Tuesday, December 26, 2017

MADHAVRAO - an amazing complete food experience

MADHAVRAO - the all capital but not bold, slick wooden font in the front, with the mildly lit up back ground of two storeys, looks absolute classy - a statement in itself depicting the classy ambience one is about to experience upon entering this amazing restaurant - MADHAVRAO - offering authentic Marathi cuisine in the heart of Gujarat.

The interior of both the floors is done very tastefully which takes you back into time with rich heavy wooden furniture, a prominent wooden stair case leading up to the first floor, the antique fashioned glass covers of the lamps - हंड्या & the chandelier - झुंबर - and of course a very spacious seating of more than 125 people spread over ground & first floor, giving space & privacy to each table - reminding you of the पेशवाई थाट & establishes that पेशवाई connection with the name - MADHAVRAO. In this superb peshwai style interior, the modern comforts & amenities are taken care of, without disturbing the look & balance. The look & ambience enhances your expectations about the cuisine, you are about to savour.

And it does deliver & delivers it to the T - going beyond expectations.

It is said that you can enjoy food with all your five senses. MADHAVRAO ensures this fully.

It starts with the sight - every food item being served in the old styled metal dishes, looking authentic every single bit - be it the classic Mumbai street food -  the perfectly fried बटाटेवडा or the कोल्हापुरी मिसळ with delicious red curry emitting heat merely from its sight  or the Home made type crispy light थालीपीठ, the yummy looking heap of झुणका & the super soft भाकरी layered with delicious ghee, the tasty accompanying drinks like पियुष, सोलकढी or ताक & the grand culmination in the form of wonderful desserts like the yummy  मोहनथाळ cooked in desi ghee as well as the ultimate combination of मालपुआ & रबडी.

The aroma of the different yummy food items filling the nostrils & igniting that hunger fire in your belly.

The light crackle of the थालीपीठ declaring its super light crispy texture serving to your hearing senses.

The pleasure of picking all these things with your hands & experiencing the textural tasty stuff.

And above all, the very delicious, very yummy, very authentic taste dancing on your palate & giving you that wonderful satisfaction of having delicious delicious food , satisfying your taste buds & making the experience complete.

From the menu card, only a few items have been sampled and the rest like भाजाणीचे वडे, वांग्याचे काप, भात, सोलकढी, बटाटा भाजी, उपासाचं थालीपीठ and of course the peshwai special श्रीखंडे पुरी बटाट्याची भाजी are yet to be tasted & are calling us for another visit to this wonderful place - as a happy foodie & a regular client, once the place starts operating commercially.

The crowning glory is the fact that a मराठी माणूस has ventured into a territory which does not see many of marathi people & has made the entry with grandeur.

Hats off to the efforts put in by Chaitanya for so much of detailing & for realising his dream & making it become reality.

There can't be a gift better than the name MADHAVRAO - being displayed so elegantly at one of the best locations of the city, that a son can give to his father.

Thank you MADHAVRAO, Sushma vahini, Jasmine & of course Chaitanya and all the very best to you.

May MADHAVRAO attain the same glory, fame & status on the canvas of Ahmedabad food world, the way Peshwe MADHAVRAO attained in the Maratha empire.

- Manish Mohile

Sunday, December 3, 2017

लव्हींग व्हिन्सेंट

लव्हींग व्हिन्सेंट

आधुनिक चित्रकलेचा जनक मानल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध व्हिन्सेंट वॅन गॉग नी आपल्या अवघ्या सदतीस वर्षाच्या आयुष्यात, सुरूवातीला  अनेक क्षेत्रात अपयशी ठरल्यावर; फक्त शेवटच्या आठ वर्षात चित्रकलेला सुरूवात करून संशयास्पद आत्महत्यास्वरूप मृत्यूपर्यंत,  तैलरंग वापरून जवळपास ८०० चित्र काढली जी तो जिवंत असताना कधीही लोकांपर्यंत विक्रीसाठी पोचली नाहीत

आणि तरीही आज जागतिक चित्रकलेच्या इतिहासाचा आणि चित्रकारांचा अभ्यास करताना वॅन गॉग चं नाव एक दिग्गज कलावंत म्हणून अग्रक्रमी येतं.

तैलरंगात ब्रश बुडवून त्याचे छोटे मोठे फटकारे कॅनव्हास वर मारत योग्य तो अंतिम अपेक्षित परिणाम साधत निसर्गचित्र, व्यक्तिचित्र बनवणाऱ्या वॅन गॉग नी एका नवीन चित्रशैलीचा शोध लावत स्वत:चं नाव आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रात अजरामर करणाऱ्या तैलचित्रांची निर्मीती केली.

अशा या जगप्रसिद्ध मनस्वी कलावंताच्या हातची काही पत्रं जी त्यानी आपल्या भावाला, थिओला  लिहीली होती आणि जी थिओ च्या हाती पडण्याआधीच थिओ देखील मरण पावला त्या पत्रांचा थिओच्या विधवा पत्नी पर्यंतचा प्रवास या विषयावरचा एक आगळा चित्रपट म्हणजे Loving Vincent - पत्राच्या शेवटी Vincent Van Gogh नी Your Loving Vkncent अशी जी स्वाक्षरी केलीये त्या स्वाक्षरीला शीर्षक बनवलेला हा ॲनिमेशन चित्रपट.

या ॲनिमेशन चित्रपटाची खासियत म्हणजे हा नेहमीचं ॲनिमेशन तंत्र वापरून बनवलेला चित्रपट नाही. तर या साठी जगभरातून १२५ चित्रकारांकडून वॅन गॉग च्याच शैलीत तैलचित्रण करून घेऊन एक एक फ्रेम तयार केली गेली आणि चित्रपट बनवला गेला. संपादनाबाबत बोलायचं तर तब्बल ६५००० फ्रेम्स मधून फक्त १००० फ्रेम्स निवडल्या गेल्या.

तैलचित्र आणि चित्रपट निर्मिती या दोन कलाक्षेत्रांचा संगम घडवून वॅन गॉग वर चित्रपट बनवला जाणं ही वॅन गॉगचा , त्याच्या शैलीचा  आणि  एकूणच कलेचा यथार्थ गौरव करणारी आदरांजली आहे असं म्हणावं लागेल.

चित्रपट अजून अहमदाबादला प्रदर्शित झाला नाही आणि त्यामुळे मी तो अजून पाहिलेला नाही. त्यामुळे हे चित्रपट परीक्षण नाही.

पण अशा पद्धतीने चित्रपट निर्मिती करणं हा निश्चितच  कलेच्या क्षेत्रातील एक कौतुकास्पद प्रयत्न आहे. ही कल्पनाच फार सुरेख आहे.

नक्की बघायच्या चित्रपटांच्या लांबत चाललेल्या माझ्या यादीत नुकताच समाविष्ट झालेला हा चित्रपट - *Loving Vincent*

-- मनिष मोहिले

(तळटीप - व्यावसायिक छायाचित्रण करणाऱ्या माझ्या शाळा मित्र राजेश जोशी अहमदाबादला माझ्या घरी आला असताना गप्पांमध्ये त्याच्याकडून लव्हींग व्हिन्सेंट बद्दल पहिल्यांदा ऐकलं).

Friday, November 17, 2017

वयातीत नृत्य



चित्रफीत अपलोड करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रफितीवरून स्फुरलेली कविता.

वयातीत नृत्य

प्रकाशगोलामधूनी ऊमटली रंगभूमीवरी आर्त सुरावली
नर्तकद्वयी मग शिल्पासम जी, सुरावलीतून सजीव झाली

सुरू जाहले पदन्यास नी; नृत्यकला मग बहरू लागली
पदलालित्ये तरल राखूनी, अचूक पाऊले थिरकू लागली

होड अशी मग सुरू जाहली, पदन्यास अन् सुरावलींची
कधी सुरांवर पाय थिरकती, कधी पायातून सूर बरसती

अचूक विभ्रम, भावप्रदर्शन, नजर आणि देहाची बोली
आवेग, आर्तता, प्रेम, विफलता, नर्तनातूनी सादर झाली

सुरेल संगीत, मोहक नर्तन, दोन कलांचे अपूर्व मीलन
तारुण्यासह अनुभवाचे , वयातीत ते नृत्यप्रदर्शन


-- मनिष मोहिले


Thursday, November 16, 2017

कातरवेळी


वरील चित्र आणि चारोळी यावरून सुचलेली कविता

कातरवेळी

संध्यासमयी कातरवेळी
मनात हुरहूर; रम्य नभ जरी
तुझ्या सयीचे रंग साजणी
गंधित करती, क्षण सोनेरी

गोड आपुल्या भेटी गाठी
झाड साक्षी जे; उभे सामोरी
शिशीरे झाली पानगळ जरी
बहर सयींचा, ऊबदार सदा ऊरी

जाता दिनमणी अस्तचलासी
शुक्र चांदणी ये क्षितीजावरी
पाहूनी तिज हो मनात ताजी
सखे तुझी ती छबी साजिरी

तुझी सय सखे सदा मम मनी
पहाट संध्या वा हो रजनी
शिशीरात पण वसंत बहरी
कातरवेळी संध्यासमयी

मनिष मोहिले










Tuesday, November 14, 2017

मैत्रायदान

ऐसे शाळेतले मैत्र ! पुन्हा जाहले एकत्र !
गप्पा मारती नित्य ! अर्धांगांसहीत !!

अप्पाराव ते कविराज ! मुग्ध सुवर्णा चहाबाज !
असे हे प्रेमळ दांपत्य ! संगमी वाडा !!

धुणी भांडी ओटा लादी ! विदे करे सर्व काही !
वाचून थक्क होइ माई ! वाचा गेली !!

बॉडीबिल्डर पावशा भारी ! पावशी नाजूक शोभे नारी !
जाता पावशा कतारी ! सोसते विरहा !!

समीर वाटे देवभोळा ! परी माधुरीवरी डोळा !
मंजिरी भोळी गानकोकिळा ! पत्ता नाही !!

अमरचे क्रीडा पटुत्व ! सायलीची साथ त्यास  !
वास्तव्या ट्रम्प भूमीत  ! तेथून बोलती  !!

निसर्गप्रेमी विनय ! सवे भाग्यश्री चित्रकार !
असे कलाप्रेमी युगुल ! बंगळूरवासी !!

पुष्कर दंग पुण्यात ! मधून यामिनी ये गप्पास !
अजूनी जणू मधुचंद्र ! चालतो आहे !!

मुंगी फिरवतो डस्टर ! नेइ वीणेस फिराया दूर !
कितीकदा ते पर्यटन ! वाटे अचंबा सर्वा !!

हेमंत आणि भक्ती ! समाजसेवेत मग्न राहती !
परि कुटुंबाचे साथी ! जरी संवाद विरळा !!

मनिष चैताली गुजराती ! कोरे राज्य ओले करती !
सवे सामिष भोजना चापती ! मनी मराठीचा लळा !!
(गुजरात मध्ये राहणारे या अर्थी गुजराती)

ॲडमिनपदी परेश भाऊ ! पहाटे झोप रात्र जागवू !
सर्वांपेक्षा परि उत्साहु ! तयार करण्या दंगा !!

असे हे मैत्रायदान ! करूनी भगवंतासी नमन !
सुखी राहो सर्व जण ! एकची मागणे !!

-- मनिष मोहिले

Thursday, October 12, 2017

कृष्णायन

नुकताच श्रीमती काजल ओझा लिखित गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला "कृष्णायन" नावाचा.  महाभारताचा कर्ता करविता असलेल्या कृष्णाची, लेखिका एका वेगळ्याच दृष्टीकोनातून ओळख करून देते आपल्याशी.

पारध्याचा बाण पायाच्या अंगठ्याला लागण्याच्या निमीत्ताने कृष्णानी महाप्रयाण केलं.
ईश्वर असून सुद्धा मानवी देह धारण केल्यामुळे मनुष्याच्या भाव भावनानी ते रुप सुद्धा बांधलं गेलं. तर मृत्यूशय्येवर या मानव अवतारात असलेल्या परमात्म्याचा अंश असलेल्या कृष्णाच्या मनात कोणाकोणाबद्दल काय विचार नी आठवणी आल्या असतील - मुख्यत्वेकरून राधा, रुक्मिणी आणि द्रौपदीबद्दल - असा विषय आहे पुस्तकाचा.

आणि हाच धागा पकडून, कल्पनाविलासाचा आधार घेत पण महाभारताची मुख्य विचारधारा बैठक न सोडता लेखिका कृष्णाच्या आणि त्याच्या
जीवनातील तीन महत्वाच्या स्त्रियांच्या भावनिक संबंधांचा सुरेख शब्दालेख आपल्या समोर आणते.
संपूर्ण स्विकार आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा उत्सव साजरा करणं,  ही लेखिकेच्या मते श्रीकृष्णाच्या जीवनगाथेची मर्म असलेली सूत्र या भावसंबंध कथनातून लेखिका आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते.

तर मला आकळलेल्या या कृष्णायनाला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.

कृष्णायन

जीवन जगणे उत्सव असते
क्षणा क्षणाचा उत्सव करते
नदी जशी सागरास मिळते
जन्मातून मोक्षाप्रत जाते

स्वीकारातच जीवन फुलते
विना अटीचे प्रेमही स्फुरते
मात पिता भगिनी अन् भ्राते
प्रिया, सहचरी; सखीचे नाते

जे जे कोमल राधा असते
सखी द्रौपदी मनात वसते
अर्धांगिनी अन् रुक्मिणी असते
कृष्णाशी जी समरस असते

जेव्हा मन अहं ला त्यागते
परमतत्वाशी जुळते नाते
परमानंदे जीवन खुलते
कृष्णाला योगेश्वर बनविते

-- मनिष मोहिले







मैत्री - सखा आणि सखीची

प्रत्येकाला एक सखी नी प्रत्येकीला एक सखा मिळायला हवा
जिथे नि:शंकपणे उघडून दाखवता येइल मनातल्या गुपितांचा ठेवा

पाठीवर कौतुकाची थाप नी खांद्यावर मैत्रीचा हात हवा
अव्यक्त राहून सुद्धा;  मैत्री माझी कायम आहे;  असा विश्वास द्यायला हवा

रुसून बसायचा, हट्ट करायचा मैत्रीनी दिलेला हक्क हवा
एखादा शब्द, नजर वा अबोला सुद्धा न सांगता समजायला हवा

सुंदरशा या नात्यामध्ये, मैत्री, आपुलकी, प्रेम नी  जिव्हाळा हवा
फक्त एकाच व्यक्तीच्या नाही, दोघांच्याही असण्याचा सारखाच सन्मान हवा

आणि कधीतरी तरी

केवळ सख्याच्या वा सखीच्या हक्काचा बाजूला काढलेला वेळ हवा

---- मनिष 

Tuesday, October 3, 2017

मैत्री आणि प्रेम

जन्मासोबत मिळालेल्या नात्यांशिवाय कोणत्याही नात्याची सुरूवात असते एखादी सारखी आवड, सारखी विचारसरणी, सारखा छंद आणि त्यातून निर्माण होणारी वैयक्तिक पातळीवर अधिक संवाद साधण्याची स्वाभाविक ईच्छा.  मैत्रीत ही हा स्वाभाविक क्रम आहे. यात नीटनेटका पेहराव आणि स्वीकार्य पातळीचा physical appearance हा अध्याहृत आहे. ते नैसर्गिक ही आहे.

तर हा संवाद साधला जाऊ लागला की नात्याच्या समाजमान्य परिघाबाहेरची व्यक्ती हळूहळू सामोरी येऊ लागते.  स्वभावविशेष जाणवू लागतात. एखादा कला विशेष, एखाद्या विषयातील पारंगतता वा व्यासंग, विनोदबुद्धी, रंगतदार गप्पा मारायची हातोटी, बहुश्रुतता, चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याचा रसिकपणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरच्याचे विचार, बोलणं ऐकायची तयारी.

हे असे सकारात्मक विशेष जाणवले की मैत्री फुलायला लागते. संवाद मोकळा व्हायला लागतो. विषयांची बंधनं शिथील होऊ लागतात. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून मैत्रीत एक वेगळाच जिव्हाळा निर्माण होतो. आपुलकी निर्माण होते. प्रेम निर्माण होतं.

दोन पुरूष वा दोन स्त्रिया यांच्यातील मैत्री  आणि एक पुरूष आणि एक स्त्री यांच्यातील मैत्रीचा प्रवास इथपर्यंत सारखाच असतो.

इथून पुढे पुरूष स्त्री मैत्री एका वेगळ्या चष्म्यातून बघितली जाते असा एक अनावश्यक समज आहे की ज्यामुळे समाजच काय पण ते मित्र मैत्रीण स्वत:सुद्धा स्वत:ची मैत्री त्या चष्म्यातून तपासायचा प्रयत्न करतात.

खरंतर काय गरज आहे ? एखादी व्यक्ती आवडत असेल तर निव्वळ ती भिन्न लिंगी आहे म्हणून त्या आवडण्याची चिकित्सा करण्याची काय गरज ? किंबहुना स्त्री साठी मित्र किंवा पुरूषासाठी मैत्रीण हे नातं त्यातील भिन्न लिंगत्वामुळेच अधिक महत्वाचं असतं.

शिव आणि शक्ती, Ying & Yang हा निसर्ग नियम आहे. शारिरीक नातेसंबंधाशिवाय (पती पत्नी - या नात्यात शारिरीक आणि भावनिक दोन्हीची एकरुपतेची गरज वादातीत)  भावनिक नातेसंबंधात देखील हा नियम तितकाच लागू होतो. त्यात प्रस्थापित (पती पत्नी) नात्याशी द्रोह वा त्या नात्यातील भावनिक असंतुष्टता असंही काही असतंच असं ही नाही.

प्रस्थापित नातं आपल्या जागी परिपूर्ण असूनसुद्धा जवळचा मित्र वा मैत्रिण असणं हे सहज शक्य आहे. एक पुरूष आणि एक स्त्री यांच्या भावनिक, मानसिक आणि वैचारिक प्रगल्भतेच्या प्रवासात अशी मैत्री हा एक महत्वाचा टप्पा आहे.

या मैत्रीची चिकित्सा करण्यापेक्षा त्या मैत्रीला खुल्या दिलानं स्विकारणं हे जास्त गरजेचं आहे. डॉ. आनंद नाडकर्णीनी गद्धेपंचविशी मधल्या "मैत्रिणीचं नातं" या लेखात लिहील्या प्रमाणे आपले संस्कार, आपल्याला मिळालेली मूल्य या मैत्रीच्या नात्यातील पूर्णत्वाचा बिंदू आपल्या नकळत निश्चित करत असतात. तो तसा आपला आपला निश्चित होतो आणि मैत्री मधला तो जिव्हाळा आपुलकी आणि प्रेम खऱ्या अर्थानी आकळतं तेव्हा द्रौपदीला कृष्ण आणि कृष्णाला द्रौपदी मिळते.

अर्थात हे असं नातं असणं ही एक स्वाभाविक गरज आहे हे समजून घेणारा जोडीदार (पती / पत्नी) मिळणं हा मात्र थोडा नशीबाचा भाग आहे म्हटल्यास हरकत नाही.

असो. सांगायचा मुद्दा काय की चिकित्सा करू नये असं म्हणून सुद्धा एवढी चिकित्सा केली कारण बरेचदा मैत्री की प्रेम असा जो उहापोह होता त्याऐवजी मैत्रीमधलं प्रेम असा विषय असावा असं वाटलं.

मनिष मोहिले 

Saturday, July 29, 2017

प्रायोगिक कविता - २

यह सावन भीगा भीगा, दिल आशिक बन जाता हैं
अंगांग भिजे धरतीचे, नभ निळे बरसते आहे

कही धूप सुनहरी खिलती, बरखा बरसे हैं कहींपे
लटका राग कधी, कधी प्रेम; रंग प्रेमाचा मोहक आहे

आकाश बने सतरंगी, खेल में धूप बरखा के
स्वप्नांना फुलपाखरी या, पूर्णत्वाचे व्योम खुणावे

सजनी रंगबिरंगी भूमी, साजन गगन निला साँँवला
सुखवतो मनी राधेला, सावळ्याचा प्रेमळ शेला

-- मनिष मोहिले 

Saturday, July 15, 2017

वेगळ्या वाटा - २

वेगळ्या वाटा

जीववैद्यकीय अभियांत्रिकी (Biomedical engineering) - आज जेव्हा पारंपारिक अभियांत्रिकी शाखेभोवतीचं पूर्वीचं वलय कमी होतंय त्यावेळी जीववैद्यकीय अभियांत्रिकी शाखा ही वैद्यक आणि अभियांत्रिकी शाखांचा संयोग असलेली एक नवीन शाखा उदयास येत आहे. ज्यांना वैद्यकशास्त्र व अभियांत्रिकी या दोन्हीत रस आहे अशांसाठी ही सुयोग्य शाखा आहे.

रोगनिदान, नियंत्रण व उपचार या तिन्हीसाठी  अभियांत्रिकी तत्वांचा उपयोग करून वेगवेगळी उपकरणे बनवणे, कृत्रिम अवयव निर्माण करणे, सूक्ष्म रोपण सुलभ बनवणे व या सर्व क्षेत्रात संशोधन करणे  हे या शाखेचं प्रमुख कार्यक्षेत्र.

अर्थात जीववैद्यक अभियांत्रिकी अंतर्गत इतर अनेक उप कार्यक्षेत्र आहेत जशी -

जैव माहिती विज्ञान (Bio informatics) - ह्यात संगणक शास्त्र, सांख्यिकी (statistics), गणित व अभियांत्रिकी यांच्या मदतीने जीववैद्यक माहितीचं विश्लेषण व पृथक्करण केलं जातं.

पेशी अभियांत्रिकी (Tissue engineering), औषध अभियांत्रिकी (Pharmaceutical engineering), पुनर्वसन अभियांत्रिकी (Rehabilitation engineering) -  अपंगत्वावर मात करण्यासाठी अभियांत्रिकीचा उपयोग इ.

मोठीमोठी इस्पितळे, वैद्यकीय उपकरण निर्मिती करणाऱ्या कंपन्या, जीववैद्यक संशोधन संस्था, औषध उद्योग ही या शाखेशी निगडित प्रमुख कार्यक्षेत्र आणि परत इथेही नोकरी वा स्वयंरोजगार अशा दोन्ही शक्यता आहेत.

न्यायवैद्यक मानसशास्त्र (Forensic Psychology. ) -

उपचार आधारित मानसशास्त्र (Therapeutic/Clinical Psychology) ज्यात व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, वर्तणुकीचे विश्लेषण करून व्यक्तीपुढील मानसिक समस्यांचे निदान व त्यासंदर्भात समुपदेशन हे मुख्यत्वेकरून समाविष्ट असतं त्यापेक्षा न्यायवैद्यक मानसशास्त्र वेगळे असते. तसेच गुन्हेगार मानसशास्त्र (criminal psychology) ज्यात गुन्हेगार गुन्हा का करतो, त्याचं पूर्वायुष्य व त्याचे परिणाम, त्याच्या वर्तणुकीचं विश्लेषण, एखाद्या विशिष्ट गुन्हेसाखळीत गुन्हेगाराची पुढची अपेक्षित हालचाल या गोष्टींचा अभ्यास समाविष्ट होतो त्या पेक्षाही फोरेन्सिक सायकॉलॉजी हे वेगळं शास्त्र आहे.

मानसशास्त्राची ही शाखा म्हणजे न्यायव्यवस्था आणि मानसशास्त्र यांची सांगड घालणारी शाखा आहे.

ह्यात कायद्याची मूलभूत तत्व आणि मानसशास्त्र यांचा एकत्रित विचार होतो. उपलब्ध माहिती, पुरावे आणि मानसशास्त्रीय तपासणी, निरीक्षण यांच्या आधारावर एखादी व्यक्ती, मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून खटला भरण्यायोग्य आहे अथवा नाही ह्याबद्दल मत देणे, एक निष्णात व्यावसायिक म्हणून न्यायालयात साक्ष देणे, त्यासाठी कायद्याच्या खाचाखोचा माहीत असणे व न्यायालयात सर्वाना कळेल अशा भाषेत तांत्रिक वा मानसशास्त्रीय बाबींचा खुलासा करणे इ. गोष्टींचा समावेश होतो.

आजच्या घडीला, भारतात ही शाखा अजून फारशी विकसित झालेली नाही आणि त्यामुळे इथे career prospects म्हणावे इतके चांगले नाहीत असं आजचं चित्र आहे पण ते बदलू शकतं.

-- मनिष मोहिले 

Sunday, July 9, 2017

वेगळ्या वाटा

माझी मुलगी आता नववीत आहे. आता या पुढे दहावी, बारावी अशी महत्वाची वर्षं. या टप्प्यानंतर शिक्षणाची नक्की कोणती शाखा निवडायची, कुठल्या क्षेत्रात व्यवसाय / नोकरी करायची असे प्रश्न तिच्या समोर आणि पालक म्हणून आमच्यासमोर ही उभे राहू लागतायत. अशा वेळी नात्यात किंवा मित्रमंडळींमध्ये ज्यांची मुलं अधिक मोठी आहेत आणि ज्यांची आपली क्षेत्रं निवडून झाली आहेत  किंवा ज्यांच्याकडे आजमितीला अधिक माहिती आहे त्यांच्याबरोबरच्या गप्पांमधून नजरेसमोर आलेल्या ह्या काही नवीन शिक्षण शाखा,  ज्या आपल्या वेळी आपल्याला नावानी देखील माहीत नसतील कदाचित. अशा काही शिक्षण शाखांविषयी थोडंसं.  माझ्या मुलीचा कल कला / वाणिज्य शाखेकडे असल्यामुळे या शाखांशी अधिक संबंधित असलेल्या क्षेत्रांबद्दल ही माहिती आहे.

Forensic Accounting / Auditing - शब्दश: 'न्यायवैद्यक किंवा न्यायिक लेखपालन / लेखापरीक्षण' म्हणजे नक्की काय आणि आपल्याला जे auditing - लेखापरीक्षण माहिती आहे त्यात आणि ह्या न्यायिक लेखापरीक्षणात नक्की काय फरक आहे ?

मुळात forensic म्हणजे जे न्यायालयात पुराव्यानी सिद्ध करता येइल असे. या अनुषंगानी फोरेन्सिक ऑडीटींग हे असं लेखापरीक्षण आहे की ज्याची पुराव्यानिशी दाखवलेली निरीक्षणे एखाद्या खटल्याच्या संदर्भात न्यायलयात वापरता येतील.

जे सर्वसामान्य वित्तीय लेखापरीक्षण असतं त्यात लेखापालनाच्या नियमांप्रमाणे हिशोब लिहीलेले आहेत की नाही आणि हिशोब / खाते वहीतील प्रत्येक नोंदीसाठी आधारादाखल योग्य कागदपत्र आहेत की नाही ह्याची तपासणी करणे जी बहुतांशी नमुना तपासणी तत्वावर (sample testing) केलेली असते. ह्यात कुठलाही हिशोब वा खाते हिशोब दाखवताना योग्य कागदपत्र आहेत आणि लेखापालन नियमांचा भंग नाही हे बघितलं जातं. मात्र वरकरणी योग्य व सचोट दिसणाऱ्या हिशोबात वा नोंदीत कुठे गोलमाल आहे हे शोधणे हे सामान्य वित्तीय लेखापरीक्षणाचं मूळ उद्दीष्ट नसतं.

न्यायिक लेखापरीक्षणाचा मूळ उद्देश वरवर बरोबर दिसणारे हिशोब / नोंदी यातील गोलमाल, कुभांड, घोटाळा शोधणे हा असतो. लेखापालन व लेखापरीक्षण यांची मूलभूत तत्व आणि तपास कौशल्य (investigation skills) यांची सांगड घालून हा तपास आणि निरीक्षण अशा पद्धतीने मांडायचा की ज्याच्या आधारावर न्यायालयात खटला लढला जाऊ शकेल. मग अशा फोरेन्सिक ऑडीटर्स चं कार्यक्षेत्र नक्की कोणतं - कुठल्याही संस्थेच्या वरवर बिनचूक  दिसणाऱ्या हिशोबातील घोटाळे शोधणे, वरवर बरोबर भासणाऱ्या विमा दाव्यांची सत्यासत्यता पडताळणे, दिवाळखोरी जाहीर केलेल्या व्यक्ती वा संस्थेच्या छुप्या संपत्तीचा वा मालमत्तेचा शोध घेणे इत्यादी कामांसाठी विमा कंपन्या, वित्तीय संस्था, सरकारी संस्था अशा फोरेन्सिक ऑडीटर्स ची व्यावसायिक वा पगारी पद्धतीवर सेवा घेतात.  ही सेवा केलेले घोटाळे, गोलमाल शोधण्यासाठी घेतली जाते तसेच Risk assessment & management च्या रुपात प्रतिबंधक उपाय या  स्वरुपात देखील घेतली जाऊ शकते.
जागतिक पातळीवर ह्या नवीन व्यवसायाला  अधिकाधिक महत्व  प्राप्त होतंय. Association of Certified Fraud Examiners ACFE ही संस्था न्यायिक लेखापरीक्षकाचं प्रशस्तिपत्र देते. हे प्रशस्तिपत्रधारक लेखापरीक्षक इतर सामान्य वित्तीय लेखापरीक्षकांच्या तुलनेत २०% पर्यंत अधिक सेवाशुल्क मागू शकतात कारण लोक ते अधिक शुल्क द्यायला तयार असतात. भारतात KAPP Edge ही एकमेव संस्था CFE चं प्रशस्तिपत्र मिळण्याच्या हेतूने तयारी करून घेते.
येणाऱ्या काही वर्षात ह्या क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्तींची मागणी वाढणार हे निश्चित.

Liberal Studies of Arts & Science / Humanities -

ही दोन्ही क्षेत्रं तांत्रिकदृष्ट्या वेगळी असली तरी त्यात एक समानता ही आहे की ह्या दोन्ही क्षेत्रातील अभ्यासकाना विविध विषयांबद्दल ज्ञान / माहिती मिळते आणि त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी बनण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर ते पुढे नक्की कशात करीयर करायचं ते ठरवू शकतात.

Liberal Studies of arts & science मध्ये humanities, शास्त्र, समाजशास्त्र, कला इत्यादी विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकावा लागतो ज्यात भाषा, साहित्य, गणित, प्रायोगिक कला (performing arts), इतिहास, समाजशास्त्र, मानवी विकास इ. विषय समाविष्ट असतात  आणि स्नातक झाल्यावर ज्याला ज्या विषयात अधिक रस व गती त्या प्रमाणे ती / तो आपलं व्यवसाय क्षेत्र निवडू शकतो. अभ्यासक्रमात शिकलेल्या लिखित व मौखिक संवाद, छिद्रान्वेषी चिंतन (critical thinking) , व विषयाचा अभ्यास याला नैतिक मूल्यांची बैठक देणं हे यात अपेक्षित आहे.
या अभ्यासक्रमाच्या स्नातकासाठी बॅंकींग, विमा, लेखन, हमीदार (underwriter), जनसंपर्क, मनुष्यबळ विकास, convention / meeting planner अशी बरीच क्षेत्र उपलब्ध आहेत.

Humanities च्या अभ्यासक्रमात देखील अशाच
विविध विषयांचा समावेश असतो उदा भाषा, साहित्य, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र, फॅशन इ.

ह्यातूनच पुढे मानसशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, जनसंपर्क अधिकारी, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, मानववंशशास्त्रज्ञ, फोटोग्राफर, फॅशन इलूस्ट्रेटर इ बरेच मार्ग उपलब्ध आहेत.

अर्थात ह्या दोन्ही क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे. मात्र इथे फक्त नोकरीशिवाय स्वयंरोजगार देखील शक्य आहे - उदा राज्यशास्त्र व चित्रपट निर्मिती ह्यांच्या संयोगातून राजकीय वृत्तपट निर्मिती चा व्यवसाय हा एक मार्ग असू शकतो.

माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे माझ्या मित्राची मुलगी - तिनी बारावी नंतर Liberal Studies मध्ये पदवी घेतली आणि आज ती एका US based e-commerce कंपनीत work from home तत्वावर काम करतेय आणि त्याच बरोबर homebaker म्हणून बेकिंग च्या ऑर्डर्स घेते - घरगुती आणि व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा.

मुद्दा हाच आहे की वेगळ्या वाटा चोखाळणं गरजेचं आहे.

क्रमश:

-- मनिष मोहिले

Tuesday, July 4, 2017

रखुमाई

आज ४ जुलै २०१७.आषाढी एकादशी. एका गृपमध्ये गप्पागप्पात माझा मित्र पावशा बोलला की सगळे विठ्ठलावर कविता करतात. कुणी रखुमाईवर करा की.

पावशाच्या कल्पनेला शब्दात पकडायचा प्रयत्न..

विटेवरी उभा देव सावळा विठोबा
राणी रखुमाई त्याची, देव कान्हडा विठोबा

राणी रखुमा समर्थ, हाके संसाराचा गाडा
म्हणोनी युगे अठ्ठावीस, दारी थांबला विठोबा

ज्ञाना, तुका, नामा, चोखा, बंका आणि एका
संत लेकरे लाडकी , बाप साऱ्यान्चा विठोबा

अशा बापासंगे भेटे, लेकरांना माय माता
रखुमाईचा पदर, मोठा आकाशाएवढा

टाळ चिपळीची साथ, विठो राजा राणी रखमा,
साक्षी दोघांच्या प्रेमाची, संथ वाहे चंद्रभागा

-- मनिष मोहिले 

Monday, July 3, 2017

मीरा इर्दा - भारताची Maggie Peyton

मीरा इर्दा - भारताची Maggie Peyton. (Herbie Fully Loaded).

वयाच्या सतराव्या वर्षी व्यावसायिक कार रेसिंग मध्ये भाग घेणारी भारतीय मुलगी.
नुसतीच भाग घेणारी नाही तर रेसेस जिंकणारी. (फक्त तिच्याकडे Harbie सारखी magical कार नाही).

वय वर्ष आठ - गो कार्टिंग ट्रॅक वर सुरूवात करून आज सतराव्या वर्षी भारतातील मोठ्या प्रमाणावरील व्यावसायिक कार रेस साठी निवड होणारी.

आपल्या passion च्या मागे मेहनत घेणारी. रेस ट्रॅक - आजही जागतिक पातळीवर पुरूषांचं वर्चस्व असलेल्या खेळात भारतासारख्या देशात तिची कामगिरी अतुलनीय म्हटली पाहीजे.

रेस ट्रॅक वर फक्त पुरषी वृत्तीचाच सामना नाही तर प्रत्यक्षात प्रतिस्पर्ध्यांकडून कारला  मिळालेले धक्के पचवत पुन्हा जिद्दीने रेस करायला उतरणारी आणि विजेतेपद मिळवणारी मुलगी.

आता शिवधनुष्य तर मुलीच उचलायला लागल्यात.

स्वयंवराचे त्याहीपेक्षा अवघड पण शोधावे लागणार आहेत.

-- मनिष मोहिले 

Tuesday, June 27, 2017

प्रायोगिक गझल सदृश्य कविता

काही दिवसांपूर्वी श्री. इलाही जमादार यांची एक खास गझल वाचनात आली ज्यात एक ओळ हिंदीत होती आणि एक मराठीत.

हाताळण्यास अतिशय कठीण अशा या काव्यप्रकारात श्री इलाही यांचं प्रभुत्व आहे.

ती गझल वाचल्यापासून आपण ही असा प्रयत्न करावा असं मनानी घेतलं होतं. आज त्या धर्तीवर काही लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिलाच प्रयत्न म्हणून ज्या उणीवा असतील त्यांना माफ कराल ही आशा.

देख लूँ चेहरा तेरा, ईद हैं मत कर मना
कर ऊन्हाचे चांदणे, हासून गाली एकदा

महकती साँसें तुम्हारी, बाग इन में हैं बसा
कर फुलांनाही सुगंधी, वसंत दारी थांबला

हैं घनेरी जुल्फें तेरी, या हैं छायी बदलीयाँ
कर नजर सतरंगी फुलवून,  सुस्नात केसांचा फुलोरा

पंछी, झरनों संग हवाएँ, गीत गाती हैं सदा
भर सुन्याशा जीवनी या, मधुर प्रीतीच्या सुरा

खुबियाँ कुदरत की सारी, तुझमें बसी हैं जाने जा
मन मंदिरी मूर्ती तुझी,  अन् तूच माझी देवता

-- मनिष मोहिले 

Sunday, June 25, 2017

बोलावा विठ्ठल - अहमदाबाद - तृतीय वर्ष

बोलावा विठ्ठल - अहमदाबाद - तृतीय वर्ष

शुक्रवार २३ जून २०१७ साधारण वर्षभरानंतर परत एकदा आषाढ महिन्याच्या निमित्ताने बोलावा विठ्ठल चा कार्यक्रम अहमदाबादेत संपन्न झाला. सलग दुसऱ्या वर्षी हा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला हे आमचं भाग्यच म्हणायचं.

गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी अजूनपर्यंत हुलकावण्या देणाऱ्या वरुणराजाने सुद्धा नेमकी हजेरी लावली. जणू भक्तीरसात न्हाऊन काढणाऱ्या या अभंगवाणीच्या वर्षावात चिंब भिजून जायला खुद्द वरुणराजा सुद्धा ऊत्सुक होता.

त्याच्या आणि पावसापाण्याचं अहमदाबादच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संगीत रसिक श्रोत्यांच्या अपेक्षा, कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांनी अपेक्षेपलीकडे पूर्ण केल्या असंच म्हणावं लागेल.

पंचम निषाद प्रस्तुत बोलावा विठ्ठल च्या अकरा वर्षांच्या परंपरेनुसार राहुल देशपांडे, सावनी शेंडे व जयतीर्थ मेवुंडी या तिघा दिग्गज गायक कलाकारांनी जय जय रामकृष्ण हरी या गजरातून कार्यक्रमाची सुरूवातच, एका अफलातून उंचीवर केली. जणू पुढे सरकताना हा कार्यक्रम कोणती ऊंची गाठणार;  ह्याची झलकच दाखवली. आणि मग शशी व्यास यांच्या अद्भुत समयोचित नेमक्या निवेदनानंतर सुरू झाली अभंगवाणीची बरसात - खास हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ढंगानी.

मिळे आवडीचे सुख तुझे श्रीहरी मुख या अभंगानी सुरूवात करत सावनी शेंडेनी श्रीहरीच्या मुख दर्शनाने मिळणाऱ्या सुखाला सुरान्मधून श्रोत्यांपर्यंत पोचवत त्यानाही त्या सुखाचा अनुभव दिला. सुरूवातीलाच असं मुखदर्शन सुख मिळाल्यावर अबीर गुलालाचे सूर रंग मैफिलीवर उधळले जावेत हे स्वाभाविकच होतं. ह्या सूरसुखातून आणि सूररंग उधळणीतून अशी तल्लीनता आली की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,  करावा विठ्ठल जीवभावे;  ह्या संतांच्या जीवनपद्धतीची सहज ओळख श्रोतृवृंदाला झाली आणि अशा तऱ्हेनी कलाकार व श्रोते यांचं भक्तीरसातून अद्वैत होताच अवघा रंग एकची जाहला आणि साक्षात श्रीरंगही त्या रंगी रंगून गेला असेल तर नवल नाही. अतिशय सहजपणे आपल्या गोड गळ्यातून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या भारदस्तपणाचं दडपण श्रोत्यांना जाणवू न देता,  सावनीने चारही अभंग सादर केले आणि मैफिलीची सुरेख व सुरेल सुरूवात करून दिली.

त्यानंतर आलेल्या राहुल देशपांडेनी परत त्याच्या नजरेतून विठूचं दर्शन घडवलं. आपल्या मुखदर्शनाने सावनीला सुख आवडीचे देणारा श्री हरी राहुलला कसा दिसला ? तर पंढरपुरीचा निळा, विठो देखियेला डोळा, लावण्याचा पुतळा. काय ती भक्ती!  त्या निळ्या विठोचं लावण्य साक्षात शब्दसुरातून साकार झालं; आणि मग विठूभक्तीत, अभंगवाणीत न्हाऊन निघालेला जथा वैष्णवांचा पंढरीस निघाला. त्या संगीत दिंडीला पुढे नेत होता राहुल देशपांडे.  अशा या अभंगरसात तल्लीन झालेल्या श्रोतृवृंदाला राहुल नी मग एका वेगळ्याच तालावर डोलायला लावलं. भक्तीरसाला अद्भुततेची खोल जोड देणाऱ्या त्या तालावर डोलणाऱ्या श्रोत्यांना,  त्या लक्ष्मीवल्लभाच्या पायी वसलेल्या सुखाचं दर्शन घडताच , राहुलचे सूर कानी साठवत मनोमन सर्व त्या नादब्रह्माशी समरस झाले. आपल्या कसदार, दमदार आणि रियाजानी तयार अशा सुरेख गात्या गळ्यातून राहुलने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा रुबाब आणि आब कायम राखून सुद्धा श्रोत्यांना आपलंसं करत स्वत:ला आकळलेल्या भक्तीमार्गावर नेलं आणि कळत नकळत मनोमन सर्व त्या लक्ष्मीवल्लभाच्या पायी नतमस्तक झाले. आणि जेव्हा अशा भक्तीभावाने भक्त त्या विठूच्या पायाशी नतमस्तक होतात ना, तेव्हा वेदांनाही ज्याचा अंत वा पार कळलेला नाही; असा विठू भक्तांसाठी मात्र त्यांची कामं सहज करताना दिसतो - तो कुणाची गुरं राखतो तर कुणाकडची खीर चाखतो.

काय चमत्कार आहे  ! आणि हा चमत्कार घडण्यामागचं कारण सांगितलं राहुल नंतर व्यासपीठावर आलेल्या जयतीर्थ मेवुंडीनी की देव भावाचा भुकेला आणि म्हणून वैकुंठ सोडूनी आला. नुसताच आला नाही;  तर भक्तांची कामं केली. हा भक्तांपासून दूर रहाणारा देव नाही. जे खऱ्याखुऱ्या भक्तीभावाने त्याला साद घालतात,  त्यांच्या मदतीला तो भावभुकेला धावून येतो. तिथे मग भाषेचंही बंधन आड येत नाही. जणू हे सिद्ध करायलाच जयतीर्थ मेवुंडीनी पुढचा अभंग कन्नड भाषेतला घेतला. शब्द कळत नसले तरी त्या कान्हड्याला साद घालणारा तो लडिवाळ भाव, ते गोड प्रेम, सूरासूरातून श्रोत्यांच्या मनात झिरपत होतं.  आपल्या किराणा घराण्याच्या गायकीच्या वैशिष्ट्याची झलक देत व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत जयतीर्थनी हे अभंग सादर केले.

आणि मग अशा ह्या भक्तीरसपूर्ण वातावरणानी भारलेल्या मैफिलीच्या भैरवीसाठी साक्षात वाद्ये सजीव झाली आणि टाळानी चिपळीला बोलावलं की ये आणि माझ्यासंगे नाच. आणि मग काय विचारता महाराजा - देवाजीच्या दारी रंक राव ह्या भेदभावाशिवाय सगळे एकरुप झाले आणि अभंगरंग साक्षात रंगला.

एक विलक्षण संगीतानुभूती मिळाली होती. राहुल देशपांडे,  सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी या गायक कलाकारांबरोबरच त्यांना विविध वाद्यांवर ज्यांनी साथ केली - पेटीवर आदित्य ओक, तबल्यावर साई बॅंकर, पखावजवर प्रकाश शेजवळ, झांज, चिपळ्या व इतर साईड ऱ्हिदम वाद्य लीलया वाजवणारे सूर्यकांत सुर्वे आणि या सर्व दिग्गज कलाकारांच्या मध्ये, भक्तीला, कलेला व कलागुणाना वयाची अट नसते हे पटवून देणारा युवा बासरी वादक एस आकाश - या सर्वांनी मिळून ही संगीतदिंडी, संगीतवारी मनाच्या पंढरपुरीत पोचवली.  गायकांच्या गात्या गळ्यातील चमत्कारी सूराना तितक्याच तोलामोलाच्या चमत्कृतीपूर्ण  व रियाजसिद्ध वाद्यवादनानी साथ देत या सर्व कलाकारानी ही संध्याकाळ संस्मरणीय केली.

पण वैयक्तिकरित्या मला या संगीतानंदाशिवाय एक अनोखी भेट मिळाली. वारी मागची पार्श्वभूमी माझ्यापुरती मला कळली. आपलं प्रत्येकाचं जीवन ही एक वारीच आहे. आणि जसं आध्यात्मिक वारीत त्या विठूच्या दर्शनासाठी वारकरी मैलोनमैल वाट तुडवत जातात आणि विठोचं दर्शन घेऊन कृतकृत्य होतात; त्याप्रमाणे आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रातील अत्त्युच्च शिखर म्हणजेच विठो भेटावा म्हणून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळत  सतत प्रयत्न करणं ही वारीच आहे. ही वारी प्रत्येकाची स्वत:ची असते. कुणाचा विठू कमलकांत, कुणाचा पद्मनाभ, कुणाचा लक्ष्मीवल्लभ तर कुणाचा कान्हडा असतो. पण बाह्य रुप वेगळं असलं तरी मूळ स्त्रोत तोच. आणि हे करताना ह्या गोष्टीची जाणीव ठेवणं महत्वाचं की यशा मागच्या आंधळ्या हव्यासापेक्षा तो प्रवास महत्वाचा. साधन शुचिता महत्वाची. प्रयत्नान्मागचा प्रामाणिकपणा आणि कळकळ महत्वाची आणि त्यासाठी कुठल्याही क्षेत्रात असलो तरी आध्यात्मिक बैठक महत्वाची.

हे सगळं जेव्हा असतं तेव्हा राहुल, सावनी आणि जयतीर्थसारखे तप:सिद्ध सूर लागतात जे तुम्हा आम्हाला निव्वळ श्रवणभक्तीतून ईश्वरी अनुभूती देतात.  आदित्य, साई, प्रकाश, सूर्यकांत आणि आकाश सारखे हात आणि बोटं नेमकी पडून जादू घडवतात.

ज्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांनी बोलावा विठ्ठल कार्यक्रम पहिलून प्रत्यक्षात आणला त्या किशोरीताईंच्या स्मृतीस तोच कार्यक्रम वाह्यला जावा ही जीवनाच्या वारीची खरीखुरी सांगता आणि हेच त्या विठोशी एकरुप होणं.

ह्या भक्तीरसपूर्ण शास्त्रीय संगीतप्रधान अभंगवाणी कार्यक्रमातून निव्वळ मनोरंजनाव्यतिरिक्त ही आत्मोद्धाराची दृष्टी तुम्हा आम्हाला लाभो आणि पंचम निषाद प्रस्तुत बोलावा विठ्ठल असाच  अगणित लोकांच्या जीवनात प्रकाश आणो हीच सदिच्छा !

-- मनिष मोहिले

Thursday, June 22, 2017

नकळ्त

सांडलेल्या चाफ्याला मी,
नकळत वळणावर तुडवलं..
तर वेड्याने  पावलांना,
सुगंधात बुडवलं....

या चारोळीवरून सुचलेल्या ओळी

वळणावरती नकळत आली
चंपकपुष्पे पायांखाली
अंतरातील प्रीत तयांची
पाऊले गंधित करुनी गेली

दिनमणी जाता क्षितिजाखाली
वातीला तेलात भिजवली
तिज भवताली जरी काजळी
प्रकाश देते ज्योती बनूनी

हळूच ओंजळ घेता मिटूनी
रंग सोडिती फुलपाखरे ती
रंग झिरपता ओंजळीतूनी
स्वप्नरंग नजरेला देती

उभी उन्हाची देत सावली
कधी अंगावर दगडही पडती
रसदार फळांची भेट देऊनी
सोबत कायम झाडे देती

घाव टाकीचे पडता अंगी
दगडामधूनी देव प्रगटती
चुका आपुल्या घालून पोटी
भवसागरी ते तारून नेती

-- मनिष मोहिले

यावरूनच एक वेगळ्या दिशेने विचार

वळणावरती नकळत आली
चंपकपुष्पे पायांखाली
स्मरली तव पाऊले मखमली
मनी सुगंधा पेरुन गेली

नकळत मजसामोरी आले
शब्द कधी जे तू लिहीलेले
मैत्र कोवळे मनात फुलवून
अपुला मजला बनवून गेले

नकळत गेली हवा स्पर्शूनी
अंगी शहारा फुलवून गेली
हाती हात तू गुंफलास ती
आठवण ताजी मनात झाली

नकळत सर मज भिजवून गेली
अंगांगाला चुंबून गेली
पहिली मिठी तव आवेगाची
ओलेती मज पुन्हा भेटली

नकळत मजला मग आकळले
जिथे तिथे मी तुला पाहीले
शब्द, फुले, जल, समीर साक्षी
तुझ्या नी माझ्या मनोमीलनाचे

-- मनिष मोहिले 

Tuesday, June 20, 2017

राष्ट्रपती पदाची उमेदवारी

आज भाजपा च्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराचं नाव जाहीर झाल्याची बातमी सगळ्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर आहे.

टाईम्स ऑफ इंडिया येतो आमच्याकडे - त्यातही आहे. पण या बातमीच्या मथळ्यातला एक शब्द मला खटकला. आपल्या देशासाठी शाप असलेल्या जातीव्यवस्थेला तो शब्द अकारण महत्व देतोय असं वाटलं. जो शब्द वापरला तर सामान्याला कायदेशीर कारवाईला तोंड द्यावं लागू शकतं तोच शब्द एका मातब्बर वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ठळक मथळ्यात वापरला जातो. संदर्भ कौतुक करण्याचा असला तरी बातम्या विकण्यासाठी तो एक महत्वाचा मुद्दा आहे हे ही तितकंच खरं आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आजही सामाजिक स्तरावर जातीव्यवस्था आपल्या देशात किती समूळ रुजलीये आणि अशा बातम्या कळत नकळत त्याची जाणीव करून देतात हा चिंतेचा मुद्दा आहे.

एक व्यक्ती देशातल्या सर्वोच्च पदभारासाठी उमेदवार म्हणून विचारात घेतली जाते त्यावेळी धर्म जाती निरपेक्ष अशा संदर्भात त्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुणवत्तेला व कर्तबगारीला महत्व देणं हे अधिक योग्य नाही का ?

कधीतरी अशी स्थिती येइल का की भेदभाव असंच नाही पण कुठल्याच संदर्भात हे धर्म जाती बद्दलचे विचार मनात न येता एखाद्या व्यक्तीचं मूल्य निव्वळ वैयक्तिक गुणवत्तेवर केलं जाईल ?

एका व्यक्तीला प्रकाशझोतात आणून बहुसंख्याना असमान पातळीवरच ठेवायचं, त्यांच्यातील काहीना काही सवलती, गुणवत्ता असो वा नसो,  जन्माधारीत हक्क म्हणून देत त्याना त्या पांगुळगाड्याची सवय लावायची आणि देशाला पांगळं करायचं - कारण सत्तेची लालसा. ह्या सगळ्याला काही उत्तर नाही का ? ह्या जन्माधारीत सवलती आजपासून पुढे एक किंवा दोन पिढ्यांपर्यंतच मिळतील आणि त्या कालावधीत सरकारी यंत्रणा प्रामाणिक व प्रभावीपणे राबवून या जनतेचं  आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व अंगानी उत्थान केलं जाइल ज्यामुळे खरोखरच नियोजित कालावधीनंतर अशा सवलतींची गरज रहाणार नाही असं एखादं समाधान अशक्यच आहे का ?

गांधीजींच्या स्वप्नात सर्वात तळागाळातील व्यक्ती राष्ट्रपती बनू शकणार होती. वरकरणी ते स्वप्न खरं होतयसं वाटलं तरी बहुसंख्यांची स्वप्नं अंधारात गाडली जाताहेत हे विदारक सत्य आहे.

कमीत कमी वृत्तपत्रातला मथळा सुजाणपणे देण्याइतकी सामाजिक प्रगल्भता व जबाबदारीची जाणीव आपल्या समाजात व प्रसिद्धी माध्यमात येइल ?

-- मनिष मोहिले.

Monday, June 19, 2017

आशावाद

आशावाद

काल एका मित्रानी दुसऱ्या एका गृपवर एक कविता पोस्ट केली. त्याच्या दूरच्या नात्यातल्या एका वृद्ध नातेवाईकाची विकलांग अवस्था आणि त्याबाबत त्या व्यक्तीच्या जवळच्यांची वरकरणी अनास्था (वरकरणी अशासाठी की ह्या विषयाला अनेक कंगोरे असू शकतात) यामुळे त्याने एक अशा अर्थाची कविता केली की देवा, हाती पायी धडधाकट असतानाच झोपेत शांतपणे ने.

त्यावर सहज विचार आला की वृद्धावस्थेतील विकलांगता हा एक भाग झाला. पण कित्येकाना ऐन उमेदीत शारिरिक अपंगत्व येतं. तरीही त्यातील अनेकजण जिद्दीने परिस्थितीशी झुंज देत संपूर्ण जगाला प्रभावित करणारी लक्ष्य गाठताना दिसतात. अशा जिद्दी लोकांच्या मनाची घडणच निराळी आणि त्यांचं मन आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर विकलांग होऊच शकत नाही. एक जबरदस्त जिद्द आणि आशावाद त्याना कायम तरुण ठेवतो या विचारातून सुचलेलं काही

गरुडभरारी मनात असता
आकांक्षाना क्षितिज नसते
पंगु असे जरी शरीर मन पण
गगनाला ठेंगणे बनवते

खुर्चीला जरी जखडून गेला
बुद्धीने विश्वात विचरतो (Stephen Hawking)
नैराश्याची गर्ता सोडून
मैदानी युवराज तळपतो

करे पांगळी कुणी करंटा
हिंमत ना हरते अरुणिमा
नसलेल्या पायांनी चढते
काबीज करते सागरमाथा

असतील अनामिक कितीक जगती
शक्ती ज्यांच्या मनात वसते
पंगुत्वासी मात देऊनी
मन त्यांचे आयुष्य घडवते

मूर्तीमंत आशाच असे जणू
सशक्त हे मन लाभो सर्वा
शरीर जर्जर झाले तरीही
तरुण मनातील सदैव जागा

गरुडभरारी मनात असता
आकांक्षाना क्षितिज नसते
पंगु असे जरी शरीर मन पण
गगनाला ठेंगणे बनवते

-- मनिष मोहिले
१९/०६/२०१७

Wednesday, June 14, 2017

शेतकऱ्यांचं कर्जमाफी आंदोलन

गेले काही दिवस विविध राज्यातील शेतकरी आंदोलने हा सर्व प्रसार माध्यामातून चर्चिला जाणारा ज्वलंत विषय आहे.

कापूस, ऊस या सारखी काही कॅश क्रॉप्स सोडली, काही सधन शेतकरी, बागायतदार सोडले (ह्यात ही विभागानुसार अपवाद असू शकतात)  तर बऱ्याच छोट्या शेतकऱ्यांच्या पुढच्या समस्या अतिशय गंभीर - जीवनमृत्यूच्या आहेत हे ही खरं.

या समस्येचं एक समाधान म्हणून कर्जमाफीची मागणी ही मागणी आहे आंदोलनकर्त्यांची.  आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारनी ही मागणी मान्य देखील केली आहे. याच संदर्भात आता इतर राज्य सरकारांवर देखील दडपण येऊ लागले आहे.

याच संदर्भात आज पेपरमधे वाचलं की गुजरात राज्य सरकारला पण अशी कर्जमाफी द्यावी लागली तर त्यांच्यावर ७२ हजार कोटीचा बोजा पडेल. केवढी प्रचंड रक्कम आहे ही. आणि ही फक्त गुजरातची रक्कम आहे. सर्व राज्यांची मिळून कर्जमाफी रक्कम काही लाख कोटींमध्ये सहज जाइल. सरकारी तिजोरीची एवढी प्रचंड  तूट भरून कशी निघणार ? शेवटी हा सगळ्या देशाचाच पैसा आहे आणि देशाचीच समस्या आहे.

या प्रश्नावर माझा अजिबात अभ्यास नसला तरी माझं वैयक्तिक मत असं आहे की ही अशी सरसकट पूर्ण करमाफी देण्याऐवजी वेगवेगळ्या पिकांसाठी किमान आश्वस्त किंमत कशी देता येइल त्यावर काम करावं आणि शेतकऱ्यांना परतफेडीची मुदतवाढ देता येइल का  किंवा २५% / ५०% अशी माफी देऊन आणि वाढीव मुदतीत सुलभ हप्त्यात का होइना पण शेतकऱ्यांनी परतफेड करावी असे धोरण राबवता येइल का ? परतफेडीतून जमा झालेला निधी परत शेतकरी कल्याण योजनान्मध्ये वापरता येइल असा सकारात्मक विचार करता व राबवता येइल का ?

मला पूर्ण कल्पना आहे की हे हस्तिदंती मनोऱ्यात बसून केलेलं समस्या समाधान वाटेल, पुस्तकी किंवा अव्यवहार्य समाधान वाटेल. वरकरणी ते शेतकरी विरोधी ही वाटू शकेल. माझा या समस्येवर अभ्यास नाही हे मी आधीच नमूद केलंय. तसेच मी कोणत्याही विवक्षित राजकीय पक्षाचा वा विचारसरणीचा पाठपुरावा करणारा ह्या भूमिकेतून देखील हे लिहीत नाही.  ७२ हजार कोटी ही रक्कम वाचून आलेली ही एक प्रतिक्रिया आहे असं म्हणू हवं तर.

पण मला जो मुद्दा खटकतो आहे तो ह्यामुळे तयार होणाऱ्या मानसिकतेचा. कोणतीही गोष्ट फुकट मिळू नये. फुकट मिळणाऱ्या गोष्टींची  सवय होते. तो आपला हक्क वाटू लागतो. आपल्याकडचे मतलबी व संधीसाधू राजकारण अशा गोष्टींचा स्वार्थापुरता वापर करण्यासाठी सर्वश्रुत आहेच. असा संधीसाधूपणा करताना पीडित घटकाचाच उपयोग करून आपल्या स्वार्थाची पोळी भाजायची, मग त्या पीडित घटकाला सोयिस्करपणे विसरून जायचं ही एक अजून मोठी समस्या आहे.

मला पूर्ण कल्पना आहे की यावर लगेच माल्या ९ हजार कोटी बुडवून गेला. त्याचं काय केलं असे प्रश्न उपस्थित होतील. पक्षपाती पणे वागावं असं मी म्हणतच नाही. खरं तर बॅंकांची NPAs हा ही एक तितकाच चिंतेचा विषय आहे.

पण जर प्रत्येक समाजघटक अशा सवलतींची अपेक्षा करू लागला तर उत्पन्न कुठून येणार हे सगळं पुरं पाडायला ? कर्ज मान्य करतानाच योग्य परीक्षण करून कर्ज देणं हे उद्योगधंद्यांच्या बाबतीत व्हायला हवं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जयोजना जाहीर करताना आत्तापर्यंतचा कर्जाचा बोजा, वाढीव बोजा, त्यासाठी उत्पन्न कुठून येणार ह्याची योग्य मांडणी हवी. ह्या योजनेची घोषणा ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी, राजकारण साधण्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी असू नये.

आजच्या घडीलाही कागदावर सर्व योजना उत्कृष्ट असतील पण त्यांची परिणामकारक अंमलबजावणी देखील तितकीच महत्वाची.

या सगळ्यामध्ये शेतकरी बांधवांच्या समस्यांबद्दल शंका नाही वा त्यांच्या हितसंबनाधाना विरोधी असंही माझं मत नाही. यात शहरी ग्रामीण असा भेद किंवा सहानुभूतीचा अभाव, संवेदनाहीनता असे देखील काही नाही.  मी फक्त या समस्येची अजून एक व्यावहारिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय.

अर्धी कर्जमाफी किंवा परतफेडीच्या मुदतीत वाढ हे समाधान पूर्णपणे चुकीचंही असू शकेल.

पण एक देश म्हणून शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवताना वरील मुद्द्याचा सखोल विचार देखील  आवश्यक आहे असं मला वाटतं.

-- मनिष मोहिले

Monday, June 12, 2017

राधा कृष्ण


हे चित्र पाहून सुचलेली कविता 
राधा कृष्ण

वेणू लावते वेड जीवाला
थांब कन्हैया गोकुळी
आलिंगूनी त्या मुरलीधराला
विनवी राधा व्याकुळी

सवंगडी तव, माय यशोदा
खिल्लारे ती जरी मुकी
ऐकूनिया तव मधुर पावा
होते दुनिया नादखुळी

मिश्कील हसूनी पुसतो कान्हा
वार्ता दुनियेची कळली
म्लान तुझाही मुखडा राधा
पाणी का तरळे नयनी ?

किंचित क्रोधित हळवी राधा
गौर मुखी लाली चढली
तुज ठावी मम प्रीत मिलिंदा
जाणूनीही थट्टा करीशी ?

हळूच घे तिज मिठीत कान्हा
मधुर शब्दे समजावी
गोकुळी जरी मी नसलो राधा
छबी तुझी कायम हृदयी

ऐक सांगतो सखये तुजला
गुपीत जे ना जाणी कुणी
जरी असे मम सावळी काया
दर्पणी प्रतिमा गौर तुझी

जाणे तव नी मम प्रीतीला
राधे ही दुनिया सारी
राधेविन तो कृष्ण अधुरा
नाव तुझे माझ्या आधी

-- मनिष मोहिले 

Friday, June 9, 2017

ती आणि तो

ती आहे खूप सुंदर दिसायला. कुणीही तिच्याकडे पाहून मोहून जातो तिच्या सौंदर्यानी. लाखो करोडो तिच्यापाठी पागल आहेत.

पण तिचे डोळे कायम त्याच्याकडे लागलेले असतात. आधीच इतके महिने झालेत त्याला भेटून. इतके दिवस तो कुठे गायब आहे ते तिला कळलेलं नाही. त्यामुळे ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून आहे अगदी. बरेचदा तिला राग ही येतो त्याचा - असं काय बरं गुप्त स्वरुपाचं काम करत असेल तो ? कुठे गायब होतो महिनोनमहिने न सांगता सवरता ?  जसजसे दिवस जात असतात तस तसा तिचा "मिजाज" अजून गरम होत जातो.

अशातच कधीतरी त्याच्याकडून अवचित संदेश येतो त्याच्या मित्रमैत्रिणींकरवी. तो संदेश ती जणू अंगभर लपेटून घेते आणि मोहरून उठते. तिचं मोहोरलेलं गंधाळलेलं रुप सगळ्यांना अजूनच मोहवतं.

पण त्याचा संदेश येऊन काही दिवस उलटतात तरी त्याचा पत्ता नसतो. तिचा राग आणि आतुरता परत वाढायला लागतात.

आणि एके दिवशी अचानक तिच्या ध्यानीमनी नसताना तो तिच्या समोर येतो आणि दोघेही कडकडून एकमेकांना भेटतात. इतक्या दिवसांच्या विरहानंतर एकमेकांना भेटल्यावर किती भेटू किती नको, किती प्रेम करू किती नको असं दोघांनाही होऊन जातं.

दोघं जणू एकमेकात विलीन होतात. इतक्या दिवसांनी भेटल्याची जणू भरपाई म्हणून तो तिला प्रेमाच्या वर्षावात आकंठ बुडवतो. तिच्या अंगप्रत्यंगाला तो चुंबतो. स्वत: बेभान होत तिला पण बेभान करतो. त्याच्या प्रेमाच्या वर्षावानी ती सुखावते, तृप्त होते. तिचं सौंदर्य अजून खुलून येतं. त्याच्या प्रेमाचा अंकुर ती उदरात रुजवते. सुरूवातीचा,  बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे असलेला त्याचा धसमुसळेपणा देखील प्रेमळपणात बदलतो. त्याच्यातील माया तिला त्याच्या झिरपणाऱ्या स्पर्शातून जाणवते. काही दिवस असेच जातात. त्याच्या स्पर्शातून तिला प्रेम नी माया दोन्ही जाणवत राहतं.

पण त्याचबरोबर तिला जाणवतं की त्याची निघायची वेळ जवळ आलीये. पुन्हा एकदा तेच एकलेपण, तेच वाट पहाणं. आणि असाच एक दिवस तिला हलकेच भेटून तिच्या ओठांवर आणि कपाळावर ओठ ठेवून तो नाहीसा होतो.

पण आत्ता ती तृप्त आहे. त्याच्या प्रेमाच्या रंगीत आठवणी आहेत तिच्याकडे. त्याच्या बरोबरच्या उत्कट मीलनाचे क्षण तिच्या मनात ताजे आहेत, चिरतरूण आहेत.

या सगळ्याच्या जोरावर ती त्याची वाट पाहू शकेल आता. तो परत येइपर्यंत. भले तो असा फारच कमी काळासाठी येत असेल. पण तिला तिची स्वत:ची अशी परिपूर्ण ओळख फक्त तोच करून देऊ शकतो.

आणि म्हणूनच तिच्यापाठी जग वेडं असूनसुद्धा ती मात्र त्याची दिवाणी आहे. त्याचा सगळा लहरीपणा सांभाळून पण त्याच्या प्रेमात पागल आहे.

ती - भूमी आणि तो - पाऊस.

-- मनिष मोहिले

Wednesday, June 7, 2017

आकाशधावक

माऊंट एव्हरेस्ट (सागरमाथा) - २९०२९ फूट उंचीचं जगातील सर्वोच्च शिखर.

१७६०० फूट उंचीवरच्या बेस कॅम्प पासून २९०२९ फूट उंचीवरचं शिखर गाठायला साधारण ३३ ते ३७ तास लागतात - ते ही तुम्ही उंचावरील वातावरणाशी स्वत:ला  रुळवून घेतलं असेल तर. (If one has got acclimatized to the high altitude). शिवाय हे ३३-३७ तास हा सलग चढाई चा वेळ नाही.  प्रत्येक कॅम्प ला घेतली जाणारी विश्रांती या ३३-३७ तासात मोजली जात नाही.

पण नुकतेच म्हणजे २२ मे २०१७ रोजी
किलियन जॉर्नेट बुर्गादा या तीस वर्षीय स्पॅनिश तरुणाने एव्हरेस्ट बेस कॅम्प ते  एव्हरेस्ट शिखर ही साधारण ११४०० फुटांची चढाई विक्रमी २६ तासात केली. २० मे २०१७ ला रात्री दहा वाजता बेस कॅम्प वरून निघालेला किलियन २१ मे २०१७ च्या मध्यरात्री १२ वाजून काही मिनीटांनी शिखरावर पोहोचला. एव्हरेस्टवरील या आत्तापर्यंतच्या सर्वात वेगवान चढाईचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण चढाई पुरवणी प्राणवायू शिवाय (without supplimentary bottled oxygen) आणि दोरांच्या सहाय्याशिवाय (without fixed ropes) केलेली चढाई आहे.

ही विश्वविक्रमी चढाई करणारा किलियन हा जागतिक स्कायरनिंग आणि स्की माऊंटेनीयरींग  चॅंपियन आहे. He is six time winner of Long Distance Skyrunner World series. त्याचप्रमाणे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचा देखील तो विजेता आहे.

तांत्रिक तपशीलाप्रमाणे स्काय रनिंग म्हणजे दोन हजार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या पर्वतावर धावणे जिथे चढाईचा कोन  ३०° पेक्षा जास्त आणि काठिण्य पातळी दुसऱ्या पातळी पर्यंत असतो. धावायच्या अंतराबरोबरच चढण किती खडी आहे व तिचा काठिण्यांक (degree of difficulty) यावर आधारित स्काय रनिंग मध्ये Sky, Ultra, Vertical व Extreme असे चार उपप्रकार पडतात. त्यापैकी Vertical काठिण्य पातळीपर्यंतच्या स्पर्धा किलियन ने जिंकलेल्या आहेत.

स्की माऊंटेनीअरींग म्हणजे पर्वताच्या दुर्गमतेप्रमाणे स्की पायात चढवून किंवा बरोबर वागवून पर्वतावर चढाई करणे आणि स्की चा वापर करून उतरणे.  शारिरीक क्षमतेची कसोटी पहाणाऱ्या अशा या साहसी खेळात किलियन जागतिक पातळीवर अव्वल ठरावा हे स्वाभाविकच म्हणायला हवं कारण स्पेनच्या डोंगरी भागात जन्माला आलेल्या किलियननी वयाच्या दुसऱ्या वर्षीच स्पेन व फ्रान्समध्ये पसरलेल्या पायरेनीज पर्वतश्रेणी मधील तीन हजार मीटर उंचीचा पर्वत यशस्वीरीत्या पादाक्रांत करून आपल्या अव्वल आकाशधावक बनण्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे पाचव्या वर्षी या पर्वतश्रेणी मधलं अनेटो हे ३४०४ मीटर उंचीचं सर्वोच्च शिखर पादाक्रांत केलं. लहानपणीच सुरू झालेला त्याचा हा अद्भुत प्रवास आजही चालूच आहे. आजच्या तारखेला मॉं ब्लॉं (Mont Blanc), मॅटरहॉर्न, देनाली आणि आत्ता एव्हरेस्ट या चार शिखरांवरील सर्वात वेगवान चढाईचे विक्रम किलियनच्या नावावर आहेत.

आता तो एका प्रकल्पावर काम करतोय ज्याचं नाव आहे "Summits of My Life" ज्यामध्ये तो जगातील वेगवेगळ्या उच्च शिखरांवरील आपल्या चढाई व उतरण या दोन्हीचं चित्रीकरण करवून घेणार आहे.

किलियनच्या आंतरजालावरच्या चित्रफिती पाहताना त्याचा पर्वतावरील चढाईचा वेग आणि दम (stamina) पाहून आपण थक्क होतो. त्याची उतरण (descent) बघताना तर आपण अचंबितच होतो असा त्याचा वेग असतो.

इतक्या दुर्गंम जागी इतक्या लीलया व वेगानी हालचाल करण्यासाठी जबरदस्त शारिरीक क्षमता हवी हे तर दिसतच पण त्याही पेक्षा जाणवतो तो चढाई असो वा उतरण - प्रत्येक पावलामागे असलेला किलियनचा सराव, आत्मविश्वास, आणि त्या डोंगरावरचा एक अबोल विश्वास की  माझं हे पाऊल बरोबरच पडेल आणि हा डोंगरही ते सांभाळून घेइल.

अशा प्रकारचं कौशल्य इतक्या उच्चतम पातळीवर पोचायला फक्त शारीरिक क्षमता, सराव, तंत्र (technique) हे उपयोगाचं नाही तर त्याचबरोबर निसर्गाशी एक मानसिक अद्वैत असायला हवं  आणि ते अद्वैत साधायचं आणि वाढवायचं एकमेव माध्यम म्हणजे सातत्याने सराव आणि स्वत:ला स्पष्टपणे आकळलेली पण उलगडून न सांगता येण्यासारखी निसर्गाशी असलेली व झालेली समरसता.

-- मनिष मोहिले

Saturday, June 3, 2017

कृष्ण विवर - ब्लॅक होल

कृष्ण विवर - ब्लॅक होल
दोन लाख वर्षांपूर्वी एक तारा बनायला सुरूवात झाली. सहा हजार वर्षांपूर्वी तो तारा पूर्ण प्रकाशमान झाला. तेजाने तळपू लागला.

दुर्दैवाने आपण खूप तेजस्वी असल्याचा गर्व होऊन तो तारा फुगायला सुरूवात झाली आणि त्याचा राक्षसी तारा बनला. आपला वाढता आकार पाहून तो तारा मनोमन खूष होत होता पण त्याला कल्पना नव्हती की तो अल्पजीवी ठरणार होता. जे राक्षसी ताऱ्याचं होतं तेच ह्या ताऱ्याचंही झालं. तो फुटून ब्लॅक होल बनलं. या वैश्विक घटनेत एकच फरक होता - तो तारा थोडासा सुदैवी असल्यामुळे एकाच झटक्यात संपूर्ण फुटून ताबडतोब ब्लॅक होल बनलं नाही. ती एक प्रक्रिया होती आणि तो तारा ती प्रक्रिया पाहू शकत होता. ती प्रक्रिया अजूनही चालू आहे आणि त्या ताऱ्याने प्रयत्न केला तर तो ब्लॅक होल मिटवून परत एक निरोगी तारा होऊ शकतो - अजूनही. त्या ताऱ्याचं नाव Mankind.

मानवजाती नी केलेली भौतिक, सांस्कृतिक, सामाजिक, वैज्ञानिक शास्त्रीय प्रगती हे त्याचं वाढतं तेज होतं. जो पर्यंत या प्रगतीमुळे  निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल बिघडला नव्हता, परस्परांबद्दलचे द्वेष, हेवेदावे, जातीभेद, वर्णभेद, सत्तालालसा, शस्त्रस्पर्धा, आतंकवाद ह्यांचा जन्म झाला नव्हता - तो पर्यंत.

पण प्रगतीच्या रस्त्यावर कुठेतरी चांगल्या गोष्टी, पर्यावरण, समतोल सारासार विचार बाजूला फेकले गेले आणि वरील अवगुणांच्या प्रचंड आकर्षणशक्तीचं ब्लॅक होल तयार झालं.

या ब्लॅक होल मध्ये सगळे चांगले गुण शोषून घेतले जाऊ लागले - परत बाहेर न येण्यासाठी किंवा अगदी क्षीण स्वरुपात बाहेर येण्यासाठी. अवगुण मात्र त्या ब्लॅक होल मध्ये न शोषले जाता फक्त त्याच्या आकर्षण शक्तीचा फायदा घेऊन चिरतरूण राहू लागले. त्यांच्यासाठी काळ गोठला. त्यांच्या समोर उभे ठाकू शकणारे सद्गुण वयानी वाढले आणि लय पावू लागले.

थियरी ऑफ रिलेटीव्हीटी सिद्ध झाली - मी माझ्या जागी बरोबर. बाकीचे त्यांच्या जागी चूक. हे असंच चालू राहीलं तर Mankind तारा पूर्णपणे ब्लॅक होल मध्ये बदलणार. पण अजूनही पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले तर हे चित्र बदललं जाऊ शकतं.

टीप -

ताऱ्याचं वय झालं की त्याचा आकार वाढत जाऊन तो राक्षसी तारा (Giant Star)  बनतो. पुढे तो फुटून प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेलं ब्लॅक होल तयार होतं. त्याचं गुरूत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की त्यात वस्तू ओढलीच जाते. त्यात काळही गोठतो. (म्हणजेच वय बदलत नाही).

सहा लाख वर्षांपूर्वी मनुष्याच्या उत्क्रांतीला सुरूवात झाली आणि आजचा मानव अस्तित्वात येऊन दोन लाख वर्ष झाली. संस्कृतीचा (civilization) जन्म सहा हजार वर्षां पूर्वीचा.

या संदर्भात पोस्ट वाचली तर आपण ब्लॅक होल मध्ये रुपांतरित होत चाललोय.
परवा पेपरला एका Stellar Black Hole बद्दल माहिती होती. Two black holes merged into each other & this stellar black hole was / is formed 3 billion light years away from us. (was / is मध्ये परत रिलेटीव्हीटी आली ). त्यावरून वरील कल्पना आली.

Black hole नष्ट होऊन परत निरोगी तारा होणे ही आशावादी कवि कल्पना आहे. प्रत्यक्षात असं होणं अशक्य आहे.

-- मनिष मोहिले 

Wednesday, May 31, 2017

आजची मानसिकता - प्लॅस्टीक कोटेड गोंधळ

आजची मानसिकता  - प्लॅस्टीक कोटेड गोंधळ.

गेले दोन दिवस "निकाल" जाहीर होतायत आणि त्याचबरोबर कुठे कुठे निराशा पदरी पडल्याने किंवा त्याच्या भितीने उमलत्या वयाची तरुणाई, ऊमलण्या आधीच स्वत:ला खुडून टाकतीये.

पुस्तकी शिक्षण हे फक्त एक चांगली वैचारीक व माहितीधिष्ठीत बैठक बनण्यासाठी उपयुक्त ठरतं. त्यानंतर प्रत्यक्ष व्यावसायिक आयुष्यात उपलब्ध माहिती आपण कशी वापरतो (application of available information), आपली मेहनत करण्याची तयारी, सातत्य, लक्ष्यकेंद्री वृत्ती, नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान माहीत करून घेऊन वापरणे व परिस्थितीनुरूप धोरण बदल करायची तयारी, आपली लोकांशी वागण्याची पद्धत, अपयश पचवून त्यातून शिकून पुढे सरकायची तयारी  या व अशा अनेक गोष्टींवर यशापयश अवलंबून असतं.
कित्येक प्रथितयश व्यक्तींना देखील आयुष्यात कधी ना कधी शैक्षणिक आयुष्यात अपयशाचा सामना करावा लागला आहे. माझ्या स्वत:च्या शाळेच्या बॅचमधील दोन उदाहरणं माझ्या समोर आहेत की शालेय जीवनात नापास होऊन वा साधारण गुण मिळून सुद्धा ह्या दोन्ही व्यक्ती आज यशस्वी व्यावसायिक आहेत - पहिला नंबर येणाऱ्या मुलांपेक्षा देखील अधिक यशस्वी.

पण आजकाल शैक्षणिक गुण, त्यासंबंधी वास्तव अवास्तव शक्याशक्यता यांचा विचार न करता केलेल्या अपेक्षा - मुलांच्या स्वत:च्या व पालकांच्या, तात्कालिक यशाची हाव, पाल्य व पालक यांच्यातील संवादाचा अभाव, आत्महत्या करून प्रश्न न सुटता आपल्या पालकांपुढे व कुटुंबापुढे वेगळेच भावनिक तसेच व्यावहारीक प्रश्न उभे राहतील ह्याची मुलाना नसलेली जाणीव, वा जाणीव असून ही समतोल विचार करण्याची अपात्रता  ह्या सगळ्यामुळे ह्या वाढत्या आत्महत्या दिसून येतात.

आता दोन वेगळेच विषय. रविवारी होऊन गेलेल्या मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने रेडीयो वर दिल्लीच्या सच्ची सहेली का अशा काही नावाने काम करणाऱ्या एका NGO चालिकेची मुलाखत होती. ही NGO मासिक पाळीबाबत त्या मुलीला सुजाण बनवणं, शास्त्रीय माहिती देणं, तिला त्याकडे बघण्याचा सुयोग्य दृष्टीकोन देणं, मुलीच्या कुटुंबातील इतराना देखील हे सर्व मार्गदर्शन देऊन त्यांना मासिक पाळी व त्या स्थितीतून जाणारी स्त्री हिच्याबद्दल संवेदनशील बनवणे हे काम प्रामुख्याने करते आणि ह्यात सगळ्या वर्गातील (आर्थिक / सामाजिक ) कुटुंबांचा समावेश होतो.

त्याच एक दोन दिवसात रेडीयोवर अशीही एक बातमी होती की आता लग्नाशी संबंधित एक नवीन crash course सुरू झाला आहे. पाठवणीच्या वेळी (बिदाई) व्यवस्थित रडायचं कसं ? म्हणजे मेक अप वगैरे खराब होणार नाही आणि तरीही रडणं genuine असेल.

ह्या तिन्ही गोष्टी बघता एक समाज म्हणून आपण कुठे तरी प्लॅस्टीक कोटेड झालोत असं वाटतं.
संवेदना, नाती गोती, आपुलकी, मैत्री, सकारात्मक दृष्टिकोन ह्या ज्या संवेदनशील मनानी टिपून घ्यायच्या गोष्टी आहेत त्या आपण टिपूच शकत नाही. पण त्याच्या ऐवजी आपण बाह्य देखावा, अपयशाचा बागुलबुवा, संवेदनहीनता या सगळ्याच्या जाळ्यात अडकून प्लॅस्टीक प्रमाणे मोडून पडतो किंवा जळून जाऊन polymer चा एक अर्थशून्य उपयोगशून्य गोळा बनून जातो.

ह्या जंजाळातून स्वच्छ विचार करून बाहेर निघणं आणि आपल्या मानसिकतेच्या संदर्भात प्राथमिकतांचा योग्य क्रम लावणं आणि त्या मानसिकतेवरचं प्लॅस्टीकचं आवरण काढून टाकणं ही आजच्या समाजाची (irrespective of generation) आत्यंतिक महत्वाची गरज आहे.

-- मनिष मोहिले

Sunday, May 28, 2017

निवृत्ती व रीटायरमेंट - एका दृष्टीकोनाचा फरक ??

रीटायरमेंट आणि निवृत्ती - एका दृष्टीकोनाचा फरक

निवृत्ती, Retirement - समानार्थी शब्द. आपल्या व्यावसायिक कार्याला पूर्णविराम देणे म्हणजे निवृत्ती ज्यासाठी इंग्लीशमध्ये retirement हा समानार्थी शब्द आहे. पण ते खरंच समानार्थी आहेत का ? आणि हा शब्द फक्त व्यावसायिक क्षेत्रापुरता मर्यादित आहे का ?

माझ्यामते ह्या दोन्ही शब्दांच्या अर्थात एका दृष्टीकोनाचा फरक आहे.

निवृत्ती यात नि:संग होऊन जायची वृत्ती असा अर्थ अभिप्रेत आहे मला. थोडक्यात व्यावसायिकच नाही तर एकंदरीतच सांसारिक गोष्टीन्मध्ये मला आता रस नाही, मी आता त्या सगळ्या गोष्टीत नाही. त्यातून मी काया वाचा मने बाजूला झालो आहे. पारलौकिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात पडून आत्मिक उन्नती करणे आणि कुवतीप्रमाणे कोssहम  चा अर्थ शोधणे, आपल्या जगात येण्याचा हेतू शोधणे आणि या संदर्भात गत आयुष्य तपासून पहाणे हा निवृत्तीचा मार्ग.  हा मार्ग स्विकारताना सहसा उतारवय हेच सर्वमान्य वय असलं तरी सांसारिक जबाबदाऱ्या नसतील तर स्वत:च्या मूळ स्वभावाप्रमाणे, प्रवृत्तीप्रमाणे हा निवृत्तीमार्ग कुठल्याही वयात स्वीकारता येतो. त्यासाठी स्वत:ची तेवढी आध्यात्मिक प्रगती झालेली असणं आवश्यक असतं. पण तो नि:संगपणा खऱ्या अर्थाने वृतीत आलेला असायला हवा. नसेल तर ओढूनताणून आणलेल्या या निवृत्तीला काहीच अर्थ नाही. त्याचप्रमाणे सांसारिक जबाबदाऱ्या टाळून किंवा अर्धवट टाकून ह्या मार्गाला जाण्यातही अर्थ नाही.  जर एखाद्याची तितकीच आध्यात्मिक उन्नती झालीच असेल तर शरीराने सांसारिक जबाबदाऱ्या ऊचलून देखील मनानी नि:संग रहाता येऊ शकतं. पण बहुतांश लोकांना हे जमत नसावं आणि म्हणूनच प्राचीन हिंदू धर्मानी वानप्रस्थाश्रम निर्माण केला असावा भौतिक अंतर असल्यावर मनानी दूर जायला मदत होत असावी.
एकंदरीत प्रापंचिक व व्यावसायिक जबाबदाऱ्या एका पिढीकडून सहजपणे पुढच्या पिढीकडे हस्तांतरित व्हाव्या ह्यासाठी हा एक उत्तम मार्ग होता व आहे.

थोडक्यात काय तर मनाचा नि:संगपणा महत्वाचा. तो आला की खऱ्या अर्थानी निवृत्त झाली ती व्यक्ती.

आता retirement चा विचार करू.

Retirement ह्या शब्दाची Re - tirement अशी फोड केली तर ? Re - tired.? Re - परत एकदा आणि tired - थकलो / थकले. जर व्यावसायिक क्षेत्रातून काया वाचा मने बाजूला झालोय तर मग हे परत थकणं कशासाठी / कोणासाठी ?

तर हे थकणं स्वत:साठी. आयुष्यातील वेगवेगळ्या भूमिका बजावताना उचलाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून, त्या निभावताना आलेला थकवा बाजूला ठेवून ताज्या मनाने परत एकदा फक्त स्वत:साठी थकायचं - विश लिस्ट वर असलेल्या पण करता न आलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या. ज्या जागा बघायच्या  बाकी राहिल्या असतील त्या जागा,  ती ठिकाणं बघायची, राहून गेलेली पुस्तकं वाचायची, वेळेअभावी अटेंड न करता आलेल्या गाण्याच्या, संगीताच्या मैफिली ऐकायच्या, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात, घड्याळाकडे पूर्ण दुर्लक्ष करून मनसोक्त गप्पा मारायच्या, सहचराच्या हातात हात घालून फिरताना संध्याकाळ रोमॅंटीक बनवायची, मन मोकळं करायचं, साचलेले सल सांगून टाकायचे, बाकी राहिलेली माफी मागून टाकायची, मुला नातवंडाना सल्ला द्यायचा, सोबत द्यायची पण अलिप्तपणे,किंवा एखाद्या समाजपयोगी कामात पडायचं. काही ही करायचं. फक्त एकच अट. जे करायचं ते फक्त स्वत:ला चांगलं वाटतय म्हणून. ईच्छा असो वा नसो, जबाबदारी घ्यावीच लागते. पण इथे या टप्प्यावर पूर्ण ऐच्छिक कामकाज. मात्र जर एखादी जबाबदारी घेतलीच तर ती प्रामाणिकपणे पूर्ण करायची. पण त्यातला थकवा हा समाधानाचा आणि स्वत:च्या समाधानाचा थकवा असेल.

पण मग ह्या रीटायरमेंट मध्ये आध्यात्मिक उन्नतीचं काय ? माझ्या मते पूर्ण समाधानी मनुष्य सुद्धा आपोआप नि:संग होत जातो. शेवटी आपण म्हणतो नं की आता निवृत्त झालो / रीटायर झालो, आता स्वस्थ पणे रहायचं. निवृत्ती वा रीटायरमेंट  या दोन्ही मध्ये शेवटी स्वस्थ रहाणं महत्वाचं. पण स्वस्थ म्हणजे काय ? जो स्वत:मध्ये स्थित असतो स्थिर असतो तो स्वस्थ. ही स्वस्थता कोssहम चं उत्तर शोधूनही मिळते किंवा लौकिक आयुष्यात पूर्ण समाधानानी जगून सुद्धा.

प्रत्येकानी आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे निवृत्त व्हावं किंवा रीटायर. पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे सुसज्ज स्नानगृहात बाथ क्रीस्टल्स वापरून ही आंघोळ स्वच्छ आंघोळ होते आणि घाटावरून नदीत दणादण उड्या मारून काठावरच्या दगडानी अंग घासून सुद्धा स्वच्छ आंघोळ होते. ह्यातला कोणत्या आंघोळीचा आनंद लुटावा हे प्रत्येक देहातल्या आत्मारामपंतांनी ठरवायचं. त्याचप्रमाणे निवृत्त व्हायचं की रीटायर हा देखील फक्त प्रवृत्तीचा आणि दृष्टीकोनाचा फरक आहे. रस्ते वेगवेगळे असतील. मुक्कामाचं ठिकाण एकच आहे.

-- मनिष मोहिले

Friday, May 26, 2017

ओ बी ओ आर - चीनचा रेशमी गळफास ?

ओ बी ओ आर

सध्या आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारण या दोन्ही आघाड्यांवर चीनचा ओ बी ओ आर ( One Belt One Road) प्रकल्प खूपच चर्चेत आहे.

एका भौगोलिक परिसरातील विविध देशांना उपलब्ध असेल असा एक महामार्ग कच्चा व उत्पादित माल, मनुष्यबळ यांची ने आण सुलभ होइल व भौगोलिक नजीकतेने परस्परांशी जुळलेल्या सर्व देशांचे आर्थिक हितसंबध जोपासले जातील व संपूर्ण विभागाची प्रगती होइल, विकास होइल ही या ओ बी ओ आर प्रकल्पामागची मूळ संकल्पना.

भविष्यकाळातआंतरखंडीय स्तरावर पसरला जाणार असलेल्या या प्रकल्पाची सुरूवात होतेय ती भारतीय उपखंडात व आजूबाजूनी असे तीन मार्ग बनवण्यानी.

एक चीनच्या मुख्य भूमीपासून तिबेटमार्गे नेपाळमधील लुंबिनी या गौतम बुद्धाच्या जन्मस्थानापर्यंत लोहमार्ग.
दुसरा चीन बांग्लादेश भारत व म्यानमार (BCIM) असा महामार्ग. या मार्गामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक व्यापक होइल, सोपा होइल हे निर्विवाद.
तिसरा चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग ( China Pakistan Economic Corridor CPEC) - चीनमधील शिशियांग पासून सुरू होऊन पाकव्याप्त काश्मिर मधून सरकत पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वदार बंदरापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे CPEC. हा मार्ग पूर्ण झाल्यास जे खनिज तेल आज चीनला समुद्रमार्गे मोठ्ठा वळसा घालून आयात करावं लागतंय ते CPEC मार्गे खूपच कमी वेळात व कमी खर्चात त्यांना मिळू लागेल. शिवाय तोच मार्ग चीनी उत्पादनाच्या निर्यातीसाठी सुद्धा वापरता येऊ शकतो.

मग भौगोलिक संलग्नता असलेल्या संपूर्ण विभागाच्या आर्थिक प्रगतीचं वास्तववादी आश्वासन देणाऱ्या या प्रकल्पाला भारताचा विरोध का आहे ?

तर हा प्रकल्प निश्चित करताना, भारत हा भारतीय उपखंडातील प्रमुख देश असून सुद्धा आपल्याला डावललं गेलंय ही भारताची भावना आहे जी बरीचशी खरी ही आहे.

कारण हा प्रकल्प राबवण्यासाठी जसं चीन ने संबंधित देशांना सहकार्याचं आवाहन केलं आहे, तसंच आर्थिक मदतीबरोबरच एखाद्या देशाची ईच्छा असल्यास त्यांच्या प्रदेशातून जाणाऱ्या या महामार्गाच्या संरक्षणाची जबाबदारी उचलण्याची तयारी ही चीन ने दाखविली आहे (Is it modern chinese form of East India Company?) आणि शेवटी  या देशांच्या सहकार्याशिवाय देखील हा प्रकल्प आपण पूर्ण करूच असा इशाराही दिला आहे.

थोडक्यात या प्रकल्पामुळे चीनचं भारतीय उपखंडावरील वर्चस्व खूपच वाढेल ही रास्त शंका भारताला आहे. या संदर्भात आपण वर उल्लेख केलेल्या प्रत्येक मार्गाचा विचार करू.

पहिला - चीन ची मुख्य भूमी पासून तिबेट मार्गे नेपाळमधील लुंबिनीपर्यंतचा लोहमार्ग. भारताकडे आपला प्रमुख सहकारी व आधार म्हणून पहाणाऱ्या नेपाळला या मार्गासाठी चीनकडून मिळणारी भरघोस आर्थिक व इतर मदत, मूलभूत सुविधांमधील सुधारणांमुळे होऊ शकणारी आर्थिक प्रगती याचं आकर्षण वाटून तो भारताच्या प्रभावामधून थोडाफार का होइना बाहेर पडून चीनकडे झुकण्याची शक्यता आहे. शिवाय लुंबिनीपर्यंत हा मार्ग न्यायचं ठरवून चीन ने या महत्वाकांक्षी आर्थिक विकास प्रकल्पाला धार्मिक जोड देण्याची चलाखी दाखवलेली आहे.

दुसरा चीन बांग्लादेश, भारत व म्यानमार यांना जोडणारा महामार्ग. चीनला भारताच्या सहकार्याची सगळ्यात जास्त गरज याच टप्प्यासाठी पडणार आहे. यात आपलं कलकत्ता बंदर या महामार्गावरील एक महत्वाचं बंदर ठरेल. भारताच्या ईशान्य राज्यांच्या विकासाच्या दृष्टीने देखील हा मार्ग महत्वाचा आहे. पण अरुणाचल प्रदेशावर हक्क सांगणाऱ्या चीनच्या महत्वाकांक्षेला त्यामुळे खतपाणी मिळून भारताच्या सुरक्षिततेला व अखंडतेला तिथे धोका उद्भवू शकतो.

तिसऱ्या मार्गाबद्दल तर सगळ्यानाच काय समस्या आहेत त्याची कल्पना आहे. मुळात हा मार्ग प्रस्तावित करून आणि त्यावर अर्धअधिक काम पूर्ण करत आणून चीन ने अप्रत्यक्षरित्या POK वरील पाकच्या दाव्याला मान्यता दिली आहे. जर आपण या प्रकल्पाचा हिस्सा बनलो तर आपणही पाकचा पाकव्याप्त काश्मिरवरचा दावा मान्य केल्यासारखं होइल आणि उर्वरीत काश्मिर भारतापासून तोडून आपल्या अधिपत्याखाली आणण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाना जोर चढेल. काश्मीरमधील विघटनवादी संघटना याची वाटच बघताहेत.

बरं आपण  सहभागी न होताही चीनला जे करायचंय ते ते करतातच आहेत. त्यामुळे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी गत झालीये भारताची.

या समस्येवरती भारताचा थिंक टॅंक निश्चितीपणे काहीतरी रणनीती ठरवत असेलच पण एक सर्वसामान्य भारतीय माणूस म्हणून मला वाटतं की
भारतानी ह्यात एकाच मुद्द्याला किंवा धोरणाला धरून रहाण्यात अर्थ नाही. कारण आपण कितीही विरोध वा असहकार करायचं म्हटलं तरी या प्रकल्पाचे दृष्य आर्थिक फायदे इतके आहेत की इतर देश त्याकडे आकृष्ट होऊच शकतात. शिवाय ते मुळातच छोटे व मागासलेले असल्यामुळे विकास व आर्थिक प्रगती हीच त्यांच्यापुढची प्राथमिकता आहे. त्यांना विभागीय वर्चस्वक्षेत्र वगैरे सारख्या महत्वाकांक्षा नाहीत किंवा परवडू शकत नाहीत. जर आपण असहकाराचं धोरण चालू ठेवलं तर हे जे काही आपले दुबळे का होइना पण समर्थक देश आहेत त्यांचाही छुपा विरोध / असंतोष आपल्याला सहन करावा लागेल.

आज आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार केला तर योग्य सहकारी देश निवडण्यात आपले निर्णय किंवा निर्णय घेण्याची वेळ चुकलेली आहे. आधी आपण आदर्शवादी अशा समाजवादाची स्वप्न बघणाऱ्या नेतृत्वामुळे अमेरिका सोडून रशियाच्या कच्छपी लागलो आणि रशियाच्या विघटनानंतर आपण अमेरिकेच्या भजनी लागलो. आत्ता आत्ता त्याचे फायदे मिळायला लागतील असं वाटत असतानाच अमेरिकेतील नेतृत्वबदलामुळे तिथे पण सध्या अनिश्चितताच आहे.  आपण अमेरिकेला जवळ केल्यामुळे दुखावलेल्या रशियानी पाकिस्तानबरोबर संयुक्त लष्करी कवायती करून आपल्या परराष्ट्रीय धोरणाला मोठाच धक्का दिला आहे.

अशा परिस्थितीत चीन सारख्या बलाढ्य शेजाऱ्याला पूर्णपणे व उघडपणे बिथरवणं कदाचित आपल्याला जास्त नुकसान करणारं ठरू शकेल. त्याचबरोबर या महामार्गांमुळे जे फायदे होतील ते ही नजरेआड करण्यासारखे निश्चितच नाहीत. त्यामुळे या प्रकल्पापासून, त्याच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा व इतर सभांपासून अलिप्त न रहाता तिथे सशर्त सहकाराचं प्रतिपादन करायचं, प्रकल्पात सहभागी होऊन त्याचे फायदे घ्यायचे पण त्याचवेळी भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनी घातक असणाऱ्या (CPEC)  वा होऊ शकणाऱ्या शक्यता आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आणून तिथे सहानुभूती व सहकार मिळवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून चीनला त्यांचे इरादे सहजासहजी पूर्ण करता येणार नाहीत व भारताच्या हितसंबंधाना प्राधान्य देणारे बदल या प्रकल्पात होतील अशा शक्यता निर्माण करणं  आणि त्याचवेळी उपलब्ध सुधारणांचा फायदा घेत आपली आर्थिक, रणनैतिक (strategic) व लष्करी  ताकद वाढवत रहायची अशी तिहेरी कसरत भारताला करावी लागेल.

आता जे माझ्यासारख्या सामान्य माणसाला सुचतंय ते आपल्या मुत्सद्द्याना सुचत नसेल असं निश्चितच नाही. तसंच हे सगळं सहजपणे घडू द्यायला चीन पाकिस्तान काही हातावर हात धरून बसणार नाहीत. पण हे मुत्सद्देगिरी दाखवून कसं घडवून आणायचं हे आपला diplomatic think tank च  अधिक चांगलं जाणतो. त्याचप्रमाणे जशी आपली मर्मस्थानं आहेत त्याचप्रमाणे चीनची मर्मस्थानं शोधणं किंवा काही मर्मस्थानं बनवणं ही आपली रणनीती असली पाहीजे.

मात्र, हा प्रकल्प नजरेआड करण्यासारखा अजिबात नाही आणि तो प्रत्यक्षात उतरणार याबद्दल अजिबात शंका नाही.  त्यामुळे त्यापासून अलिप्त न रहाता सतत प्रयत्न करून तो शक्य तेवढा आपल्याला अनुकूल बनवणं हेच भारतीय अधिकाऱ्यान्समोरचं उद्दीष्ट असेल, असायला हवं.

---- मनिष मोहिले 

Wednesday, May 24, 2017

पॉन सक्रीफाइस

२१ मे च्या रविवारी  पॉन सॅक्रिफाइस नावाचा चित्रपट पाह्यला. बॉबी फिशर च्या आयुष्यावरचा.

सुरेख चित्रपट. सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला बुद्धिबळाच्या खेळातील रशियाच्या जागतिक वर्चस्वाला आव्हान देणारा अमेरिकन ग्रॅंडमास्टर रॉबर्ट जेम्स "बॉबी" फिशर या अतिशय प्रज्ञावंत बुद्धिबळपटूची जीवन कहाणी सांगणारा.

सत्तरच्या दशकातील अमेरिका व रशिया यांच्या शीत युद्धाच्या पार्श्वभूमीवर खेळातील हार जीत ह्यालापण एक वेगळाच रंग लाभला होता. त्यातून बऱ्याच काळानी , रशियाच्या बुद्धिबळातील जागतिक वर्चस्वाला आव्हान देऊ शकणारा असा कुणी खेळाडू फिशरच्या रुपाने उदयाला येत होता.

अतिशय हुशार पण तेव्हढाच तऱ्हेवाईक आणि विक्षिप्त. रशियन आणि ज्यू वंशीय संपूर्ण जगाला आपल्या अधिपत्याखाली आणायचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हा विचार बॉबीच्या मनात इतका मूळ धरून बसला होता की त्यामुळे आपल्यावर सतत हेरांची पाळत आहे, आपल्या हॉटेल रूम मधील टेलिफोन "bugged" केलेले आहेत अशा शंकांनी फिशरचं डोकं भणाणून जात असे आणि त्यातूनच त्याच्या "मी अमुक अमुक व्यवस्था असेल तरच खेळीन" अशा चमत्कारिक अटी बाहेर पडत असत.

हा तऱ्हेवाईकपणा इतका पराकोटीला गेला की त्याच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली. या शंका बऱ्याच अंशी खऱ्या असाव्यात कारण १९७५ साली फिशरनी आपलं जगज्जेतेपद अबाधित / सुरक्षित ठेवण्यासाठी खेळण्या ऐवजी व्यावसायिक बुद्धीबळातून आणि सार्वजनिक जीवनातून अचानक निवृत्ती घेतली आणि रशियाचा अनातोली कारपॉव्ह जगज्जेता बनला - फिशर शी सामना न करताच.  पुन्हा एकदा रशियाचं पारडं जड झालं.

त्यानंतर १९९२ साली फिशर अचानक "बाहेर" आला आणि संयुक्त राष्ट्रानी युगोस्लाव्हिया वर बंधन घातलेलं असून देखील तिथे स्पास्कीविरुद्ध एक अनधिकृत सामना खेळून तो जिंकला आणि अमेरिकन सरकारच्या रोषास पात्र ठरला. पुढे त्याला जपान मध्ये रद्दबातल ठरलेला अमेरिकी पासपोर्ट बाळगून आढळल्याबद्दल अटक झाली आणि अखेरीस आईसलॅण्ड नी आपलं नागरिकत्व देऊन त्याला आयुष्याच्या अखेरच्या वर्षात आसरा आणि देश दिला.

एका अतिशय बुद्धीमान व प्रज्ञावंत बुद्धीबळपटूच्या जीवनाची ही दुर्दैवी कहाणी. बरेच जण म्हणतात की यश फिशरच्या डोक्यात गेलं, त्यामुळे त्याचा मूळचा विक्षिप्तपणा वेडेपणात बदलत गेला.

पण हे असं जरी सगळं असलं तरी बॉबी फिशर हा जगात आजतागायत होऊन गेलेल्या महान बुद्धीबळ पटूंपैकी एक होता हे निर्विवाद.

आजच्या संगणकीय जमान्यात महान खेळाडूंच्या चालींबद्दल माहिती असणं व विश्लेषण करणं इतकं अवघड वाटत नाही पण १९७० च्या दशकात बॉबी फिशरने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळाच्या शैलीचा व प्रत्येक सामन्यातील चालींचा जितका खोलात जाऊन अभ्यास केला होता तितका क्वचितच कोणी त्यापूर्वी केला असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे.

वयाच्या तेराव्या वर्षी एका स्पर्धेत बॉबी जो गेम खेळला त्याला बुद्धीबळाच्या जगतात " Game of the Century" म्हणून ओळखलं जातं. १९७२ साली ज्या चोवीस सामन्यांच्या शृंखलेत त्याने स्पास्की कडून जगज्जेतेपद खेचून घेतलं त्या शृंखलेतील सहावा गेम हा बऱ्याच तज्ञांच्या मते जागतिक व्यावसायिक बुद्धीबळातला आत्तापर्यंतचा सगळ्यात उत्कृष्ट असा खेळ होता व आहे ज्यात बॉबी फिशरनी पूर्णपणे अनपेक्षित व अचंबित करणाऱ्या चाली करून तो गेम अशा अभूतपूर्व रितीने जिंकला की स्पास्कीने देखील टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं.

बुद्धीबळाच्या अभिनव अशा अफलातून शैली व्यतिरिक्त या खेळात बॉबीचं इतर योगदान देखील महत्वपूर्ण आहे. सध्या जागतिक व्यावसायिक बुद्धीबळात चालीसाठी घेतलेल्या वेळेची गणना करण्याची जी पद्धत सर्वमान्य रित्या वापरली जाते ती बॉबी फिशरनी तत्कालीन पद्धतीत सुधारणा करून तयार केलेली आहे. त्याचं My 60 memorable games हे पुस्तक हौशी, व्यावसायिक अशा सर्व बुद्धीबळपटूंसाठी एक must read आहे.

फिशर च्या विक्षिप्तपणाबद्दल बोलणाऱ्या लोकांपैकी किती जणाकडे, बुद्धीबळ सोडा पण;  आपल्या स्वत:च्या क्षेत्रात सुद्धा अशी अभूतपूर्व कामगिरी दाखवण्याचं कौशल्य होतं ?

पण जेव्हा एखाद्या जगप्रसिद्ध व्यक्तीच्या आयुष्याच्या यशस्वीपणाचा आलेख तपासला जातो तेव्हा तो सार्वजनिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यात कितपत यशस्वी होता, यश पचवू शकला की नाही , अपयश पचवू शकला की नाही इत्यादी अनेक निकष लावले जातात.

त्या संदर्भात आणि रंगांची पारंपारिक रुपकं लक्षात घेऊन, बुद्धीबळाच्या परिभाषेत बोलायचं तर  बुद्धीबळाचा पट हे जीवन, त्यातले पांढरे चौकोन म्हणजे यश, सुख, समाधान, आनंद इ. तर काळे चौकोन म्हणजे अपयश, निराशा, दु:ख इ.

प्रत्यक्ष खेळात दोन्ही रंगाच्या सोंगट्या या निव्वळ सोंगट्या असल्या तरी आयुष्याच्या संदर्भात विचार करता, पांढऱ्या सोंगट्या म्हणजे चांगुलपणा, प्रामाणिकपणा, धैर्य, सचोटी, समतोल विचारसरणी, चिकाटी, आशावाद, बुद्धिमत्ता, नीतीमत्ता इ. सुगुण तर काळ्या सोंगट्या म्हणजे वाईट विचार, निराशा, पलायनवाद, क्रोध, मत्सर इ व इतर अनेक दुर्गुण.

या पटावर पांढऱ्या सोंगट्यांनी काळ्या सोंगट्यांना मात देत शेवटी काळ्या राजाला शह व मात देणं अत्यंत आवश्यक आहे. भले खेळाच्या मध्ये आपण स्वत:ला पांढऱ्या ऐवजी काळ्या चौकोनात पाहिलं तरी पांढऱ्या सोंगट्यांची ताकद पणाला लावून गेम जिंकायचा प्रयत्न करायलाच हवा.

नाहीतर भले तुम्ही बॉबी फिशर असाल आणि बुद्धीबळाचे जगज्जेतेपण असाल पण अपरिहार्यपणे तुमच्याबद्दल बोलताना नंतरच्या पिढ्या तुमच्या कौशल्याबद्दल बोलतानाच तुमच्या बाकीच्या आयुष्याबद्दल कणव, तुच्छता, तिरस्कार या सहित उल्लेख करतील.

तेव्हा जीवनाच्या बुद्धीबळात "काळ्या सोंगट्यांचा"  बळी देत (pawn sacifice) पांढऱ्या सोंगट्यांच्या बळावर सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याचा प्रयत्न करणं हाच बुद्धीबळाचा सर्वश्रेष्ठ गेम आहे नाहीतर आपल्याच दोषांच्या वा दुर्गुणांच्या हातंचं प्यादं (pawn) बनून बळी जात रहाणं हेच होत राहील.

---- मनिष मोहिले 

Tuesday, May 23, 2017

सचिन सचिन

सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूचं मोठेपण यात की त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याच्याबद्दल जे काही बोललं लिहीलं गेलं (९०% वेळा स्तुती करणारं आणि १०% वेळा त्याच्या खेळातील फॉर्मबद्दल शंका उपस्थित करणारं, कप्तानपद आणि बॅट्समन या दुहेरी भूमिका समर्थपणे न हाताळू शकण्याबद्दल ) ते त्याच्या क्रिकेटबद्दल, त्याच्या क्रिकेटमधल्या फॉर्म बद्दलच होतं.

क्रिकेट व्यतिरिक्त मॅच फिक्सींग, एखाद्या अभिनेत्रीबरोबर नाव जोडलं जाणं, IPL च्या जमान्यातील "इंडियन सुरस कथा" असलेल्या पार्टीजमधील सहभाग याबद्दल ते कधीच नसायचं.

सतत चोवीस वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे देशाचं प्रतिनिधित्व करायचं, करोडो लोकांच्या अपेक्षांचं ओझं सांभाळत स्वत:ला सांभाळायचं, इतकं अफाट यश मिळाल्यानंतर ही कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता सातत्यानी आपल्या खेळावर, त्यातील तृटींवर लक्ष केंद्रीत करत खेळ अजून चांगला कसा बनवता येइल हा विचार करायचा आणि हे सगळं करताना एक कुटुंबवत्सल नवरा, बाप, मुलगा ही भूमिका (घरच्यांचा सहभाग आणि आधार १००% मान्य) योग्य पद्धतीनी निभावतानाच एक चांगला नम्र माणूस बनून रहायचं, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवायची ह्यात त्याच्यातला चांगला खेळाडू आणि चांगला माणूस यातील समतोल दिसून येतो.

सचिन रमेश तेंडुलकर अशा पद्धतीने घडण्यात त्याचे वडील, कुटुंब आणि निर्विवादपणे अजित तेंडुलकर ह्यांचा मोठा सहभाग असला तरी मुळात सचिन या व्यक्तीमधल्या त्याला महान बनवणाऱ्या गुणांना, त्याच्या मेहनतीला, चिकाटीला, खेळातील प्रामाणिकपणाला कमी महत्व आहे असं होत नाही.

रत्नाना पैलू पाडतात त्यात बरेचदा आतले दोष (जिरीम म्हणतात त्याला - एखादी चीर जी प्रोसेस मध्ये मोठी होत जाते किंवा रंग अशा जागी अधिक चांगला असणं जो भाग कापला जाइल ) पैलू पाडताना अथवा घिसाई करताना दिसू लागतात किंवा मोठे व्हायला लागतात. तर असा दोष नसलेला खडा मुळात मिळणं की ज्याला योग्य पैलू पाडता येतील हे ही तितकंच महत्वाचं.

कांबळीची natural cricketing ability सचिनपेक्षा सरस असेल, नव्हे तज्ञांच्या म्हणण्य्याप्रमाणे ती होती. पण temperament या मुद्द्यावर माझा मतभेद आहे मुकुंदा.

Temperament हे फक्त एका मॅचपुरतं किंवा मैदानापुरतं मर्यादित नसतं. ते मैदानाच्या बाहेर असंख्य आशा अपेक्षांची ओझी, प्रलोभनं, मोह, या व इतर अशाच गोष्टींना यशस्वीपणे हाताळण्यासाठी पण लागतं आणि ते ज्याला जमतं त्याचं temperament खरं temperament.

मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही आक्षेपार्ह भाषा नाही, वर्तन नाही, प्रतिस्पर्धी गोलंदाज आणि स्वजन टीकाकार यांच्या गोलंदाजी अथवा शाब्दिक हल्ल्याना प्रत्युत्तर फक्त खेळातून द्यायचं आणि हे वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापासून सांभाळण्याइतकी प्रगल्भता ह्या सगळ्या गोष्टी अजितच्या त्यागा इतक्या आणि अथक अमूल्य मार्गदर्शना इतक्याच महत्वाच्या.

अंगातला शर्ट न काढता, कानात डूल न घालता प्रतिस्पर्ध्यानी (Matthew Hayden) सुद्धा फलंदाजीतल्या देवाचा दर्जा द्यावा, भारतीय जनतेनी तर क्रिकेटचा देवच मानावं, माजी, आजी आणि भावी अशा सगळ्या दिग्गज खेळाडूंनी खेळातील कौशल्याचे आणि त्याच बरोबर एक चांगला माणूस असण्याचे गुण गावेत, प्रत्यक्ष ब्रॅडमन नी "तुला खेळताना पाहून मला माझ्या स्वत:च्या खेळाचा भास झाला" अशी दाद द्यावी - ह्या सगळ्यासाठी नुसता चांगला मार्गदर्शक मोठा भाऊ असून चालत नाही - मूळ नाणं खणखणीत असावंच लागतं.

शेवटी आचरेकर सरांचं "द्रोणाचार्य" पद खऱ्या अर्थानी सार्थ केलं सचिन नीच.

असंख्य महान खेळाडू होऊन गेले आणि होतील ही. पण संपूर्ण देशानी  ज्याच्या नावाचा गजर करावा असा खेळाडू अतिशय विरळा - सचिन रमेश तेंडुलकर असा खेळाडू आहे.

म्हणूनच चोवीस वर्षं तो त्या बावीस यार्डावर असतानाचा गजर पुन्हा एकदा करतो -


सचिन सचिन सचिन सचिन.

--- मनिष मोहिले 

Thursday, May 18, 2017

त्रिमितीय छपाई - अर्थात 3D Printing

त्रिमितीय छपाई अर्थात 3D Printing

एपिस कॉर नावाच्या एका कंपनीने रशियातील स्टुपिनो या जागी अकरा हजार डॉलरच्या खर्चात चारशे चौरस फुटाचं एक खरंखुरं घर बनवलं.  आता तुम्ही म्हणाल की यात नवल ते काय ?

तर नवल हे की त्यांनी हे घर एका दिवसात उभं केलं. शब्दश: २४ तासात. कारण ॲपिस कॉर नी ते घर "छापलं" - अक्षरश: छापलं - त्रिमितीय छपाई तंत्रज्ञानाच्या मदतीने. ह्या प्रिंटरमध्ये शाई होती कॉंक्रीट मिक्ष्चर.

पोर्टेबल 3D प्रिंटरमध्ये कॉंक्रीट मिक्ष्चर ची शाई वापरून प्रथम घराचा मूळ ढाचा (structure), भिंती, आतल्या भिंती, छप्पर इत्यादी बनवलं आणि नंतर जुळणी (assembly) चं काम (दारं, खिडक्या, काचा, interior) करून घर पूर्ण केलं.

एपिस कॉर  ह्या 3D printer बनवणाऱ्या कंपनीने ह्या प्रकल्पात विकास, बांधकाम सामग्री, रंग व मजबूती सामग्री (reinforcement materials), इलेक्ट्रॉनिक्स, वातावरण नियंत्रण इत्यादी विविध क्षेत्रातील अग्रगण्य अशा सहा कंपन्यांकडून सहाय्य घेतलं आणि हा विक्रमी प्रकल्प पूर्ण केला.

एपिस कॉर च्या सुरवातीच्या अंदाजाप्रमाणे फक्त बांधकामाच्या खर्चाचा विचार केला तर 3D छपाईनी केलेलं बांधकाम हे सध्या ज्या पद्धतीने बांधकाम केलं जातं त्याच्यापेक्षा जवळपास ७०% स्वस्त असू शकेल. अर्थात व्यापारी स्तरावर ह्या अंदाजाची सत्यासत्यता पडताळावी लागेल.

पण अशा पद्धतीने बांधलेल्या इमारती या भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत सुरक्षित आहेत का ? तर निश्चितपणे आहेत असं या इमारती बनवणारे वास्तूशास्त्रज्ञ म्हणतात. कारण इमारतीच्या ढाच्यात ते एकमेकात अडकवू शकण्याजोगे ठोकळे बनवतात जे भूकंप झाला असता पडण्याऐवजी एकमेकांकडे किंवा विरुद्ध सरकतात आणि तो धक्का पचवतात.

इतंकच काय पण 3D printed sand blocks (विटा) मधील छिद्रांचा आकार, डिझाइन संगणक नियंत्रणाप्रमाणे बनवून वातावरणातील बाष्पाचा वापर करून घरातील तपमान नियंत्रण सुद्धा होऊ शकतं.

एपिस कॉर चा प्रकल्प जुना म्हणवेल अशा वेगाने घटना घडतायत. चीन मधल्या हुआशॅंग टेंग्डा HuaShang Tengda या कंपनीने मोठा 3D प्रिंटर वापरून ४५ दिवसात ४३०५ चौरस फुटाचा दुमजली व्हिला बांधला, चुकलो; छापला - जो त्यांच्या मते रिख्टर स्केल वर ८ पर्यंतच्या ताकदीच्या भूकंपाचे धक्के सुद्धा सहन करू शकतो. हुआशॅंग ने तर प्रथम ढाचा, मग भिंती, मग जुळणी असं नं करता फक्त बाह्य ढाचा बनवला प्लंबिंग पाईप सकट आणि नंतर बाहेरच्या आतल्या भिंती इ सहित संपूर्ण घर छापलं. एपिस कॉर च्या खर्चाबद्दलच्या अंदाजात तथ्य असू शकेल असं वाटण्याजोगी ही गोष्ट आहे.

तर अशा अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात करून दाखवणारं हे 3D Printing आहे तरी काय नक्की ?

त्रिमितीय छपाई हे एक भविष्यवेधी आणि
भविष्य बदलून टाकणारं तंत्रज्ञान आहे. अधिक व्यापक स्वरुपावर या तंत्रज्ञानाला Additive Manufacturing (मिश्रित पदार्थ निर्मिती) या नावानी ओळखलं जातं.

ढोबळमानाने सांगायचं तर संगणकीय नियंत्रणाच्या मदतीने अंकात्मक त्रिमितीय प्रतिकृती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी,  नक्की केलेल्या शाईचे म्हणजेच सामग्रीचे (material) अतिशय पातळ थर एकमेकांवर चिकटवून त्या प्रतिकृतीप्रमाणे त्रिमितीय वस्तू बनवणे म्हणजे त्रिमितीय छपाई.

एखाद्या त्रिमितीय मॉडेलींग ॲपच्या (There are professional costly apps for industrial purpose and also apps like Blender which is free open source app available) मदतीने आभासी (virtual) त्रिमितीय प्रतिकृतीची CAD (computer aided design) फाइल बनवून ती 3D printer कडे पाठवायची आणि ती त्रिमितीय वस्तू छापायची हे या प्रक्रियेचं अगदी सोपं वर्णन झालं.

ही CAD फाइल तयार करायची अजून एक पद्धती म्हणजे 3D scanner वापरणे. आजमितीला
मायक्रोसॉफ्ट व गूगल हे दोघेही आपापली सॉफ्टवेअर 3D scanner वापर सुलभ व्हावा अशा पद्धतीने सुधारण्याचा प्रयत्न करताहेत. नजीकच्या भविष्यकाळात smart phones मध्ये 3D scanner उपलब्ध असतील. असो.

तर एकदा का त्रिमितीय प्रतिकृती निर्माण झाली की त्यानंतर slicing ची प्रक्रिया होते - थोडक्यात त्या त्रिमितीय डिझाइनला क्षितीज समांतर पातळीत शेकडो / हजारो थरान्मध्ये विभाजित केले जाते आणि ही संपूर्ण माहिती (CAD फाइल च्या स्वरुपातली त्रिमितीय प्रतिकृती व  त्याच्या क्षितिजसमांतर पातळीवर विभाजित केलेले थर ) 3D printer कडे पाठवून मग त्रिमितीय छपाई केली जाते.

ही छपाई करण्यासाठी ३ प्रकारच्या पद्धती  प्रामुख्याने वापरल्या जातात - Selective Laser Sintering (SLS), Fused Deposition Modeling (FDM) आणि Stereolithography (SLA). (ही फारच जास्त तांत्रिक बाब आहे ज्यात मी फार खोलात शिरलो नाही.)

आणि अशा या त्रिमितीय छपाई च्या मदतीने जवळपास कुठच्याही आकाराची वस्तू छापली जाऊ शकते.

अशा या तंत्रज्ञानाचा वापर कृत्रिम अवयव बनवणारा (bio printing) उद्योग, अवकाश व हवाई संचारण उद्योग, मोटार उद्योग, विविध प्रकारचे उत्पादन उद्योग, पुरातत्व अवशेषांचं पुनर्निर्माण, बांधकाम उद्योग, करमणूक इत्यादी विविध क्षेत्रात व उद्योगात सुरू होतोय व होइल आणि अधिकाधिक वाढत्या प्रमाणावर होइल.

म्हणूनच जिथे 2013 साली जगभरातल्या 3D छपाई उद्योगाचं मूल्यांकन साधारण १९५०० कोटी रुपये एवढं होतं तिथे ते  2018 पर्यंत म्हणजे पुढच्या एखाद दीड वर्षात ८४५०० कोटी रुपये  एवढं तर या दशकपूर्तीपर्यंत (2020) ते १३५०००  कोटी रुपये एवढं वाढणं अपेक्षित आहे.

आपल्याला चक्रावून टाकेल असं हे तंत्रज्ञान हे तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचा पाया ठरेल असे भविष्यवेधी प्रतिपादन करतात.

पण या अचंबित करणाऱ्या प्रगतीची नकारात्मक बाजू ही आहे की पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या ज्या ज्या उद्योगधंद्यात हे तंत्रज्ञान शिरेल तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बेकारी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि वर दिलेली यादी पहाता जवळपास प्रत्येक उद्योगात हे तंत्रज्ञान शिरकाव करतंय.

दुसऱ्या औद्योगिक क्रांतीनंतर ही हा प्रश्न उभा राहिला. पण जस जशी वर्षं गेली तस तसं लोकांनी स्वत:ला नवीन परिस्थितीत काम करण्यायोग्य बनवलं, छोटे उद्योग सुरू केले आणि गाडी हळूहळू रुळावर आली. मात्र आताचा प्रश्न तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिकतेमुळे व क्लिष्टतेमुळे अधिक गंभीर असू शकेल. त्यामुळे आधुनिक संगणकीय व तांत्रिक शिक्षण व ज्ञान अत्यावश्यक ठरणार आहे जर यात टिकायच असेल तर.

पण ते काहीही असलं तरी एक गोष्ट खरी की ही त्रिमितीय छपाई संपूर्ण मानवजातीच्या जीवनावर छाप - आणि ती देखील कायमची उमटवणारच.

-- मनिष मोहिले









Tuesday, May 16, 2017

डार्विन आणि आध्यात्मिक उत्क्रांतीवाद

डार्विन आणि आध्यात्मिक उत्क्रांतीवाद

गेल्या काही दिवसात मुकुंदानी टाकलेल्या पोस्टी एकत्र डोक्यात घोळत होत्या.
वेळीच संवेदना जागृत न झाल्यमुळे वादळात मेलेले पोपट आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनींचं चक्र, आजकालचे आत्महत्यांचे वाढते प्रमाण इ; आणि एक अतिशय जंगली विचार (wild thought) डोक्यात आला.

डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार, मनुष्यप्राणी हा जीवसाखळी व अन्नसाखळीतला सर्वात प्रगत व उच्च दुवा आहे. इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राणी कैक पटीनी बुद्धिवान, आत्यंतिक समाजशील, भाषेचा शोध लावून अतिशय परिणामकारक रित्या संवाद साधणारा, शास्त्रीय शोध लावून निसर्गाची गुपितं जाणून घेणारा, बऱ्याच बाबतीत स्वत:ला देव मानणारा.

अरे हो, देवावरून आठवलं - मनुष्याची धार्मिक आणि अध्यात्मिक प्रगतीचा उल्लेख राहूनच गेला की वर.

पण ह्या सगळ्या प्रगतीच्या पायऱ्या पार करताना मनुष्याला किंमत मोजावी लांगली - आपल्या संवेदन क्षमतेची. बऱ्याचदा आपण बघतो की प्राण्यांची संवेदनक्षमता आपल्यापेक्षा कैक पटीनी चांगली असते.

इतर प्राणी निसर्गाच्या जास्त जवळ असतात. ज्या नैसर्गिक परिस्थितीकीत ते असतात त्याची वाट लावण्याची अक्कल हुशारी त्यांच्याकडे नसते.  आपलं जीवन ते नैसर्गिक संवेदनांच्या जोरावर जगत असतात. संघर्ष असेल पण तक्रार करण्यासाठी लागणारं तुलनात्मक डोकं त्यांच्याकडे नसतं. साठवण करण्यासाठी शिकार करण्याची प्रवृत्ती नसते.  लढा देतात - इलाखा, मादी, पाणवठा यासाठी. पण एकास एक. उगीच एकाची भूक, प्यास, सत्तापिपासा, वासना भागवण्यासाठी सगळ्या दुनियेला वेठीला नाही धरत. पण हे नैसर्गिक संघर्ष वगळता प्राणी at ease & peace with self असतात. ते त्यांचं त्यांचं आयुष्यमान असतं त्याप्रमाणे जगतात. काही सेकंदांपासून ते दोन अडीचशे वर्षांपर्यंत. पण निसर्गचक्र म्हणून कुणाची शिकार होऊन आयुष्याची दोरी मध्येच नाही तुटली तर सहज जगतात आणि मरतात.

प्राणी जे करत नाहीत, नेमकं तेच सगळं माणूस करतो आणि मन:शांती गमावतो. मग त्याला अध्यात्म, ध्यानधारणा, ईश्वराशी एकरूपता वगैरे गोष्टी सुचायला लागतात.

म्हणजे आधी दूर जायचं आणि मग एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा. मग आहे तेच आणि तसंच स्विकारून का नाही जगायचं ? पण नाही - शॉट लावायचे - स्वत:च्या नी दुनियेच्या डोक्याला.

आणि मग प्रवृत्तीप्रमाणे आत्महत्या करायची किंवा खून - सिंगल किंवा घाऊक. आणि म्हणे सर्वात उच्च व प्रगत दुवा.

तर या विचार मंथनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या डोक्यात विचार आला तो हा की आध्यात्मिक उत्क्रांतीवादाच्या साखळीत माणूस एकदम सुरूवातीचा अप्रगत दुवा असावा. संवेदनांच्या सहाय्यानी निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगणं शिकत शिकत वेगवेगळे प्राणी बनत अखेर आत्मा निसर्गशक्तीशी एकरुप होत असावा - सगळ्यात कमी आयुर्मर्यादा वाला.

त्यामुळे त्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीन्मधला प्रवास आपल्याला वाटतो त्याच्या उलट असावा.

एक गोष्ट मात्र नक्की - ते पोपट ज्यांच्या संवेदना न जागल्यामुळे मृत्यूमुखी पडले त्यांचा प्रवास मानवयोनीकडे चालू असेल.

-- मनिष मोहिले 

Sunday, May 14, 2017

बहावा फुलतोच आहे.

बहावा

मला बहावा प्रचंड आवडतो. चैत्र वैशाखाच्या भाजून काढणाऱ्या ऊन्हात,  आपल्या अंगभर द्राक्षांच्या घोसासारखे पिवळ्या धम्मक फुलांचे घोस मिरवताना दिसतो - कुठल्याही रस्त्यावर. कुठल्याही वळणावर.

अहमदाबादला माझ्या ऑफीसला जायच्या रोजच्या रस्त्यावर तशी तर बरीच झाडं आहेत. मोठी, भरदार सावली देणारी. त्यात गुलमोहर पांगेरा अशीही झाडं आहेत ज्यांचा बहर सुद्धा या मोसमात ओसंडून जात असतो. पण बहावा तो बहावा. कमीत कमी चारेक जागी हा बहावा माझं लक्ष वेधून घेत उभा असतो - द्राक्षाच्या घोसांसारखे आपल्या पिवळ्या धम्मक फुलांचे घोस मिरवत.

चैत्र वैशाखाचे हे दोन महिने सोडले तर इतर महिन्यात त्याचं अस्तित्वही जाणवत नाही. पण या दोन महिन्यात - ठरवलं तरी त्याकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही.

त्यातलं एक झाड तर मला विशेष आवडतं. तो रस्ताच सुरेख आहे. त्या संपूर्ण पट्ट्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत. उजव्या बाजूला एलिस ब्रिज जिमखाना आणि खादी भवनच्या लाल विटांच्या भिंतींनी आजूबाजूच्या हिरवाईच्या पार्श्वभूमीवर शोभून दिसणाऱ्या बैठ्या इमारती आहेत तर डावीकडे एका पाठोपाठ एक तीन पिढ्यांच्या प्रतिनिधी असल्यासारख्या दिसणाऱ्या तीन इमारती आहेत - एक जुन्या वाड्यासारखी इमारत जी एखाद्या आजोबांसारखी गोष्टीवेल्हाळ, आश्वासक आणि ममताळू वाटते तर दुसरी आहे एक टुमदार, दर्शनी षटकोनी असलेली, त्यावर षटकोनी आकारात लाल कौलांच्या छपरानी डौलदार दिसणारी, पुढे मागे छान हिरवळ असलेली बंगली - जणू घरातला कर्ता पुरूष आणि मग तारुण्याचं प्रतीक असलेली एक आधुनिक पद्धतीची इमारत. आणि ती बंगली आणि ती आधुनिक इमारत यांच्या मध्ये रस्त्यावर समोरच्या बाजूला आहे ते बहाव्याचं झाड.

रणरणत्या ऊन्हात सुद्धा आतून फुलून आल्यासारखं ते नुसतं बहरून डवरून आलेलं असतं - त्या पिवळ्या धम्मक फुलांच्या द्राक्षघोसांनी. इतकं की ना त्या झाडाच्या फांद्या दिसत ना पानं. फक्त फुलांचे घोस. बघणाऱ्याला मोहून टाकणारे. त्याची नजर बांधून ठेवणारे. स्वत:च्याच वजनानी खाली पडतील की काय असं वाटण्याइतके मोठे मोठे घोस लटकत असतात. आणि होतं ही तसंच जणू.
काही दिवस तो दृष्ट लागण्यासारखा बहर टिकतो आणि हळूहळू ते घोस खालून छोटे होत जातात. आणि मग काही दिवसांनी जवळपास काळ्या रंगाच्या वाटणाऱ्या फक्त फांद्या शिल्लक रहातात आणि शिल्लक रहातात त्याच रंगाच्या शेंगा. जणू पराकोटीच्या आसक्ती नंतर पराकोटीची विरक्ती यावी तसं अफलातून बहरानी फुलून आलेलं ते झाड ऊघडं बोडकं होतं - पानंसुद्धा रहात नाहीत. जणू पूर्णपणे नि:संग होऊन जातं; आणि मग एखाद आठवड्यानी परत एकदा ती पिवळी फुलं हळूहळू दिसू लागतात. आणि मग काहीच दिवसात परत एकदा ते झाड फुलून येतं - द्राक्षांच्या घोसासारख्या पिवळ्या धम्मक फुलांच्या घोसांनी आणि इंग्रजीतलं आपलं "Golden Shower Tree" हे नाव सार्थ करतं

पुन्हा एकदा पराकोटीचं आसक्त करणारं सौंदर्य. निसर्गाच्या अगाध शक्तीचं कौतुक वाटायला लावणारं सौंदर्य. तसेच ते पिवळे लांबडे पुष्पघोस आपली नजर खिळवून ठेवतात.
ते एकच झाड असं कमीत कमी दोनदा पूर्ण बहरून येऊन रितं होताना आणि परत बहरून येताना दिसतं - किंवा बाकीचीही झाडं फुलत असावीत दोनदा पण हे झाड जसं आनंद अनावर झाल्यासारखं फुलारून येतं तसे बाकीच्या झाडांचे अनावर बहर नसल्याने लक्षात येत नसतील.

त्या झाडाचं असं जणू स्वत:लाही विसरून पूर्णपणे बहरून येणं आणि रितं होणं हे मला प्रचंड आकर्षित करतं. वाटतं आपल्यात सुद्धा निसर्गाशी इतकं तादात्म्य साधणारी मनस्विता हवी - बहर आणि रितेपण सारख्याच उत्कटतेनी अनुभवू शकणारी.

या वर्षीचा दुसरूनचा बहर यायचाय अजून त्या झाडाचा. मी वाट बघतोय त्या दुसऱ्या बहराची. आणि माझ्या नेहमीच्या रस्त्यावरचे बाकी बहावे पण फुलतातच आहेत.

अहमदाबादच्या असह्य उन्हाळ्यातली ही माझ्या मनाला शांतवणारी ओॲसिस आहेत.

आता मी वाट बघतो उन्हाळ्याची कारण येणाऱ्या प्रत्येक उन्हाळ्यात बहावा फुलतोच आहे.

--  मनिष मोहिले.



ईतिकर्तव्यता

आज ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय बघितला. ॲकॅडमी ॲवॉर्ड विजेता गाजलेला चित्रपट. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांना शरण याव्या लागलेल्या ब्रिटीश युद्धकैद्यांची एका छावणीतली ही कहाणी. जपानी छावणीप्रमुख कर्नल साटोचा हट्टी जुलूम आणि समोर आपल्या संपूर्ण पलटणीसहित युद्धकैदी बनलेल्या ब्रिटीश कर्नल निकोल्सन चा तत्वासाठीचा, सैन्याच्या नियमांच्या काटेकोर पालनासाठीचा लढा आणि त्या पार्श्वभूमीवर जपान्यांसाठी युद्धाच्या हालचालीच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली क्वॉय  नदीवरील पुलाची उभारणी. एक जरूर  पहावा असा चित्रपट.

पण मला जे सांगायचय ते या चित्रपटाविषयी नाही. चित्रपटाच्या शेवटी शेवटी कर्नल निकोल्सन च्या तोंडी एक संवाद आहे  त्या संवादाविषयी.

मावळत्या सूर्याकडे बघणाऱ्या, सैन्यात अठ्ठावीस वर्षं काढलेल्या कर्नल निकोल्सनला आयुष्याच्या मावळतीची जाणीव होते आणि त्यावेळी तो कर्नल साटोला बोलतो की तुम्ही आयुष्याला सुरूवात करता, तुम्ही जे काम निवडलं आहे ते काम करत रहाता ज्यात चांगले वाईट आनंदाचे दु:खाचे अनेक अनुभव घेत कित्येक वर्षं जातात आणि अचानक तुमच्या लक्षात येतं की तुम्ही सुरूवातीच्या जवळ नसून शेवटाच्या जवळ आहात.

अशा वेळी असा विचार येतो की मी आत्तापर्यंत केलेल्या कामामुळे त्या कामाच्या, माझ्या सहकाऱ्याच्या दृष्टीने किंवा त्याही पलीकडे जाऊन समाजाच्या दृष्टीने काही लक्षणीय फरक पडला का ? विशेषत: इतरांच्या कामाशी तुलना करता ? मला माहितीये की असा विचार करणं कदाचित योग्य नाही पण तरीही असा विचार आल्याखेरीज रहात नाही.

असा विचार आयुष्याच्या संध्याकाळी कदाचित प्रत्येकाच्या मनात येत असावा का ? असेल ही. पण मग किती जणांना या प्रश्नाचं होकारार्थी आणि समाधान देणारं उत्तर मिळत असेल ?

लौकिकार्थानी पहाता फारच थोड्या लोकांना असं म्हणता येत असेल की त्यांच्या कामामुळे इतरांच्या दृष्टीने लक्षणीय फरक पडला. बाकी अब्जावधी लोक साच्यातलं ठराविक आणि वर्ण्यविषय संदर्भात क्षुल्लक / अनुल्लेखनीय काम करणारे.

मग ह्या अब्जावधी लोकांनी जीवनाची इतिकर्तव्यता कशात समजायची ? तर अनेक वर्षं आपलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करत रहाणे - नजरेसमोर असं कुठलंही सोनेरी रंगात चकाकणारं कौतुक शिखर नसताना हेच खूप थकवणारं काम आहे.

आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आपल्या सान्निध्यात येणाऱ्या वगवेगळ्या व्यक्तींसाठी आपण वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. या भूमिका योग्य पद्धतीने बजावणं - मग त्यामुळे इतरांसाठी लक्षणीय फरक पडत नसला तरी स्वत:ला सांभाळत नियोजित पथावर चालवताना आपल्या संपर्कात येणाऱ्या इतरांशी मदत, सहकार, धीर देणे, सह अनुभूती इ ची देवाण घेवाण करत छोट्या दैनंदिन समस्या - स्वत:च्या व इतरांच्या सोडवणं हे ही महत्वाचं.

म्हणजे अशी महत्वाकांक्षा धरूच नये का ? तसं नाही. पण तसा विचार करताना हे ही ध्यानात घ्यावं की संपूर्ण जगाला दिसेल असं उल्लेखनीय व समाजावर परिणाम करू शकेल असं काम करता येणं यासाठी तुमचा नैसर्गिक स्वभाव व गुण, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती या व अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात.

त्यामुळे असामान्य न होता जगणं हे ही कमी महत्वस्चं नाही. शेवटी जर तुम्ही जीवन सुंदर आहे असं म्हणू शकलात तर तुम्ही असामान्य, इतरांच्या दृष्टीने फरक पडणारं उल्लेखनीय काम केलंत किंवा नाहीत तरी मागं वळून पहाताना सुंदर दिसणाऱ्या तुमच्या आयुष्याची ईतिकर्तव्यता त्यातच आहे हा विश्वास ठेवा.

-- मनिष मोहिले 

Wednesday, May 10, 2017

निवृत्ती आयोजन

निवृत्ती - एक आयोजन

या पूर्वी एकदा मी या विषयावर कदाचित एक छोटंसं पोस्ट लिहीलं होतं पण आज थोडी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न आहे.

आजपासून सात आठ वर्षापूर्वी (मी तेव्हा ३७-३८ वर्षांचा असीन) मी निवृत्ती आयोजन ( Retirement Planning ) हा शब्द पहिल्यांदी ऐकला.  गुंतवणूक आयोजनाबद्दल मार्गदर्शन करू शकणाऱ्या योग्य व्यक्तीच्या शोधात होतो त्यावेळी. तेव्हा माझ्या मित्रानी मला ह्या व्यक्तीशी ओळख करून दिली ज्यानं स्वत:चा व्यवसाय Retirement Planner असा आहे असं सांगितलं. त्यावेळी त्यानं एक तासाभराचं presentation दिलं आणि गेली आठ वर्ष मी त्याच्याशी संलग्न आहे. गंमत म्हणजे ज्या मित्रानी आमची ओळख करून दिली तो मात्र अजून ही ह्यात पडलेला नाही. असो.

तर इतक्या वर्षातील आमच्या अनेक भेटी गाठी, त्या व्यक्तीनी दिलेली presentations, आयोजित केलेले seminars / workshops ह्यातून मला जे समजलं ते समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

निवृत्ती आयोजनाला सुरूवात करताना सर्वात आवश्यक आहे त्याबद्दलची डोळस जाणीव. आपण आपल्या रोजच्या व्यापात इतके गर्क असतो की दिवस किती पटापट जातात हे जाणवत असून आणि आपण बोलत असून सुद्धा निवृत्तीच्या संदर्भात आपण विचारच करत नाही.  पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत, काटकसरीच्या जीवनशैलीत जिथे एकविसाव्या वर्षापासून ते साठाव्या वर्षापर्यंतच्या नोकरीत चाळीस वर्ष कमाई आणि निवृत्तीनंतर साधारण दहा वर्षांचा आयुष्यावधी असा हिशोब होता त्याच्या जागी सव्वीस सत्तावीसाव्या वर्षी शिक्षण संपवून नोकरी / धंद्यास सुरूवात, प्रगत वैद्यकशास्त्रामुळे वाढलेलं आयुर्मान व त्यामुळे  निवृत्तीनंतर वीसेक वर्षाचा आयुष्यावधी आणि विभक्त कुटुंबपद्धती असा मोठा फरक आहे. चाळीस वर्षांच्या कमाईवर दहा वर्ष काढणं आणि तीस वर्षांच्या कमाईवर तुलनेनी अधिक खर्चिक वीस वर्षं काढणं यात दुसरी परिस्थिती अधिक कठीण आहे. त्यामुळे निवृत्ती आयोजनाचा विचार करणं आणि कमावत्या आयुष्याच्या शक्य तितक्या सुरूवातीस करणं हे फायदेशीर आहे.

ढोबळमानाने, निवृत्ती आयोजन करताना खालील बाबींचा विचार करायला हवा.

आर्थिक - सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक सुरक्षितता. भविष्यात आपण निवृत्त होऊ त्यावेळी एक निश्चित मासिक उत्पन्न नसताना सुद्धा आपल्याला  त्यावेळच्या बाजारभावांप्रमाणे, कमीत कमी आपली आजची जीवनशैली आणि जीवनमान सुलभ आणि सुखद पणे कसे टिकवता येतील हे आयोजन अत्यावश्यक आहे.

त्यासाठी सगळ्यात आवश्यक आहे आजच्या तारखेचा cashflow - उत्पन्नाची आवक जावक. दैनंदिन खर्च भागवल्यानंतर त्या cashflow मधील बचत क्षमतेचा अंदाज. त्यानंतर आपण आपल्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आहोत त्याप्रमाणे अपेक्षित पडाव व त्याच्याशी निगडित अंदाजे खर्च - उदा. घर घेणे, गाडी घेणे, लग्न, मुलांचा जन्म, त्यांचं शिक्षण, वार्षिक सहली, मुलांची लग्न, आई वडिल अवलंबून असल्यास त्यांचं औषधपाणी आणि त्यानंतर स्वत:ची निवृत्ती आणि स्वत:च्या पश्चात जोडीदाराच्या उर्वरित आयुष्याची सोय.

या सर्व गोष्टी आणि महागाई दर व विविध प्रकारच्या गुंतवणूकींचा सरासरी परतफेड दर व साधारण आयुर्मर्यादा  लक्षात घेऊन, अपेक्षित पडावांसाठी वेळोवेळीच्या खर्चाची  तरतूद केल्यानंतर,  निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तेव्हाच्या बाजारभावाच्या संदर्भात कमीत कमी आत्ताच्या जीवनशैली व जीवनमाना प्रमाणे जगता येण्यासाठी किती गंगाजळी असायला हवी हे निश्चित करायला हवं. यासाठी साचेबंद आकडेमोड तक्ते असतात ज्यात आवश्यक माहिती भरली की ही गंगाजळी किती असायला हवी ते आपल्याला कळतं. त्या लक्ष्याच्या दिशेने पद्धतशीर  वाटचाल करणं ही या निवृत्ती आयोजनाची अंमलबजावणी.

यात सर्वात आवश्यक आहे पुरेसा आयुर्विमा जो अनपेक्षित धक्क्यांची काळजी घेऊ शकेल.  त्यानंतर लांब पल्ल्याचे (दीर्घ मुदतीसाठी) बचत आयोजन.

यात महत्वाची गोष्ट म्हणजे Debt आणि equity यातील समतोल - थोडक्यात गुंतवणूकीवरील निश्चित व अनिश्चित परतफेड यातील असा समतोल ज्यायोगे महागाईला मात देऊ शकणारी परतफेड मिळावी.

हे करताना महागाई दर आणि वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांचे भूतकाळातील गुंतवणूक परतफेड दर आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या संदर्भात त्यांचे भविष्यातील अंदाजित अपेक्षित परतफेड दर यांचा अभ्यास करून गुंतवणूक करणं आवश्यक आहे. सुरूवातीच्या काळात जेव्हा अधिक धोका पत्करण्याची आपली क्षमता असते तेव्हा equity dominant गुंतवणूक आणि निवृत्तीच्या जवळ आल्यावर debt dominant गुंतवणूक हे एक ढोबळ सूत्र आहे.
यामध्ये Systematic Investment Plan (SIP) पद्धतशीर गुंतवणूक योजना हे एक चांगलं गुंतवणूक माध्यम आहे.

दुसरी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे थोडा नफा किंवा तोटा दिसताच गुंतवणूक तोडणे हे अगदी चुकीचं आहे. पैसा जेवढा अधिक काळासाठी गुंतलेला राहील; तेवढा बाजाराच्या चढ उतार चक्राला निष्प्रभ करत, पैशाची चक्रवाढीची ताकद गुंतवलेला पैसा वाढवायला मदत करेल.

अर्थातच यात वेळोवेळी आपल्या एकंदर गुंतवणूकीचे अवलोकन करणे, बाजारस्थितीचे अवलोकन करणे व आवश्यक तिथे आपल्या गुंतवणूक आयोजनात फेरबदल करणे हे ओघानेच आले. यासाठी स्वत: नसल्यास एखाद्या जाणकार व विश्वासू अशा व्यावसायिक तज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन आवश्यक आहे - अशी व्यक्ती जी निव्वळ वेगवेगळ्या योजना तुम्हाला विकून स्वस्थ बसणार नाही तर वरील सर्व गोष्टींचा अभ्यास व विश्लेषण करून तुम्हाला योग्य सल्ला देइल व मार्गदर्शन करेल.

आपल्याला कदाचित नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक व गुंतवणूकदार या चौकोनाबद्दल माहिती असेल. यातील सर्वात वरची पायरी गुंतवणूकदाराची जिथे गुंतवलेला पैसाच गुंतवणूकदारासाठी उत्पन्न मिळवतो. त्या पायरीवर पोचणे हे आपलं उद्दीष्ट असायला हवं आणि त्यासाठी जेवढ्या लवकर सुरूवात करू तेवढं उत्तम.

निवृत्ती काळातील समय नियोजन - निवृत्ती ही सुरक्षित असण्याबरोबरच समाधानी देखील असणं अतिशय गरजेचं आहे. समाधानी निवृत्तीचा विचार करताना नुसती आर्थिक बाजू सुरक्षित करून उपयोग नाही. आपला नोकरी /  व्यवसाय;  ज्यात दिवसातील जास्तीत जास्त वेळ जातो, ती गोष्ट दिनचर्येचा भाग नाही म्हटल्यावर जो भरपूर मोकळा वेळ आपल्याला मिळेल; त्याचा आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल अशा पद्धतीने व्यय करण्यासाठी काही छंद , एखादं हलकं फुलकं काम ( समाजपयोगी असल्यास उत्तम), समानशील व समवयस्क मित्रपरिवार असे विविध पर्याय उपलब्ध हवेत.  पर्यटन हा ही एक उत्तम पर्याय होऊ शकतो. या गोष्टीचा विचार अगदी सुरूवातीला नाही तरी निवृत्ती जवळ यायला लागल्यावर हवाच हवा.

आरोग्य - वरील सर्व आनंद अनुभवायचे असतील, आणि कष्टानी जमा केलेल्या गंगाजळीचा उपभोग घेत सुखी समाधानी व सुरक्षित निवृत्ती अनुभवायची  असेल तर मुळात आपलं आरोग्य चांगलं हवं. नाहीतर औषधपाण्यावरच पैसा आणि वेळ खर्च व्हायचा. त्यासाठी आत्तापासून आपली जीवनशैली अशी बनवायला हवी ज्यायोगे उतारवयात अनारोग्याची समस्या कमीत कमी भेडसावेल. चांगल्या दिनचर्येच्या सवयी शक्य तितक्या लवकर अंगी बाणवाव्यात आणि ही अशी गोष्ट आहे की जिचा फायदा आयुष्यभरासाठी आहे.

या सगळ्या आयोजनाबरोबरच आवश्यक आहे सर्व गुंतवणूकी, विमे, मालमत्ता ह्यांच्या व्यवस्थित नोंदी आणि आपल्या जोडीदाराला व वारसदाराला त्या नोंदींची माहिती असणं. आजकालच्या काळात कर्त्या पुरूषाबरोबरच गृहिणीला देखील याबाबत पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कमावत्या स्त्रियांनी स्वत:च्या निवृत्तीचं आयोजन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे.

विशेषत: भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात जिथे निवृत्तीपर सरकारी मदत (वैद्यकीय खर्च, निवृत्ती भत्ता) या गोष्टी फारच कमी लोकांपुरत्या उपलब्ध असतात तिथे तर निवृत्ती आयोजनाची विशेष गरज आहे.

-- मनिष मोहिले 

Monday, May 8, 2017

बिटकॉईन - समांतर / पर्यायी चलनव्यवस्था

बिटकॉईन - समांतर / पर्यायी चलनव्यवस्था

आठवड्या किंवा दोन आठवड्या पूर्वीच्या पेपरला बातमी होती - बिटकॉईन चा दर एका बिटकॉईनला बाराशे डॉलर्स इतका वाढला आहे.

बिटकॉईन - हे एक जागतिक अंकात्मक  व आभासी (कारण ते मूर्त स्वरुपात नाही तर फक्त अंकात्मक रुपातच आहे) चलन आहे ज्याचं नियंत्रण विकेंद्रीत आहे. तांत्रिक भाषेत बोलायचं तर बिटकॉईन हे क्रिप्टोग्राफी मधील हॅशींग या तंत्राचा वापर करून बनवलेलं (म्हणजे नक्की काय व कसं हे तज्ञ मंडळीच सांगू शकतील), जागतिक अंकात्मक (digital) आभासी चलन आहे  आणि त्यावर कोणा एका देशाचं अथवा संस्थेचं नियंत्रण नाही.

३ जानेवारी २००९ रोजी बिटकॉईन प्रथम निर्माण केले गेले. सातोशी नाकामोटो बिटकॉईनचा जनक. पण तो एक व्यक्ती आहे का काही लोकांचा गट आहे याबद्दल अजूनही खात्रीलायक बातमी नाही.

एखादं चलन कसं वापरलं जातं - तर त्या देशाचं सरकार रोखे छापून केंद्रीय बॅंकेकडे गहाण ठेवतं (सरकारी तिजोरीतील सोन्याचा साठा व स्थिर आंतरराष्ट्रीय चलनात सरकारी तिजोरीची शिल्लक हे तारण)  आणि त्या बदल्यात केंद्रीय बॅंक चलन छापून वितरण करते. हे चलन शेतकरी, उद्योजक, सेवा पुरवणारे याना मिळून ते त्याच्या मदतीने वस्तू तयार करून विकतात / सेवा विकतात आणि नफा कमावतात. या उत्पन्नातून सरकारला कर्जाची परतफेड होते, आयकर भरला जातो आणि तेवढ्या किमतीचे रोखे सरकार सोडवू शकते. चलनचक्र चालू राहतं.

यात दोन गोष्टी महत्वाच्या - (१) चलनाची किंमत शक्य तेवढी स्थिर राखणे आणि त्यासाठी सरकार स्थिर असणे व त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सरकार बदललं तरी देशाची मूलभूत व व्यापक आर्थिक धोरणे स्थिर असणे आणि (२) चलन निर्मिती वर निश्चित नियंत्रण असणे (भरमसाठ चलन निर्मिती genuine / fake) झाली तर महागाई प्रमाणाबाहेर वाढून अर्थव्यवस्था कोलमडू शकते. (जसं पहिल्या महायुद्धानंतर १९२०-३० च्या दशकात जर्मनीत घडलं). या दोन गोष्टींवर जनतेचा त्या चलनावरचा विश्वास अवलंबून असतो आणि शेवटी कोणत्याही चलनाला तेवढीच किंमत असते जेवढा लोकांचा त्या चलनावरचा विश्वास. त्यामुळे या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या.

बिटकॉईन चलनाच्या संदर्भात देखील या गोष्टी महत्वाच्या ठरतात. पैकी चलननिर्मिती - सुरवातीला फक्त एका संगणकावर ही बिटकॉईन चलननिर्मिती झाली. सुरवातीला जगानी याकडे (तारण नसलेले चलन म्हणून) साशंकतेनी पाहिलं.
पण त्यामागचं अंकगणित तपासून ही विकेंद्रित अंकात्मक व आभासी चलनव्यवस्था शक्यतेच्या कोटीत बसतेसं दिसल्यावर त्याची स्वीकृती वाढत गेली.

आज एकापेक्षा अधिक संगणकांवर काही क्लिष्ट गणनविधी प्रक्रिया (complex algorithms) वापरून बिटकॉईन चलननिर्मिती होते. आजच्या तारखेला २१ दशलक्ष बिटकॉईन ही ह्या चलननिर्मितीसाठी वरची मर्यादा आहे. जर अधिक संगणक ह्या प्रक्रियेत सहभागी झाले तर गणनविधी प्रक्रिया अधिक क्लिष्ट बनवली जाते आणि संगणक कमी झाल्यास गणनविधी प्रक्रिया थोडी सोपी केली जाते आणि अशा पद्धतीने चलननिर्मितीचा वेग नियंत्रित केला जातो. ह्या निर्मिती प्रक्रियेला bitcoin mining अशी संज्ञा आहे. (हे तांत्रिकदृष्ट्या नक्की कसं होतं हे मला समजलेलं नाही. कोणाला अधिक माहिती असल्यास प्रकाश टाकावा).

तर अशा ह्या बिटकॉईन चलनातून peer to peer चलन हस्तांतरण होऊ शकतं जे वस्तू किंवा सेवेच्या बदल्यात असेल किंवा निव्वळ हस्तांतरण असेल. अशा प्रत्येक संगणकीय अंकात्मक (digital) व्यवहाराची एक नोंद होत असते आणि बिटकॉईन मध्ये व्यवहार करणाऱ्या सर्वाना ह्या नोंदी तपासता येऊ शकतात - सर्व उपभोक्त्यांच्या सामायिक हितसंबंधाना जोपासणे शक्य व्हावे यासाठी कोणा एकाकडे नियंत्रण नसते आणि सर्वजण "निर्धारित आचरणपद्धती" (protocol) चं पालन करतात.

आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात बिटकॉईन ची उलाढाल होते आणि त्याची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचमुळे एका बिटकॉईन ची किंमत आज बाराशे डॉलर्स आहे.

मात्र या बाबतीत मला काही मूलभूत शंका / प्रश्न आहेत -

जागतिक विकेंद्रित अंकात्मक व आभासी चलन असलेल्या बिटकॉईनची किंमत अजूनही डॉलर्सच्या संदर्भात सांगितली जात असेल तर ही नवी चलनव्यवस्था आणि पारंपारिक चलनव्यवस्था एकमेकीना पूरक की स्पर्धक की पर्यायी ? आणि जर पारंपारिक चलनव्यवस्था राहणारच असेल तर बिटकॉईनची आवश्यकता काय ?

सोने अथवा स्थिर आंतरराष्ट्रीय चलन ह्यापैकी कुठल्याच तारणाचा पाठिंबा नसताना ही समांतर चलनव्यवस्था इतक्या मोठ्या प्रमाणावर स्विकारली जात असल्यामागचं तर्कशास्त्र काय ?

मात्र काहीही असलं तरी आज bitcoin is not only the next big thing but it is already in, in a big way and the way things look & experts feel, it is the future.

---- मनिष मोहिले

(टीप - वरील लेखात काही तृटी वा चूक असल्यास जाणकारांनी दृष्टोत्पत्तीस आणून द्यावी आणि ती सुधारणा केली जाईल. तसेच शक्य असल्यास उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन करावं )