूस करना अपने जहम में
एहसास एक हसीन हम में
सोचो तो बहोत कुछ हैं
सोचो तो बहोत कुछ हैं

---- मनिष मोहिले 

आता वाटते की

आता वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे

या ओळीवरून मला सुचलेल्या काही पंक्ती --

आता वाटते की तुला फुलवावे
तुला फुलवण्या मोगरा बनून जावे

आता वाटते की तुला खुलवावे
तुला खुलवण्या खळी तुझी बनावे

आता वाटते की फक्त तुला ऐकावे
तुला ऐकण्या तुझेच हास्य व्हावे

आता वाटते की फक्त तुला पहावे
तुला पाहण्या परी माझेच नेत्र व्हावे

---- मनिष मोहिले 

दुरून तुला बघताना

दुरून तुला बघताना
शब्द उचंबळून येतात
समोर तू येता क्षणी
ओठांवरच थबकून जातात

दुरून तुला बघताना
नजर असते बिनधास्त
नजरभेट होता क्षणी
डोळे पापण्यात दडतात

दुरून तुला बघताना
श्वासात अश्व उधळतात
तू नजीक येता क्षणी
श्वास अर्ध्यातच अडतात

हे अंतर आपल्यामधलं
कधी होइल का कमी ?
दिसेल का कधी तुला
तुझ्यात हरवलेला मी ?

---- मनिष मोहिले 

Monday, May 2, 2016

उत्तराखंड वणवा

गेला जवळपास आठवडाभर, रोज वर्तमानपत्रात उत्तराखंडच्या प्रचंड प्रमाणावर भडकलेल्या वणव्याबद्दल बातम्या येतायत.

वाळकी पानं आणि केरकचरा नियंत्रित पद्धतीने जाळताना एका क्षणी गावकऱ्यांचं आगीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा वणवा भडकला अशा मूळ  वृत्ताला आज गावकरी व लाकूड माफिया यांच्या संगनमताने तर हे घडलं नाही ना अशा संशयाच्या फांद्या फुटल्यात.

पण मला आत्ता मांडायचाय तो मुद्दा कारणाविषयीचा नसून उपाययोजनेसंबंधीचा आहे. एक असा वणवा जो गेला जवळपास आठवडाभर भडकतोय, ज्यात जवळपास 1500-2000 हेक्टर जंगल होरपळून जातंय त्या वणव्याला आटोक्यात आणण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ते पुरेसे आहेत का हा प्रश्न आहे.

उन्हाळ्यातील तपमान, कोरडे वातावरण यामुळे वणवा भडकून व्यापक परिसरात पसरला अशी कारणमीमांसा देण्यात येतेय. त्याच प्रमाणे या वणव्यामुळे निर्माण झालेला धूर आणि राख यामुळे हिमनद्या वितळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पण मग हे संभाव्य धोके व परिणाम आधीच ओळखू शकणारा एकही विद्वान पर्यावरणवादी / भू शास्त्रज्ञ आपल्याकडे नाहीये का ? जर हे संभाव्य परिणाम आधी वर्तवले असते तर आपल्या उपाययोजनेत व ज्या स्तरावर या समस्येची हाताळणी होतेय त्या स्तरात काही फरक पडला असता ?

वणवा भडकून प्रमाणाबाहेर मोठ्या परिसरात पसरल्यावर लष्कराला बोलावून हॅलिकॉप्टर ने हजारो लिटर पाणी एकदम ओतून वणवा विझवण्याचा प्रयत्न चार पाच दिवसांनी केला गेला व अपयशी ठरला काऱण प्रचंड धुरामुळे हॅलिकॉप्टर दुसरं उड्डाण भरूच शकलं नाही. हाच प्रयत्न सुरूवातीच्या एखाद दिवसात केला गेला असता तर कदाचित मर्यादित परिसरातील आगीवर यशस्वी नियंत्रण मिळवता आलं असतं.

आज हजारो हेक्टर जंगल जळत असताना प्रशासन, रोम जळताना सारंगी वाजवत बसणाऱ्या निरो प्रमाणे बसलय का ?

National Disaster Management Agencies आपल्याकडे आहेत. मग त्यांच्या सेवा राबवल्याच जात नाहीयेत का ? की त्या agencies सुद्धा असमर्थ आहेत ?

मुळात ह्या समस्येकडे आपण राष्ट्रीय समस्या म्हणून पाहतोय का ? की एका राज्यातलं जंगल जळतय नं - ठीक आहे. ती आग विझवायचे प्रयत्न करा पण त्या पेक्षा अधिक महत्व त्याला द्यायची गरज नाही अशी मानसिकता प्रशासनाच्या पातळीवर आहे का ?

कमीत कमी आता तरी युद्ध पातळीवर प्रयत्न करून ही आग विझवणं अत्यंत गरजेचं आहे.  कारणांचा पंचनामा नंतर करता येइल.

ते करताना सुद्धा एकमेकाना दोष देण्याचा पुरातन खेळ खेळण्यापेक्षा अशी परिस्थिती परत उद्भवू नये आणि जर उद्भवलीएच तर कमीत कमी हानी कशी होइल यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे.

या वणव्याच्या हिमनद्यांवर होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामांबरोबरच तेथील एकंदर परिस्थितीकी ज्यात वनस्पती, प्राणी, मानव सर्वच येतात त्यांच्यावरील नजीकच्या व दूरच्या भविष्यात होणारे परिणाम, एका संपूर्ण राज्यातील या परिस्थितीमुळे देशाच्या एकंदर पर्यावरणावर होणारे परिणाम व त्यावरील शक्याशक्य उपाय योजना या बद्दल विचार आत्तापासूनच व्हायला हवा.

जर कुणी वैयक्तिक स्वार्थासाठी हे करत असेल तर त्यांच्या विरुद्ध कडक उपाययोजना आणि त्याहून महत्वाचं त्या विरोधात जागरूक जनमत तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न हवेत.

मात्र यासाठी सगळ्यात आधी आपली मानसिकता व प्राथमिकता बदलायला हव्यात.

-- मनिष मोहिले 

Thursday, April 21, 2016

हिरवी नव्हाळी तुझ्या यौवनाची
स्पर्शून अवखळ हवा वाहते
दवबिंदू पडता कायेवरी तव
जणू कोवळी पालवी शहारते

तुझ्या पावलानी नाजूक गुलाबी
पूर्वेच्या गाली उषा लाजते
जादू अशी सोनपिवळ्या उन्हाची
हळद लेवूनी नववधू साजते

कधी धुंद मोहरल्या सांजसमयी
तुझ्या स्वरात अलगूज मनी वाजते
मीलनास आतूर अभिसारिका ती
शुक्र चांदणी क्षितिजी भेटते

लाजरा तुझा स्पर्श जागता मनी
रोमरोमातूनी सतार झंकारते
इथेतिथे सर्वत्र दिसशी मला तू
तुझे रुप मजला नादावते

---- मनिष मोहिले

Tuesday, March 29, 2016

सोसवेना

सोसवेना चांदणे
चंद्र तू पदरात घे
सोसवेना गीत हे
परि सूर कंठी राहू दे

सोसवेना सुगंध हा
तरी फूल हे माळून घे
सोसवेना झाडासी जो
तो बहर तू लेवून ये

सोसवेना प्रीत मजला
मिठीत तू ओढून घे
सुगंधी बहर चांदण्यांचा
दोघांवरी ऊधळून घे

---- मनिष मोहिले 

Sunday, March 27, 2016

आयुष्य

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो

खर्डेतल्या एका सदस्याचं हे व्हॉट्सॅप स्टेटस होतं.
आजकालच्या कुणालाही लागू होतील अशा या ओळी. त्यावरून काही ओळी मलाही सुचल्या. त्या खाली देत आहे. मात्र माझा एकंदरीत कल जे गेलं त्याचं गरजेपेक्षा जास्त  दु:ख करत बसण्यापेक्षा येणाऱ्या उद्या वर लक्ष केंद्रीत करा असा आहे. म्हणून बाकी कविता जरी मूळ ओळींशी साधर्म्य असलेल्या स्वभावाची असली तरी शेवट मी माझ्या स्वभावानुसार / कलानुसार  केला आहे.

आयुष्य

त्यागूनी मी मोह सारे यशापाठी धावलो
भोगण्या आनंद मी मग वेळ मागू लागलो

वाटले मजला अखेरी मुक्कामी मी पोचलो
हरवले वाटेत जे मी साथी शोधू लागलो

पुस्तकातील पिंपळाचे पान पाहू लागलो
शोधताना नक्षी मी जाळीत अडकू लागलो

परतूनी मी पुस्तकात मोरपीस ठेवले
स्पर्शूनी त्या मी फिरुनी मोहराया लागलो

------ मनिष मोहिले 

Wednesday, March 23, 2016

प्रीतरंग

मी रंग कसा रे खेळू कान्हा
पुसते राधा कृष्णाला
भरले सारे तुजपाशीच रे
माझ्या पाशी ना उरला

निळा रंग तव देहाचा नी
पितांबराचा हा पिवळा
कुंकुम लाल तिलक भाळी
अन् केसरिया तव शेल्याचा

माथ्यावरचे मोरपीस ते
गृह च असे साऱ्या रंगा
मी रंग कसा रे खेळू कान्हा
पुसते राधा कृष्णाला

तू राधा नी मी कृष्ण असे
की जशी सावली देहाला
रंग सर्व हे तुझेच राधे
तव प्रीतरंगी मी रंगलेला

ऐकून उत्तर कृष्णाचे
लाजली लाल गाली राधा
उरली गरज ना रंगांची नी
श्यामरंगी रंगली राधा

-------- मनिष मोहिले 

हौतात्म्य दिवस

आज २३ मार्च. हौतात्म्य दिवस. आणि कालच्याच पेपरला बातमी होती की शशी थरूर नी कन्हैय्या कुमारची तुलना भगतसिंग बरोबर केली.

त्या वरून काही ओळी सुचल्या.

भिनली होती रक्तामध्ये
देशावरली वेडी प्रीत
देशासाठी प्राण अर्पिणे
जगण्याची ही एकच रीत

होते सारे भाई बांधव
पुसे कुणी ना जात नी नाव
जुलमी ब्रिटीशांच्या रक्ताची
सर्वा होती एकच हाव

घेऊन स्वप्ने डोळ्यामध्ये
छातीशी कवटाळून गीता
फासावरही चढताना परि
ओठांवर जय भारतमाता

काय परि दुर्भाग्य आज हे
हाय कुणाशी होते तुलना
मतपेटीच्या व्यापारात
लोप पावली राष्ट्रभावना

ग्लानीतून या जागे व्हा रे
देशप्रेम नि:स्वार्थ करा रे
हितशत्रूंची खोड मोडण्या
डोळस होऊन एकच व्हा रे

होइल खरा तेव्हाच साजरा
पवित्र दिन हा हौतात्म्याचा
ना पेक्षा मग करू नका रे
उगीच तमाशा हौतात्म्याचा

---- मनिष मोहिले

प्रणय

धुंदावलेल्या प्रणयरम्य रात्री
स्पर्शसंगीताचे धुंद सूर आळवावे

तुझ्या पापणीतील अलवार तृप्ती
पुन्हा प्राशूनी मी अतृप्त व्हावे

असे धुंद व्हावे चराचर हे सारे
लक्ष तारकांनी व्योम रोमांचित व्हावे

आणि पहाटे पारिजातकाने
फुलांच्या सड्याने बहरून यावे

------ मनिष मोहिले 

Monday, March 21, 2016

बरे नाही

हे असे तुझे गं आता
वागणे बरे नाही
नजरेस मंत्रून माझ्या
नजर चोरणे बरे नाही

हे असे तुझे गं आता
वागणे बरे नाही
ओठांस निमंत्रून माझ्या
ओठ झुकवणे बरे नाही

हे असे तुझे गं आता
वागणे बरे नाही
वाचताना डोळे माझे
असे हसणे बरे नाही

हे असे तुझे गं आता
वागणे बरे नाही
तुजला माळताना मी गजरा
केस झटकणे बरे नाही

---- मनिष मोहिले 

Friday, March 18, 2016

काही शेर - एक प्रयत्न

पुरे दिन याद आती रहती हो
बस रात को मत याद आना
तुमसे मिलना जो हैं ख्वाबोंमें !
*************

शब्ददेखील झालेत आजकाल लहरी तुझ्यासारखे
जेव्हा भेटावे वाटतात, तेव्हाच करतात स्वत:ला परके
****************

धृव्वाच्या ताऱ्यापेक्षा
नशीबवान शुक्राची चांदणी
त्याच्याकडे अढळपद एकाकी
तिच्याकडे अमर प्रेमाची कहाणी
******************

तुझ्या सहवासाचा वसंत
तुझ्या प्रेमाचा वर्षाव
तुझ्या जवळ असण्याचा शरद
तुझ्या निरोपाचा हेमंत
तुझ्या विरहाचा ग्रीष्म आणि
तुझ्या आठवणींची पानगळ

सगळे ॠतू तूच असतेस
मी फक्त दिवस जगतो
*******************

---- मनिष मोहिले 

Tuesday, March 15, 2016

वेगळाले सोहळे

वेगळे सोहळे तुजसाठी मांडले - असं कोणाचं तरी whatsapp status होतं. त्यावरून 👇

🏻वेगळाले सोहळे

मातृभूच्या रक्षणा
तू आयुष्य आहे अर्पिले
तुझियासाठी मांडले
हे वेगळाले सोहळे

टाकण्यास्तव मान तुजला
मांड मातृभूची मिळे
तुझियासाठी मांडले
हे वेगळाले सोहळे

लपेटून पार्थिव देहा
मान तिरंग्याला मिळे
तुझियासाठी मांडले
हे वेगळाले सोहळे

टाहो नाही गर्जना
सलामी तोफांची मिळे
तुझियासाठी मांडले
हे वेगळाले सोहळे

ना तुला पर्वा स्वत:ची
ना प्रियजनांची असे
काळजी घेणे तयांची
कर्तव्य आमुचे असे

कर्तव्यच्युत आम्ही अभागी
तव त्याग ना आम्हा कळे
माथी तुझिया मारतो
हे वेगळाले सोहळे

------ © मनिष मोहिले

Monday, March 7, 2016

जय गंगाजल

शनिवारी जय गंगाजल बघितला. प्रकाश झा च्या गंगाजलचं हे sequel.

गंगाजल प्रमाणेच जय गंगाजलची कहाणी फिरते आजची राजकीय सामाजिक परिस्थिती, राजकारणी, राजकारणी बनलेले गुंड, धंदेवाईक गुंड, भ्रष्ट पोलीस अधिकारी यांची मिली भगत आणि त्यातून होणारं कायदा व सुव्यवस्थेचं वस्त्रहरण आणि या सर्वात जनतेवर होणारे अत्याचार, प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांची व्यवस्थेकडूनच होणारी घुसमट आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून चित्रपटाचा climax.

जय गंगाजल मध्ये बिहार ऐवजी मध्यप्रदेशातील बांकीपूर जिल्हा आहे. साधू यादव व त्याचा मुलगा मुन्ना यादव याऐवजी बबलू पांडे व त्याचा भाऊ डबलू पांडे यांची गुंडागिरी व दहशत आहे. जनतेकडून अॅसिडचा गंगाजल म्हणून उपयोग होण्याऐवजी जनतेकडून गुंडाना फासावर लटकावून सुसाईड घोषित करणे हा प्रकार आहे आणि कर्तव्य दक्ष प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून एस पी अमित कुमार च्या ऐवजी आहे एस पी आभा माथूर.

मग इतकी साम्यस्थळे असलेला जय गंगाजल मूळ गंगाजल एव्हढा प्रभावी आहे का ? माझ्या मते याचं उत्तर जवळपास हो असं आहे.

जवळपास अशासाठी की मूळ गंगाजल मध्ये साधू यादव आणि मुन्ना यादव ज्याप्रमाणात दहशत व त्यामुळे त्याबद्दल स्वत:बद्दल तिरस्कार निर्माण करतात त्या समोर बबलू डबलू या भावांची जोडी थोडी डावी पडते. (तरीही डबलू पांडेच्या भूमिकेत निनाद कुमार खूपच प्रभावी) काही गंभीर मारधाडीच्या प्रसंगात पार्श्वभूमीला वाजणारे गाणे त्या प्रसंगाचं गांभीर्य कमी करते.

आणि तरीही दोन गोष्टींसाठी एकदा बघावा असा हा चित्रपट आहे - पहिली  प्रथमच अभिनेत्याच्या रुपात पडद्यावर दिसणारा प्रकाश झा आणि दुसरी तडफदार कर्तव्यदक्ष एस पी च्या भूमिकेतील प्रियांका चोप्रा.

एक चांगला दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा आपल्या सगळ्यानाच माहिती आहे. पण जय गंगाजलद्वारे प्रथमच त्याच्यातला अभिनेता आपल्याला भेटतो आणि आवडतो सुद्धा. एक भ्रष्ट, गावगुंडांशी साटंलोटं असणारा डी एस पी बी एन सिंग ते परिस्थितीवश भ्रमनिरास होऊन पश्चात्तप पावणारा व सत्याची आणि कर्तव्याची कास धरणारा डी एस पी बेर एन सिंग हा भावनिक आंदोलनाचा प्रवास अभिनेता प्रकाश झा ने उत्तमरित्या पडद्यावर दाखवलाय. मुरलेला पोलिसी बेरकेपणा व खाकीपणा, सुरवातीचा स्वार्थी तटस्थपणा आणि नंतरची सद्सद्विवेकबुद्धीची होणारी घालमेल आणि योग्य मार्गावर चालण्याचा निश्चय  व त्यासाठी कोणतीही किंमत चुकवायची तयारी ह्या सगळ्या गोष्टी प्रकाश झा ने सुरेख दाखवल्यायत आपल्या मुद्राभिनयातून, संवादफेकीतून.

आणि शेवटी एस पी आभा माथूरच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा - A fantabulous performance by her. एक अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका समरसून साकार करण्याची तिची क्षमता आणि आवाका वादातीत आहे हे जय गंगाजल मधल्या आभा माथूर मुळे पुन्हा एकदा निर्विवाद सिद्ध होतं.

आदर्शवादी तत्वांवर विश्वास असलेली, कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी, गुंडांशी बेधडक सामना करणारी कर्तव्यदक्ष आभा माथूर तिनी अफलातून साकार केलीये. कायद्याच्या चौकटीत राहून काम करताना व्यवस्थेकडून होणारी घुसमट, स्वत:च्याच हाताखालील कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट बेजबाबदार वृत्तीमुळे होणारा उद्वेग, त्यांना परखडपणे दिलेली समज या साऱ्या गोष्टींबरोबरच गुंडांशी त्वेषानी लढणं, धूर्त राजकारण्यांशी तितक्याच smartly deal करणं, कायद्याची व खाकीची इज्जत राखण्यासाठी प्रयत्न करणं हे भूमिकेचे सगळे पैलू तिनी सुरेखपणे दाखवलेत. पोलिसी गणवेषातील तिचा attitude आणि तिची देहबोली अफलातून.  Priyanka portrays S.P. Aabha Mathur to perfection.

कहाणीला नायक न ठेवता  नायिकाप्रधान कहाणी सांगण्याचा प्रकाश झा चा प्रयत्न यशस्वी झालाय तो प्रियांकाच्या आभा माथूरमुळे यात वाद नाही.

---- मनिष मोहिले 

Tuesday, March 1, 2016

प्रीतीची रात

पावलांनी चांदण्यांच्या
हलकेच मज समीप ये
धुंद प्रणयाच्या निशेला
सलज्जशी पहाट दे

स्मित कळीचे उमलत्या
अधरात तू लपवून ये
अधर हे तव चुंबिता
फुलून तू बहरून ये

मंद्र स्वर तू यौवनाचा
अंगांगी भिनवून घे
स्पर्श होता अलवारसा
तनी बासरी जागून दे

मिठीत ये आसुसल्या
आवेग सरीतेचा तू घे
माझ्यातल्या गे सागरा
तू बनूनी भूमी कवेत घे

---------- मनिष मोहिले 

मराठी

महिषाच्या मुखातूनी गीता, वदवते मराठी
आणि जळातून सु तत्व, तारते मराठी
नाठाळाच्या माथा काठी, हाणते मराठी
अज्ञानी भिंतीला सजीव, बनवते मराठी

सह्याद्रीला गनिमी कावा, शिकवते मराठी
अन् भगव्याला अटकेपार फडकवे मराठी
गीता रहस्य जगताला समजावते मराठी
काळ्या पाण्याला काव्याने जिंकते मराठी

शिक्षित सबला अबलेला बनवते मराठी
झडलेल्या हातांनी आनंद फुलवते मराठी
अंध समाजाला डोळस बनवते मराठी
सव्वीस यार्डांच्या विश्वा जिंकते मराठी

काव्य शास्त्र विनोदा अलंकृत करे मराठी
कालपरत्वे स्वत:ला बदलते मराठी
वैशिष्ट्य स्वत:चे परि राखते मराठी
विश्वासाठी पसायदान मागते मराठी

------ मनिष मोहिले 

Monday, February 22, 2016

तृष्णा

जेव्हा तुझा गं मुखडा
मी दर्पणी बघितला
माझ्या दिलात तेव्हा
फुलूनी वसंत गेला

जेव्हा केसात तुझिया
हा गजरा मी माळिला
तव मदिरमंद गंधाने
ऊर माझा भरून गेला

हरपून भान बसलो
जेव्हा तुझ्या मिठीत
हर एक रोम माझा
शरीरात जागून गेला

जेव्हा मी प्राशिले सखये
तव गुलपंखी अधरांना
तो मधुरस सखे माझी ग
तृष्णा वाढवून गेला

------ मनिष मोहिले 

Sunday, February 14, 2016

प्रेम कुणावरही करावं

प्रेम - प्रेम कुणावरही करावं

प्रेम आई वडिलांवर करावं
प्रेम भावंडांवर करावं
प्रेम मित्र मैत्रिणींवर करावं
प्रेम सहचरावर करावं
प्रेम अपत्यांवर करावं

प्रेम पहिल्या नजरभेटीवर करावं
प्रेम पहिल्या चुंबनावर करावं
प्रेम पहिल्या रुसव्यावर करावं
प्रेम पहिल्या मीलनावर करावं
प्रेम प्रेमात पडण्यावरही करावं

प्रेम पहिल्या पावसावर करावं
प्रेम मातीच्या सुगंधावर करावं
प्रेम उमलणाऱ्या कळीवर करावं
प्रेम कोवळ्या पालवीवर करावं
प्रेम वाळल्या पानावरही  करावं

प्रेम फुलांवर करावं
प्रेम पक्ष्यांवर करावं
प्रेम प्राण्यांवर करावं
प्रेम हिरवाईवर करावं
प्रेम निळाईवरही करावं

प्रेम सात सुरांवर करावं
प्रेम सात रंगांवर करावं
प्रेम दगडातल्या शिल्पावर करावं
प्रेम कलेवर करावं
प्रेम कलाकारावरही करावं

प्रेम देवावर करावं
प्रेम देवत्वावर करावं
प्रेम माणुसकीवर करावं
प्रेम स्वत:वर करावं
आणि प्रेम आयुष्यावर करावं
प्रेम आयुष्यावर करावं

---- मनिष मोहिले 

Sunday, February 7, 2016

पुन्हा

" पुन्हा "

रोजच्याच गुजगोष्टी करुया
अर्थ नव्हाळा त्यास देऊनी
पुन्हा नव्याने आज भेटूया
फूल प्रीतीचे हृदयी फुलवूनी

रोजचाच तो स्पर्श अनुभवू
आतुरता नव त्यात ओतूनी
पुन्हा नव्याने वाट चालूया
हातामध्ये हात गुंफूनी

रोजचेच ते गीत गाऊया
सूर आठवा त्यास देऊनी
पुन्हा नव्याने मैफिल जमवू
राग प्रीतीचा पुन्हा आळवूनी

रोजचाच सूर्यास्त पाहूया
बिलगून एकमेकांसी बैसूनी
नवदिवसाचे स्वागत करुया
परस्परांना कवेत घेऊनी

------ © मनिष मोहिले

वियोग

वियोग

करूनी जरी शकले दिलाची
गेला तुझा वियोग होता
दर्पणी माझ्या मनीच्या
मुखडा तुझा अभंग होता

बोचरा जरी काट्याप्रमाणे
सखये तुझा वियोग होता
माझिया श्वासात आठव
सुगंधी तुझा दरवळत होता

साथीची जरी तार तुटली
सखये तुझा वियोग घडता
आपुल्या प्रीतिगीतांचा
सूर मनी अबाधित होता

अश्रूंनी जरी भरले नेत्र
सखये तुझा वियोग घडता
जगतासमोरी माझा परि
मुखडा सखे हसराच होता

------ © मनिष मोहिले

Friday, January 29, 2016

कॉमन मॅन

एक ध्यान ते दिसे गबाळे
डोकीवरले केस उडाले
कमरेला धोतर कसलेले
चौकडी कोटावरती ठिगळे

भाव मुखावर वेगवेगळे
कधी अचंबित कधी कावलेले
मिश्किल हास्य कधी फुललेले
सदा उपस्थित अचूक प्रसंगे

रेषांचे हे खेळ आगळे
हास्यामधूनी व्यंग प्रगटवे
हसवत असता सत्य दर्शवे
जनांस सर्व अंतर्मुख बनवे

उलटून जाती पंच ती दशके
देशस्थिती ना मुळीच बदले
ध्यान तयाचे कारण शोधे
तपासता मन स्वरुप बदलले

व्यवस्थे हाती कळसूत्री बाहुले
अखेर त्यासी आजि कळले
रेखाटणारे हातही थकले
ध्यान गबाळे लोप पावले

परंतु जरी ते लोप पावले
अजरामर या जगती झाले
कलियुगात या लक्ष्मण रेषे
स्वमहत्व जगती ठसविले

---- मनिष मोहिले 

Sunday, January 24, 2016

सह्याद्री - स्मृतीतला सखा

मी गेली वीस वर्ष नोकरी निमीत्त अहमदाबादमध्ये आहे. Although, for all practical purposes, I got adjusted & adapted quite quickly, culturally it was difficult. कारण मराठी साहित्य, मराठी रंगभूमी, मराठी गीतं, मराठी चित्रपट या सगळ्याच बाबतीत अहमदाबादमध्ये उपलब्धतेचे वांधे होते. मात्र, सुदैवाने इथे मिळालेली  मराठी मित्रमंडळी, वर्षभरात आठ दहा मराठी नाटकं व एखाद दुसरा मराठी गाण्यांचा कार्यक्रम करणाऱ्या कलाश्री नामक संस्थेचे सभासदत्व आणि आता ऑनलाईन उपलब्ध असलेल्या पुस्तक व संगीतामुळे ही सांस्कृतिक गरज बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाली असं म्हणता येइल.

पण एका गोष्टीची उणीव अजूनही जाणवते आणि ती म्हणजे ट्रेकींग. १९८७ च्या दहावीच्या सुट्टीत मी पहिली हाइक केली आणि ती अफलातून नशा कायमसाठी माझ्यावर सवार झाली. १९९६ साली मी अहमदाबादला आलो तो पर्यंत हा छंद जोपासत होतो. साधारण ७०-८० किल्ले पाहीले. त्यातील काही तीन चार वेळा देखील. उन्हाळ्यातील जीवघेणी तहान, पावसाळ्यातील अंगावर अक्षरश: लागणारा पाऊस, थंडीतली डोंगरमाथ्यावरची थंडी अशा सगळ्या ऋतूत आम्ही हाइक केल्या आणि प्रत्येक ऋतू मधील वेगवेगळं दिसणारं सह्याद्रीचं रांगडं मर्दानी सौंदर्य आणि त्याला नाजूकपणे सजवणारी हिरवाई मनसोक्त पाहिली. एकदा अवचितपणे गारांचा वर्षाव अनुभवला. पाचेक वर्षे तर ३१ डिसेंबर ची रात्र वेगवेगळ्या गडावर घालवत आम्ही नवीन वर्षाचं स्वागत सह्याद्रीच्या कुशीत राहून केले. या गिरीदुर्ग भ्रमणातील काही संस्मरणीय स्थळे व स्मृती.

पहिली म्हणजे दहावीच्या सुट्टीतली हाइक होती किल्ले राजमाची. आम्हा सगळ्या मित्रांचा पहिलाच अनुभव. त्यामुळे लोणावळ्यावरून १६ किमी ची  सपाटीवरची ( चढ नसलेली ) वाट आम्ही पकडली. ते जंगलातून, माळावरून चालणं, आजूबाजूची निसर्गशोभा, राजमाची गावच्या लक्ष्मण उंबरे ह्यांच्या घरात रहाण्याचा अनुभव, त्यांच्याकडचं कुळथाचं पिठलं, नागलीची भाकरी, मिरचीचा ठेचा आणि ताक हे साधंच पण अतिशय रुचकर जेवण, श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन बालेकिल्ल्यांवरची भटकंती, मनरंजन वरून बघितलेला सूर्यास्त, रात्री खळ्यात बसून केलेल्या बिबट्याच्या गोष्टी, उतरताना कर्जत बाजूला सतत अडीच एक तास  उतरत राहिल्यामुळे व पहिलीच वेळ असल्यामुळे दुखणारे गुडघे - आजही सगळं मनात तस्संच्या तस्सं ताजं आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यान्शी पहाडांशी ओळख करून देणारी नी त्यांचा लळा लावणारी आमची पहिली हाइक - पहिलीच म्हणून चिरकाल स्मृतीत ताजी राहिलेली.

त्यानंतरची स्मरणात रहाणारी हाइक भीमाशंकरची. कर्जत वरून भीमाशंकर  ला जायला तीन वाटा - पाच तासाची गणेश घाटाची किंवा कमी वेळ घेणाऱ्या पण चढणीच्या दोन वाटा - शिडीचा रस्ता अथवा ओघळाचा रस्ता. आम्ही शिडीच्या वाटेनी वर चढलो होतो. छातीवर येणारे चढ, काही ठिकाणी खोल दरीच्या काठानी वळून जाणारी वाट, अडचणीच्या दोन जागी चढण्यासाठी रोवलेल्या ओबडधोबड शिड्या, सर्वदूर दिसणारं सह्याद्रीचं रांगडं  हिरवंगार सौंदर्य, दमछाक करायला लावणारा शेवटचा अर्ध्या तासाचा चढ आणि तो संपताच लागणाऱ्या तळ्याच्या काठी पालथं पडून तोंड लावून गटगट प्यायलेलं पाणी.

मग भीमाशंकराचं दर्शन घेउन भीमेचं उगमस्थल पाहून आम्ही परतलो ते ओघळाच्या वाटेनी. पावसाळ्यात ज्या वाटेनी ओढे व नाले वाहतात ती ही वाट म्हणून ओघळाची वाट.  मोठमोठे धोंडे अस्ताव्यस्त पडलेले, असमान उंचीच्या नैसर्गिक पायऱ्या, कुठे कुठे तर पुरूष उंचीच्या - अशा त्या वाटे भोवती घनदाट जंगल. त्यात आम्ही बघितलं एक कोळ्याचं जाळं जे जमिनीपासून माझ्या डोक्यावर फूटभर उंच होतं. सापाची कात पाहिली आणि पाहिली देवखार - Giant Flying Squirelle - that too in action - पुढच्या पायापासून मागील पायापर्यंत शरीराला जोडून असलेले कातडे पसरून त्याचा तरंगण्यासाठी उपयोग करत एका झाडावरून दूरवरील दुसऱ्या झाडावर उडी घेताना.  माझ्या मनावर कायमसाठी कोरला गेलेला चित्रसंस्कार. अजून एक अविस्मरणीय हाइक.

असेच एकदा पावसाळ्यात मी, रोहित आणि अमित आम्ही तिघं तिकोन्यावर गेलो होतो. काही कारणानी आम्हाला उशीर झाला आणि संध्याकाळी सूर्य मावळताना आम्ही गडावर पोचलो. खाली धरणाच्या पाण्याचा विस्तार मावळत्या किरणात सोन्याचा मुलामा बनून पसरला होता. अंधार पडायच्या आत आम्ही गुहेपाशी पोचलो आणि पायऱ्यांच्या जवळच असलेल्या त्या गुहेत वटवाघळांच्या विष्ठेचा असहनीय दुर्गंध आम्हाला आला. आता इथे रहाणे शक्य नव्हते म्हणून आम्ही तसेच वर माथ्यावर असलेल्या शंकराच्या एका छोट्याशा देवळाकडे आसऱ्यासाठी निघालो आणि पावसानी आम्हाला गाठलं. सह्याद्रीतला तो अचाट पाऊस - त्यानी आम्हाला उभं आडवं तिरपं झोडपून काढायला सुरूवात केली. मुश्किलीनी अंधारात धडपडत आम्ही देवळाजवळ  गेलो तर देऊळ म्हणजे एक अगदी छोटी खोली जिच्या तीन बाजूला भिंती आणि चौथ्या बाजूला बिन दरवाजाचं दार. मध्य शंकराची पिंड आणि दाराच्या समोरच्या भिंतीवर एक मोठा झरोका. त्या उघड्या डोंगरमाथ्यावर त्या अफाट कोसळणाऱ्या पावसात तेव्हढाच आडोसा होता आम्हाला. आम्ही नखशिखांत चिंब भिजलेले. प्लॅस्टीकच्या आवरणाखालूनही सॅक्स भिजलेल्या. तरीही पूर्ण ओलं रहायचं नाही म्हणून अर्धवट ओल्या टॉवेल्सनी अंग पुसून अर्धे कोरडे अर्धे भिजलेले कपडे अंगावर चढवून आम्ही गुडघ्यांस मिठ्या मारून बसलो. जेवण बनवण्यासाठी जवळ शिधा होता, पावसाळा म्हणून स्टोव्ह होता पण काड्यापेटी ओली झालेली. आम्ही तिघेही सिगरेट न पिणारे. त्यामुळे लायटर नाही. शेवटी तसंच उपाशीपोटी झोपण्याचा निर्णय घेतला.

पण उघड्या डोंगरमाथ्यावरचा तो कोसळणारा प्रचंड पाऊस, सुसाट वाहणारा वारा आणि कडाडणाऱ्या विजा झोप लागू देइनात. त्यातोन उघड्या दारातून आणि झरोक्यातून पावसाचे तुषार आत येत होते. झरोक्यातून आत येणारा वारा घूं घूं असा हॉरर मूव्हीत शोभणारा आवाज करत अथक वहात होता. तशाही स्थितीत आमच्या या अवस्थेला हसत आम्ही गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होतो पण पावसाचे थंडगार तुषार, बर्फाळ गार वारा आणि पावसाचं थैमान यामुळे गारठून जाऊन थोड्याच वेळात आम्ही गप्प झालो आणि मुटकुळं करून त्यातल्या त्यात ऊब मिळवायचा प्रयत्न करत उपाशीपोटी झोपायचा प्रयत्न करत राहिलो. पण झोप कशी येणार ? कितीतरी वेळ ते थैमान ऐकत तसेच कधीतरी ग्लानीत झोपलो. सकाळी जाग आली तर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. रात्री जणू काही घडलच नव्हतं रात्री इतकं स्वच्छ वातावरण.  आम्ही लगेच खाली उतरलो आणि पहिल्या गावी बकाबका चहा बिस्कीटं खाऊन पोटाला आधार दिला आणि मग परतीचा प्रवास.  आश्चर्य म्हणजे जवळपास रात्रभर भिजलेल्या अवस्थेत काढून देखील आम्हा तिघांपैकी कोणालाही साधं पडसं सुद्धा झालं नाही.

पण अशी भयंकर रात्र मी अजूनपर्यंत दुसरी अनुभवली नाही. पण ह्यामुळे डोंगर दऱ्यान्वरचं आमचं प्रेम जराही कमी झालं नाही. उलट त्या अनुभवानी आम्हाला ताकद दिली - अधिकाधिक हाइक्स करण्याची.

(क्रमश:)

------ मनिष मोहिले

तिकोन्याच्या त्या पावसाळी हाइक नंतरची दुसरी लक्षात रहाणारी हाइक म्हणजे राजगडची. ही हाइकपण आम्ही पावसाळ्यात केली होती. पुण्याला मंदार नावाच्या माझ्या मित्राच्या घरी आम्ही तीन मित्र जमा झालो. चौथा एक मित्र रात्री येणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही राजगडला जायला निघणार होतो. जो चौथा मित्र येणार होता तो मोठी सॅक आणणार होता की ज्यात आमच्या दोघांचं सामान राहील. त्या मित्रानी आयत्या वेळी टांग दिली आणि अस्मादिकांवर सुटकेस घेऊन राजगड चढण्याची पाळी आली.  त्यातून मी शहाणपणा करून स्लीपर्स घातल्या होत्या. वाजेघर हून पाली दरवाजाच्या सोप्या रस्त्यानी आम्ही चढणार होतो हीच त्यातल्या त्यात जमेची बाब. एकीकडे आयत्या वेळी टांग दिलेल्या मित्राला शिव्या घालता घालता सुटकेस हातात घेऊओन चढताना स्वत:वर हसू पण येत होतं. सुदैवाने वर पोचेपर्यंत पर्जन्यराजाने मेहरबानी केली आणि आम्ही पद्मावती माचीवर पद्म्वावती देवीच्या देवळात पोचलो. तो दिवस आणि दुसरा दिवस मात्र गडावर अफलातून मजा आली. ऐन पावसाळ्यात राजगडावरून दिसणारा हिरवागार आसमंत, तोरणा, सिंहगड, राजगडाची मोक्याची जागा, स्वत: राजगडाचं नैसर्गिक बेलागपण, त्याच्या तीन सोंडा आणि त्याना तटबंदी बांधून बनलेल्या पद्मावत्ती, सुवेळा आणि संजीवनी माची, संजीवनीची चिलखती तटबंदी, सुवेळावरचं नेढं (डोंगरास आरपार असलेलं नैसर्गिक भोक) या सगळ्या गोष्टी बघता महाराजांच्या दूरदृष्टीपुढे आपण आपोआप नतमस्तक होतो. आणि सगळ्यात कमाल गडाचा बालेकिल्ला. उभ्या कड्यात फक्त हाताच्या आणि पायाच्या बोटाना जागा मिळेल अशा खोबण्या करून बनवलेला रस्ता हा वर जायचा एकमेव मार्ग. पहिली पंचवीस वर्ष स्वराज्याची राजधानी असलेला - गडांचा राजा आणि राजांचा गड. मराठेशाहीच्या इतिहासातील एक अद्वितीय तीर्थक्षेत्र. ते दोन दिवस आम्ही पूर्ण भारावून गेलो होतो. उतरायच्या वेळेला तर आम्ही चोर दरवाजाच्या अवघड वाटेनी उतरलो - माझ्या स्लीपर्स व सुटकेस सहित.

नंतरची स्मरणीय हाइक म्हणजे गडदच्या भैरीची. गडद म्हणजे गुहा. गुहेतील भैरोबा. ढाकच्या किल्ल्याला लागून भैरीचा सुळका आहे आणि ढाकच्या किल्ल्याच्या एका बाजूस उभ्या कड्यात असलेल्या नैसर्गिक गुहेत ह्या भैरीचा मुक्काम आहे.

कर्जतजवळील वदप गावावरून साधारण अडीच तीन तासाच्या छातीवर येणाऱ्या चढानंतर येतं गारूबाईचं पठार. तीनेक  किलोमीटर लांबीच्या या पठाराच्या वदप बाजूकडे टोकावर गारूबाईचं देऊळ आहे. उजव्या हाताला ढाकचा किल्ला आहे. त्याला समांतर चालत राहीलं की साधारण तासाभरानी आपण ढाकचा किल्ला आणि भैरीचा सुळका यामधील फटीत येतो. डावीकडे भैरीचा सुळका व उजवीकडे ढाकचा किल्ला यामधून एक साधारण सत्तर ऐंशी फुटाचा एक उतार आहे ज्यावर "स्क्री", म्हणजे ज्यावरून पाय सहज सरकतात असे मातीचे बारके खडे, आहे. हा उतार जिथे संपतो तिथे जेमतेम तीन साडेतीन फुटाची जागा आहे नी त्यानंतर काही शे फुट खोल दरी. जर चुकून पाय घसरला तर स्क्री वर ब्रेक लावणं अत्यंत मुश्किल. मग ती तीन फुटी जागा आपली घरंगळणारी गाडी थांबवायला तशी निरुपयोगीच. तिथपर्यंत आलं की उजवीकडे ढाकच्या किल्ल्याच्या नैसर्गिक भिंतीवर ट्रॅव्हर्स करत जावं लागतं - जवळपास पन्नास साठ फूट. समोर दगडी सपाट कडा आणि पाठीशी काहीशे फूट खोल दरी. पाय ठेवायला जेमतेम पायाची बोटं मावतील अशी ledge. तो पार करायची एकच पद्धत -  दरीकडे पाठ करून कड्याच्या भिंतीवर हात टेकायचे आणि एक एक पाऊल सरकत जायचं. नजर ज्या बाजूला जायचं तिकडे. उगीच खाली बघून आत्मविश्वास डळमळीत करण्यात काय फायदा ?

हा रस्ता पार केला की जरा मोकळा श्वास घेण्यासारखी जागा येते. त्यानंतर येतो एक रॉक पॅच. तो चढून वर गेलं की शेवटचं दिव्य समोर येतं - एका छोट्या खड्ड्यात एक झाडाचं खोड रोवलेलं आहे - पंधरा वीस फूट . त्याच्या दोन्ही बाजूस वर खाली फांद्या आहेत ज्याचा उपयोग पायऱ्या म्हणून व हात धरण्यासाठी करता येतो. ते खोड जिथे संपते तिथे अजून वर चढण्यासाठी एक वेल त्या खोडाला बांधलेली असते जिचे वरचे टोक गुहेत बांधलेले आहे. खोड चढून वेल लागला की वेल हातानी पकडून समोर कड्यावर पाय ठेवत वर जायचं हे सर्व चढून जायचं समोर कडा नी पाठीशी दरी घेऊन. इथे चुकीला जागा नाही. पण हे सगळं पार करून वर गेल्यावर स्वत:वरच आपण खूष होतो आणि आपल्याला बक्षीस मिळतं गुहेतून दिसणाऱ्या विहंगम दृष्याचं आणि गुहेच्या टाक्यातील थंडगार गोड पाण्याचं. तिथेच पाठपिशवीतून आणलेलं जेवण जेवावं आणि ते पाणी पिऊन तृप्त व्हावं. दरवर्षी भरणाऱ्या जत्रेला गावकरी पाठीला बळीचा बकरा बांधून चढतात. शिवाय दर ठराविक काळानी ( मला वाटतं वर्षभरानी ) ते खोड आणि वेल बदलण्याचा कार्यक्रम असतो.

तर असा हा थरारक गडदचा भैरी. ह्या जागी मी तीनदा जाऊन आलो आहे आणि पहिल्या दोन्ही वेळा अतिशय सहजपणे मी वर चढलो आणि उतरलो. तिसऱ्या वेळी चढताना सहज वर गेलो पण उतरताना काय माहिती कसा काय्व्पण त्या वेलावर एके ठिकाणी मी अडकलो - म्हणजे पुढची स्टेप नक्की कुठे कशी खाली टाकावी ह्या संभ्रमात पडलो. अशा जागी जो पर्यंत तुम्ही निर्णयाबद्दल नक्की नसता तो पर्यंत पाऊल पुढे टाकण्यात अर्थ नसतो. त्या मुळे मी तिथेच वेलीला धरून पाय कड्यावर, पाठीला सॅक आणि खाली दरी अशा त्रिशंकू अवस्थेत लटकलो. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी हाताला रग लागायला लागली. कितीही नाही बघायचं ठरवलं तरी लक्ष खाली दरीकडे जाऊ लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून आत्मविश्वास डळमळला आणि माझे पाय थरथर कापायला लागले. बरं त्या वेलावर एकावेळी एकापेक्षा अधिक व्यक्ती येणं शक्य व योग्य नसल्याने माझे मित्रपण वरून किंवा खालून सूचना देण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. अखेरीस जवळपास आठ दहा मिनीटानंतर ( हा कालावधी नंतर मित्रांनी सांगितल्यावर कळला - माझ्यासाठी ती कित्येक युगं होती ) मी कसंतरी स्वत:ला सावरलं आणि हिय्या करून पुढचं पाऊल टाकलं. त्या एका पावलाचीच गरज होती कारण पुढील मार्ग मी परत सराइतपणे पार करून खाली आलो. पण आजही माझ्या डोळ्यापुढे ती वेलावर लटकताना खाली खोल दिसणारी दरी येते.

त्यानंतरही मी अनेक हाइक्स केल्या. कित्येक नवीन वर्षं गडावर साजरी केली. पुढे नोकरीच्या निमीत्ताने गुजरातमध्ये आलो आणि सह्याद्रीची साथ सुटली.

पण आजही ते काळे कभिन्न डोंगर कडे, ती माती, दाट झाडी, रणरणत्या उन्हातील दमवणूक नी तहान, वर पोचल्यावर प्यायलेलं टाक्यातलं थंडगार पाणी, सर्वांगाला सुखावणारा गार वारा, झोडपून काढणारा पाऊस, धबधब्या खाली केलेल्या आंघोळी, तीन दगड मांडून केलेली चूल आणि त्यावरचं मसाला खिचडी किंवा कांदा बटाटा रस्सा भाजी नी भातचं जेवण, गडाच्या कानाकोपऱ्यातून आपल्यात भिनणारा महाराजांचा इतिहास, सूर्यास्ताच्या वेळी गडमाथ्यावर बसून गायलेल्या जय जय महाराष्ट्र माझा आणि वेडात मराठे वीर दौडले सात चे दऱ्याखोऱ्यातून घुमून येणारे प्रतिध्वनी आणि निसर्गाच्या रौद्र पण तरीही सुंदर रुपाच्या सान्निध्यात ते ऐकताना इतिहासाच्या स्मरणाने अंगावर उभे राहिलेले रोमांच - सग्गळं सगळं माझ्या स्मृतीत चिरतरुण असल्या प्रमाणे ताजं आहे आणि ताजा आहे माझा स्मृतीतला सखा - सह्याद्री.

---- मनिष मोहिले


Thursday, January 21, 2016

अवचित केव्हा

अवचित केव्हा नभी पहाता
शुक्रचांदणी लुकलुकताना
वाटे हृदया अर्थ गवसला
आयुष्याचा धुकधुकताना

वरील ओळींवरून मला सुचलेली कविता

अवचित केव्हा उरात भरता
श्वास तुझा ग बकुळ फुलांचा
कळले हृदया फुलून उमलता
करतो काय वसंत कळ्यांना

अवचित केव्हा चालत असता
हात तुझा हाती घेताना
वाटे हृदया मैत्र मिळाला
हात धरून तो सावरणारा

अवचित केव्हा तुला बिलगता
श्रावणसरीत चिंब भिजताना
ऊब प्रीतीची सुखवी मनाला
इंद्रधनू हृदयी फुलताना

अवचित तू मज मिठीत येता
अन् ओठांशी ओठ भिडताना
वाटे मजला सूर मिळाला
मौनामधल्या प्रेमगीताना

---- मनिष मोहिले 

Monday, January 11, 2016

नटसम्राट

काल नटसम्राट बघितला. चित्रपट पाहून बाहेर पडताना संमिश्र प्रतिक्रिया मनात येत होत्या.

म्हणजे "कट्यार" बघून बाहेर पडताना जसा मी त्या चित्रपटानी पूर्णपणे भारावून जाऊन बाहेर पडलो होतो तसं "नटसम्राट" पाहून बाहेर पडताना नाही वाटलं. हो, निश्चीतपणे काही प्रसंग डोक्यात पक्के बसले होते, डोळ्यासमोर घोळत होते पण एक परिपूर्ण चित्रपटानुभव जसा "कट्यार" नी दिला तसा "नटसम्राट" नी नाही दिला एव्हढं खरं.

आता तुम्ही म्हणाल की दोन सर्वस्वी वेगळ्या धर्तीच्या चित्रपटांची तुलना मुळातच कस करावी ? आता हे जरी मान्य की दोन्ही सर्वस्वी भिन्न स्वभावाचे चित्रपट आहेत तरी एक समान धागा आहे आणि तो म्हणजे दोन्ही चित्रपट हे दोन गाजलेल्या प्रथितयश नाटकांची चित्रपट रुपांतरे आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणात तुलना होणे अपरिहार्य आहे.

तर माध्यम बदलल्यामुळे पटकथेमध्ये काही बदल होणे हे स्वाभाविक असले तरी ते मूळ संहितेपासून किती फारकत घेतात हे बघणे आवश्यक असते. कट्यार मध्ये पटकथेत जे स्वातंत्र्य घेतले आहे ते फक्त चित्रपटासारखं एक नाटकापेक्षा अधिक लवचिक माध्यम हाती लागल्यामुळे काही जास्तीची दृष्ये, काही प्रत्यक्ष स्थळावरची दृष्ये, काही नवीन गाणी या स्वरुपात आहे आणि ते मूळ नाट्यसंहितेला धोका न पोचवता चित्रपटाच्या माध्यमातून कथा अधिक परिणामकारकपणे पुढे नेण्यास मदत करते.

नटसम्राट च्या बाबतीत असं होताना दिसत नाही. मूळ नाटकात नसलेली राम ही मित्राची भूमिका चित्रपटात आहे . एका सहकलाकार मित्राच्या नजरेतून गणपतराव बेलवलकरांची ओळख करुन द्यायचा प्रयत्न हे कारण जरी गृहीत धरलं तरी त्या जीवश्च कंठश्च मित्राच्या मनात परस्पर तुलना व गणपतराव नटसम्राट असण्याबद्दल शंका असणं आणि तरीही त्यांची इतकी दाट मैत्री असणं पटत नाही. एक मात्र नक्की की पटकथेत या  उपऱ्या असणाऱ्या भूमिकेला विक्रम गोखलेनी आपल्या जबरदस्त व सहज अभिनयानी पूर्ण न्याय देऊन ती विश्वासार्ह बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

तशीच अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे ज्या अनोळखी सिद्धार्थ बरोबरच्या गप्पातून चित्रपट पुढे सरकतो त्या अमेरिकेहून परत आलेल्या मुलाची एका चहाच्या टपरीवर गणपतरावांशी ओळख होते आणि तो त्यांच्या मागे लावतो यासाठी टपरीमध्ये एखाद दोन स्वगतं घालणं कदाचित संयुक्तिक ठरलं असतं व अधिक पटलं असतं.

त्याचप्रमाणे कलाकाराची मनस्विता व बेभानपणे मनात येइल ते करुन टाकण्याची वृत्ती दर्शविण्यासाठी जे प्रसंग दाखवले आहेत त्यातील काही मनाला खटकतात. उदाहरणार्थ मुलाबरोबर घरात रहाताना सुद्धा बाहेर उधारी करणे, स्वस्त प्रतीच्या दारुच्या गुत्त्यावर जाणे. मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी, हातभट्टीची दारु गाळणाऱ्या गुंडाबरोबर बसून भरमसाठ दारु पिऊन पार्टीत येणे या प्रसंगात गणपतरावांबद्दल सहानुभूती वाटण्या ऐवजी त्यांच्या अपत्यांची बाजू बरोबर वाटते आणि त्यामुळे पुढील शोकांतिकेची परिणामकारकता कमी होते. त्या ऐवजी सुनिल बर्वेचा समंजस जावई मनाला अधिक पटतो.

मात्र मुलीकडे चोरीचा आळ येतो त्या प्रसंगापासून मग शेवटपर्यंत चित्रपट चांगली पकड ठेवतो.

बाकी अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वानी आपापल्या भूमिका उत्तम निभावल्यात असं मला वाटतं. विशेष करून सरकारच्या भूमिकेत मेधा मांजरेकर व विद्याच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे उल्लेखनीय.  सुनिल बर्वे छान.

आणि मग उरतात दोन दिग्गज कलावंत - विक्रम गोखले आणि नाना पाटेकर.

राम्या च्या भूमिकेत विक्रम गोखलेनी जान ओतलीये. आपल्या प्रथितयश नटसम्राट मित्राचा खास मित्र, त्याच्याबरोबर कळत नकळत स्वत:ची तुलना, तरीही मित्राबद्दलचं प्रेम, जागरुक व्यवहारी सल्ले, बायको गेल्यानंतरचा आतून मोडून पडलेला राम आणि शेवटी मृत्यूशय्येवर स्वत:च्या अभिनय सामर्थ्याची चुणूक दाखवणारा राम विक्रम गोखलेनी प्रचंड ताकदीने उभा केलाय.

आणि शेवटी नटसम्राट गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेत नाना - तो अक्षरश: भूमिका जगलाय. त्याचा चेहरा, डोळे, हावभाव, हातवारे, देहबोली - सगळ्या सगळ्यातून आपल्याला गणपतराव दिसतात. आणि अभिनयाच्या या सर्व हत्यारांपेक्षा एक अत्यंत प्रभावी हत्यार नानाने अतिशय प्रभावीपणे वापरलय आणि ते म्हणजे आवाज - त्याचे आवाजातील चढ उतार, बोलण्याची पद्धत , ढब आणि विशेष करून त्याचे नाटकातील उतारे - पडद्यावर चित्र नसेल आणि बंद पडद्या आडून निव्वळ नानाला ऐकवला तरी त्या नटसम्राटाची व्यथा आपल्यापर्यंत पोचेल अशा ताकदीने नानाने गणपतराव उभा केलाय ( पडद्यावर श्रेयनामावली येतानाचा नानाच्या तोंडचा संवाद हा याचा पुरावा म्हणता येइल ) आणि म्हणूनच काही प्रसंग खटकून देखील नानामुळे आपणास एकंदर चित्रपट पहाण्यायोग्य वाटतो. Hats off to Nana.

शेवटी माझ्यासमोर घोळतायत विक्रम गोखले आणि नानाचा रामच्या मृत्यूशय्येवरचा सीन, गणपतराव सरकाराना त्यांनी न पाहिलेल्या नाटकातील संवाद म्हणून दाखवतात तो सीन, नाटक पहायला गेलेले गणपतराव सर्व विसरून प्रेक्षागारातच ऑथेल्लो बनतात तो सीन, कुणी घर देतं का मधला रस्त्यावरच्या कुत्र्याला कुरवाळणारा नाना आणि शेवटचा मी आहे ऑथेल्लो, मी आहे प्रतापराव ..... आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर - नटसम्राट हा सीन.

ही काही दृष्ये आणि विक्रम गोखले व नाना पाटेकर यांच्यासाठी एकदा बघावाच असा नटसम्राट.

------ मनिष मोहिले 

Tuesday, January 5, 2016

अहल्या - a short film

अहिल्या - रामायणातील अहिल्येची कथा सर्वांनाच माहिती आहे. ब्रम्हदेवानी उत्पन्न केलेली अहिल्या ही जगातील सर्वात सुंदर स्त्री. तिच्यापेक्षा वयानी पुष्कळ मोठ्या असलेल्या गौतम ऋषींबरोबर तिचा विवाह झाला.  अहिल्येच्या सौंदर्याचा इंद्राला मोह पडला आणि गौतम घरात नसताना गौतम ऋषींच्या रुपात जाउन इंद्रानी तिचा उपभोग घेतला. असं म्हणतात की अहिल्येनी गौतमाच्या रुपातील इंद्राला ओळखून देखील त्याच्याशी संग केला. आपल्या तपोबलाने सर्व जाणून घेतलेल्या गौतम ऋषींनी दोघांनाही शाप दिला. इंद्राच्या शरीराला क्षतं पडली तर अहिल्येला त्यांनी शिळा बनवली. नंतर रामाच्या पदस्पर्शानी अहिल्येचा उद्धार झाला ही सर्वज्ञात कहाणी.

दिग्दर्शक सुजॉय घोषच्या "अहल्या" या लघुपटात देखील हीच तीन पात्र आहेत. एखाद्या व्यक्तीची हुबेहुब मातीची छोटी प्रतिमा बनवणारा प्रसिद्ध आणि वृद्ध शिल्पकार गौतम साधू, त्याची तरुण व मादक पत्नी अहिल्या आणि इनस्पेक्टर इंद्र सेन.

अर्जुन नामक एक तरुण मॉडेल नाहीसा झाल्याच्या संदर्भात चौकशी साठी इनस्पेक्टर इंद्र सेन गौतम साधूच्या घरी येतो. तिथे त्याला म्हाताऱ्या गौतम साधूची तरुण सुंदर मादक पत्नी अहिल्या पण भेटते. तिथेच त्याला अर्जुनची छोटी मृत्तिकाकृती देखील दिसते. गौतम अर्जुनची प्रतिमा बनवल्याचे मान्य करतो. त्याचबरोबर तो इंद्रसेन ला एका ग्लास कव्हर खाली ठेवलेला दगड दाखवून सांगतो की अर्जुन नी ह्या चमत्कारी दगडाचा वापर करुन रुप बदललं असावं कारण ह्या दगडातील जादू मुळे त्याला स्पर्श करणारा ईच्छित रुप घेउ शकतो. इंद्रसेन विश्वास ठेवत नाही तेव्हा तो त्याला त्या दगडाचा वापर करुन अहिल्येसमोर गौतम म्हणून जायला सांगतो. इंद्रसेन अहिल्येसमोर जातो तर ती त्याला आपला पती म्हणून सेड्यूस करते. अहिल्येच्या मादक सौंदर्याच्या मोहात पडलेला इंद्रसेन मिळालेल्या संधीचा फायदा घेत आपली भूमिका चोख बजावतो.

नंतर काय होतं ? गौतम साधूला हा व्यभिचार कळतो ? कळल्यावर तो दोघाना काय शिक्षा देतो ? या आधुनिक वळणाच्या कथेचा शेवट काय होतो ? त्यासाठी "अहल्या" हा लघुपट पहा.

फक्त चौदा मिनीटांचा हा लघुपट सुजॉय घोष नी सुरेख हाताळलाय. इतक्या कमी वेळात एखादी कथा चित्रपट माध्यमातून सादर करताना अतिशय प्रभावीपणे पकड सुटू न देता, घाईगर्दी न होऊ देता सर्व बारकाव्यांनिशी कथा पूर्ण करायची आणि प्रेक्षकांपर्यंत पोचवायची यासाठी दिग्दर्शक तेव्हढ्या ताकदीचा हवा. सुजॉय घोष नी या बाबतीत पूर्ण न्याय दिला आहे.

त्याच बरोबर ती कथा  प्रभावीपणे साकार करणारे कलाकार ही हवेत. सौमित्र चॅटर्जी,  तोता रॉय चौधरी आणि राधिका आपटे तिघांनीही आपापली कामं चोख बजावली आहेत.

मुख्य म्हणजे ह्या लघुपटाचं casting उत्कृष्ट आहे. तिघंही जण आपापल्या भूमिकेत शोभतात. वृद्ध पण तरीही जीवनासक्त गौतम साधू म्हणून सौमित्र चॅटर्जी, तरणाबांड तडफदार व अहिल्येच्या सौंदर्याच्या मोहात पडलेला इंद्र सेन म्हणून तोता रॉय चौधरी आणि  विशेष करून अहिल्या म्हणून राधिका आपटे.  She looks so tempting & desirable as Ahalya & does justice to the title role merely by her seductiveness.

लघुपटात धक्का तंत्राचा सुरेख वापर केलेला आहे सुजॉय घोष नी आणि एका वेगळ्याच पद्धतीने पुराणातील एक कथा आधुनिक पद्धतीने आपल्या समोर मांडली आहे.

पंधरा मिनीटे वेळ काढून जरुर पहावा असा लघुपट - अहल्या.

------ मनिष मोहिले